Sanjay Gaikwad on Police : पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Police : पोलीस खात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या बुलढाणा दौ-याच्या पूर्वसंध्येला आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गृहखात्याची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या आभार यात्रेसाठी आज बुलढाणा दौ-यावर येत आहेत. या दौ-याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्यावर नानाविध आरोप केले होते. अवैध धंद्यावर कारवाई करून पोलीस हप्ता वाढवून घेतात. काही पोलीस चोरांचे पार्टनर आहेत, रेड मारल्यावर पाच लाखाची रक्कम पन्नास हजार दाखवतात. अशा आशयाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.

महायुतीच्या घटक पक्षातील आमदारानेच पोलीस दलाविषयी असे वक्तव्य केल्याची बाब विविध माध्यमांतून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचल्यावर शनिवारी दुपारी फडणवीस यांनी, “आमदार गायकवाड वादग्रस्त वक्तव्य करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करु” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही तासांतच गृहखात्याकडून संकेत मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रविवारी बुलढाण्यात दौरा आहे. तत्पूर्वीच गृहखात्याने आमदार गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची तत्परतेने दखल घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Sanjay Gaikwad on Police : Controversial statement about police; Case registered

डोंबिवलीच्या क्रीडापटूंना ‘द्रोणाचार्य’ व ‘शिवछत्रपती’ पुरस्कार

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे डोंबिवलीकर असलेल्या पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले. ही डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाबा आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले पवन भोईर तर जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर झालेले राही पाखले, आदर्श भोईर या युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने रवींद्र चव्हाण यांनी यथोचित सन्मान केला. त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, “हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे.”

पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. ‘माझे डोंबिवलीकर माझा अभिमान’ असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘Dronacharya’ and ‘Shivchhatrapati’ awards to athletes from Dombivali

Power Cut Kalyan : कल्याण पूर्वेत उद्या तब्बल सात तास पॉवर कट

Power Cut Kalyan : पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून सर्व वीज यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. याचकरिता उद्या दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असणार असल्याचा एक मॅसेज समाज माध्यमांवर फिरत आहे. दोन तीन नव्हे तर तब्बल सात तास कल्याण पूर्वेतील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. ऐन उकाड्यात इतके तास रहायचे कसे? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

समाज माध्यमांवर फिरत असलेल्या मेसेजनुसार या सात तासांत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, विजयनगर, आमराई, गवळी नगर, तिसगाव नाका, आदर्श नगर, संतोष नगर, चक्की नाका परिसराचा वीजपुरवठा बंद असणार आहे. देखभाल दुरुस्तीकरिता पॉवर कट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. अलिकडल्या काळात तापमानाचा पारा हा ४०℃ ला खेटला असून विजसेवा खंडित झाल्यावर रहायचे कसे असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

कल्याण पूर्वेतील परिसर हा चाळ परिसर असल्याने पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दुपारच्या तापमानात इतक्या तासांचा पॉवर कट सोसवणे जिकरीचे आहे. तर अनेक घरांत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तर आजारी रुग्ण देखील आहेत. शिवाय व्यापारी वर्ग, डेअरी चालक देखील या निर्णयाविरोधात आहेत. त्यामुळे हा पॉवर कट सलग सात तासांचा न घेता तो दोन अथवा तीन टप्प्यात घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. इतक्या तासांच्या पॉवर कट विरोधात लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेते आवाज का उठवीत नाहीत? त्यांच्या घरात इन्व्हर्टर व गाडीत एसी असतो म्हणून त्यांना सामान्य नागरिकांना बसणारी झळ समजणार नाही असाही रोष कल्याण पूर्वतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे महावितरणला आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.

Power Cut Kalyan: Power cut for seven hours tomorrow in Kalyan East

“गोली मार दुगा” हिंदी भाषेतून धमकीचा फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याचे पडसाद मात्र अजूनही कल्याण शहरात उमटतच आहेत. सहा गोळ्या लागून बचावलेले महेश गायकवाड यांचे कार्यालय प्रमुख असलेले निलेश रसाळ यांना आता फोनद्वारे धमकी आली आहे. सारखे सारखे कोर्टात जातोस, तुला गोळ्या घालून मारीन अशी धमकी सदर इसमाने दिली आहे. मात्र ही धमकी देणारा व्यक्ती हा हिंदीतुन बोलत असून तो नेमका महाराष्ट्रातील आहे की परराज्यातून फोन करून अशी धमकी देत आहे ही बाब देखील तपासली जाणार आहे.

मनसेच्यागुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या इतर भाषिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मराठी बोलता येत नसेल तर काही खैर नाही असे चित्र आता मनसेने उभे केले आहे. त्यातच कल्याण मधील निलेश रसाळ या मराठी युवकास आलेला धमकीचा फोन हा एका अमराठी भाषिकाने केल्याने आपल्याच घरात मराठी माणसाच्या गळ्यावर नख लावले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निलेश रसाळ हे महेश गायकवाड यांचे कार्यलयीन कामकाज पाहतात. त्यामुळे अनोळखी इसमाने त्यांना कोर्टात सारखा दिसू नको नाहीतर गोळ्या घालीन अशी उघड धमकी दिली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे. परंतु सदर इसम हा अमराठी असून येथील स्थानिक मराठी भाषिकालाच जीवे मारण्याची धमकी देत आहे ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. आता ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कानावर गेल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण संभाषण ऐका पुढील लिंकवर

https://www.facebook.com/share/v/164WouekZ1

Hindi speaker threatens to kill local man

Kalyan East मध्ये शिंदेंच्या Shivsena पक्षात अंतर्गत धुसफूस; सर्व पद घेतली काढून

Shivsena Kalyan East : एकनाथ शिंदे यांच्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेत फार आधीपासूनच अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदें सोबत असलेल्या पदाधिकारी वर्गातही गटतट बनल्याने पक्षासाठी हे नुकसानकारक बनले आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राढ्यानंतर आता शिंदेंच्या सेनेने शेवटी कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या फळीची कार्यकारिणी बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी एक परिपत्रक जारी केले असून त्यांनी कल्याण पूर्वेतील पुरुष व महिला उप शहरप्रमुख पर्यंतची सर्व पदे स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. तर आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा नव्याने पद नियुक्ती केली जाईल असेही त्यांनी या परीपत्रकात म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना हा कल्याण पूर्वेतील मोठा पक्ष ठरला होता. पुढे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने तरीही आपलं पारडं जड ठेवलं. अगोदरच पक्षात गटातटाचे राजकारण असताना त्यातच विधानसभा निवडणुकीत शहर प्रमुखाने बंड पुकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता पुन्हा एक अंतर्गत वाद बाहेर पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेंनी मोठा निर्णय घेत पदांची नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्वेतील अंतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता खासदारांना विशेष लक्ष द्यावे लागतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती न बदलल्यास याचा फटका पक्षाला आणि लाभ मात्र इतरांना मिळू शकतो.

Internal dispute within Shinde’s Shivsena party in Kalyan East

Dombivali Ro Ro Boat ने होणार मुंबईचा प्रवास सोपा

Dombivali Ro Ro Boat : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यावरील वेळघेणी वाहतूक कोंडी यामुळं डोंबिवलीकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता लवकरच डोंबिवलीकरांना मुंबईचा प्रवास जलमार्गाने करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला असून प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने रो-रो बोटीने प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणारा असून सागरी परिवहन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही सिद्ध करू शकतो. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही मार्गिका कल्याण शहराला देखील जोडली जाऊ शकते. एका रो रो बोटमध्ये शेकडो प्रवासी आपल्या वाहनांसह प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा मुंबई ते भाईंदर येथे सुरू असून चारचाकी वाहन धारकांना २४० रुपये तर दुचाकी धारकांना ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. या प्रवासातून पैसे, वेळ, इंधनाची बचत होत असून वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त प्रवास डोंबिवलीकरांना करता येणार आहे. सागरी मार्गाने सुरू होणारी ही परिवहन सेवा येत्या काळात क्रांती घडवून आणू शकते.

Travel to Mumbai will be easier with Dombivali Ro Ro Boat

कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials

Vitthalwadi Police : पासपोर्ट पडताळणीसाठी आलेला निघाला बांगलादेशी

Vitthalwadi Police : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात १५ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. जोहरुल शेख (वय ३३ वर्षे) हा इसम बांगलादेशहुन घुसखोरी करून भारतात शिरला होता. पासपोर्ट पडताळणी करिता बनावट कागदपत्रांसह सदर इसम पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात आला असता त्याच्याजवळ असलेल्या बनावट कागदपत्रांमुळे तो पकडला गेला. यानंतर तो भारतीय नसून बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.

विठ्ठलवाडी पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात नियमितपणे काम करणाऱ्या महेंद्र भोई, दिनेश शिर्के, चेतन खांबेकर, संतोष कुडले या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर शनिवारी एक इसम कागदपत्रे घेऊन पासपोर्ट पडताळणी करिता आला होता. सदर इसमाला हिंदी भाषा येत नसल्याने तो बंगालीतच बोलत होता. त्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये पोलिसांना त्याने दिलेला जन्म दाखला संशयास्पद आढळून आला. सातवी शिकलेल्या जोहरुलने स्वतःच्या हाताने तो बनवला असावा असा संशय पोलिसांना आला. शिवाय जन्म दाखल्याचा कागद हा त्याच्या जन्माच्या वेळीचाही वाटत नव्हता. हाच नवा कोरा बनावट जन्मदाखला पोलीसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी जोहरुलची झाडाझडती सुरू केली.

जोहरुल बंगालीत बोलत असल्याने पोलिसांनी तात्काळ बंगाली भाषिकाला बोलावून घेतले. जोहरूलचा मोबाईल फोन तपासला असता त्यात बांगलादेशी नंबर आढळून आले. व्हॉट्सअप वरूनच अगोदर डाईल केलेल्या नंबरवर पुन्हा कॉल केले असता समोरून सदर इसम बांगलादेशी असल्याचे सांगत त्याचा पत्ताही पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेत त्याचा पुढील तपास सुरू केला आहे.

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरी वाढली असून कोलकत्तासह मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने हे आश्रय घेत आहेत. आशेळे, माणेरे तसेच कल्याण शहराबाहेर असलेल्या ग्रामीण पट्ट्यात नव्याने उभ्या राहणाऱ्या चाळींमध्ये हे बांगलादेशी आश्रय घेत असल्याच्या जोरदर चर्चा आहेत. असे असल्यास अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवली असण्याची शक्यताही आहे. असाच एक इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. असे अजून किती बांगलादेशी शहरात लपले आहेत याची विशेष शोधमोहीम तसेच जनजागृती करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

Vitthalwadi Police : Bangladeshi intruder arrested during passport verification

ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील EVM मशिन्सची होणार Checking

EVM Checking : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक उमेदवारांनी निकलांवर संशय व्यक्त करून ईव्हीएम मशीनच्या तपासणीची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असणारा भरणा देखील त्यांनी केलेला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांतील ईव्हीएम मशिन्सची पडताळणी १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणीची मागणी करणाऱ्या पराभूत उमेदवारांसह बैठक आयोजित करण्यात आली होती.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रँट मेमरी/मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात बेल कंपनीच्या नियोजनावर आज बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर (BEL) यांच्याकडून तपासणी व पडताळणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रतिनिधी व उमेदवारांना समजावून सांगण्यात आली.

आयोजित बैठकीत उमेदवारांनी एकमताने या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण त्रुटींची आणि अनुत्तरित प्रश्नांची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. उमेदवारांना अपेक्षित असलेली पारदर्शक प्रक्रिया नसेल किंवा त्यांच्या शंकांचे समाधान न झाल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल असाही ईशारा यावेळी उमेदवारांकडून देण्यात आला.

उमेदवारांच्या मागणीनुसार पडताळणी केली जाणारे विधानसभा क्षेत्र :-

1धनंजय बोडारे १४२, कल्याण पूर्व
2सचिन बासरे१३८, कल्याण पश्चिम
3राजू पाटील, सुभाष भोईर१४४, कल्याण ग्रामीण
4दीपेश म्हात्रे१४३, डोंबिवली
5सुभाष पवार१३९, मुरबाड
6पांडुरंग बरोरा १३५, शहापूर
7राजन विचारे१४८, ठाणे
8केदार दिघे१४७, कोपरी पाचपाखाडी
9मनोहर मढवी१५०, ऐरोली
10संदीप नाईक१५१, बेलापूर

शिवसेना उबाठा पक्षाचे डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे काय म्हणाले? पहा खालील लिंकवर

https://www.facebook.com/share/r/1N1rML3Fub

Checking of EVM machines in Assembly elections in Thane district will be start from February 10

Ganesh Vidya Mandir शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

Ganesh Vidya Mandir : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १४ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. यानंतर आता १८ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा आंध्र प्रदेश येथे व १४ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे. या दोन्ही वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कल्याणच्या गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले असून ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या १८ वयोगटा खालील संघात गितेश काकडे व लवेश क्षेत्री तर १४ वर्षाखालील संघात साईराज मळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नागरीक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षणासह त्यांचे कला,गुण व खेळाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी मोठी मजल मारतात अशा भावना यावेळी शाळेचे शिक्षक मिलिंद धंबा यांनी व्यक्त केल्या. सदर विद्यार्थ्यांना त्यांनी लंगडी खेळ तसेच स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असून ते स्वतः लंगडीचे राज्य पंच आहेत.

शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, सेक्रेटरी दीपक पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली शेनवी यांच्यासह प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रवीण खाडे, कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले गितेश काकडे, लवेश क्षेत्री, साईराज मळेकर व मार्गदर्शक शिक्षक मिलिंद धंबा यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Selection of students from Ganesh Vidya Mandir School in Maharashtra Langdi team