MSRTC Union : रापम ठाणे विभागात एकनाथ शिंदेंच्या कामगार संघटनेचा झंझावात

MSRTC Union : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी व वाडा आगारानंतर मुरबाड व शहापूर आगारात एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेने जोरदार संघटना बांधणी केली आहे. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळामध्ये सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये सभासद वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्यानेच मुरबाड शहापूर आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मुरबाड आगारात एकनाथ शांताराम मोरे, जितेंद्र भराडे, रामचंद्र खुडके, संतोष हेमाडे, जिवन कापडी, अमोल देशमुख व अशोक पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहापूर आगारात रमेश कुडव, राजेंद्र विशे, रोहिदास भालके, राहुल पडवळ, रविंद्र जागले, शशिकांत धापटे, जब्बार पठाण, प्रविण पाटोळे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोहकरे, विजय घुडे, बाबुराव मोजे, दिनेश भोजणे आदींनी प्रवेश केला.

संघटना प्रवेशदरम्यान पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, स्वप्नील गुरव, योगेंद्र कदम, गणेश तावडे, नितीन खंडागळे, प्रभाकर कानगुले व बाळू शरणागत यांनी मुरबाड व शहापूर आगारात दौऱ्या दरम्यान भेट दिली. आगारातील कामगाराच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे सांगितली असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम यांनी एमएच मराठीशी बोलताना दिली.

Eknath Shinde’s workers’ Union clash in MSRTC Thane division

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

उधारीच्या दुनियेतले साम्राज्य

उधार मागणे म्हणजे भीक मागणेच!

मिरची झोंबावी असं हे वाक्य आहे. होय पण हेच खरे आहे. उधार मागणे म्हणजे थोडक्यात तात्पुरत्या स्वरूपात मागितलेली भीकच. तात्पुरत्या का? तर आपण घेतलेले पैसे हे परत करणार असतो म्हणून. तात्पुरती पडलेली नड भागविण्यासाठी कुणाकडून तरी आपण कधी ना कधी पैसे घेत असतो. उधार घेणे हे काही गैर आहे हे असे अजिबात नाही. कारण प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा उधार घेण्याची गरज पडते. गडेगंज पैशावाल्या माणसालाही कोणत्यातरी गोष्टी साठी हात पसरावेच लागतात. पण जर काहींना ही उधारी मागण्याची सवय जडली असेल तर ती मात्र एक घाणेरडी सवय. आणि त्यात घेतलेले पैसे वेळेवर न देणे आणि समजा न देताच बुडवले तर? या सगळ्या उधारीच्या दुनियेची ही आज आपण गोष्ट करणार आहोत. अवश्य वाचा शेवट पर्यंत.

पूर्वीच्या काळी जगण्यासाठी माणूस स्वतः मेहनत करून स्वतःचे अन्न स्वतः मिळवत होता. मूलभूत गरजा भागविण्यासाठी पुढे प्रत्येकाने काम वाटून घेतले आणि एकमेकांना वस्तूंची आदान प्रदान केली. उदा.शेतकरी शेती करून पिकवलेले अन्नधान्य घेऊन शिंप्याकडे जाई आणि त्या बदल्यात कपडे घेई. शिंप्याला देखील कपड्याच्या बदल्यात अन्नधान्य मिळे. परंतु वस्तूंची किंमत कमी जास्त असल्याने पुढे चलन अस्तित्वात आले आणि इथूनच आले पैशाला महत्त्व.

पुढील अनेक वर्षे पैशाला फारसे मोल नव्हते. मात्र अलिकडल्या काळात पैशाला माणसापेक्षा जास्त किंमत आली आहे. श्रीमंत होण्यासाठी, सर्व सुविधांचा उपभोग घेण्यासाठी पैसा असणे महत्त्वाचे आहे हा समज आता रूढ झाला आहे. किंबहुना तो खराही आहे. ज्याच्याजवळ जितका पैसा तशी त्याची लाइफस्टाइल. यावरून श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग तयार झाले. आज आपण स्वतःला ने मिडल क्लास म्हणवतो त्यातही दोन प्रकार मोडतात. एक म्हणजे पैसा बाळगून असलेला आणि दुसरा कर्जबाजारी झालेला. आता याच दोघांमधील जो दुवा आहे त्याबद्दल थोडं बारीक समजून घेऊयात.

ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात असे लोक कधीही उधारी मागत नाहीत. पण काहीवेळेस चुकून समजा सोबत पैसे घ्यायला विसरले किंवा आजच्या ऑनलाइन युगात कोड स्कॅन करण्यासाठी काही अडथळा येत असेल तर अशा लोकांना नाईलाजाने उधारी घ्यावी लागते. पण अशा लोकांना डोळे झाकून उधारी देतात कारण लागलीच परत मिळण्याची खात्री असते. पण त्याचं काय ज्यांच्याकडे पैसाच नाही? परिस्थितीने जर डोके वर काढू दिले नसेल तर अशा व्यक्तीला उधारी मागण्याचा नाईलाज असतो. अर्थात सुरुवातीलाच आपण म्हटलो आहे की उधारी मागणे गैर नाही. मग नेमकं चुकीचं काय आहे? तर जाणून बुजून परिस्थिती स्वतः आपणहून खराब करणे आणि उधारी मागण्याची सवय लावून घेणे. याच प्रकारातल्या लोकांबद्दल थोडं माहीत करून घेणार आहोत.

आजच्या पुरता विचार करून जगणारे उधारीच्या मार्गावरून अजिबात हटत नाहीत. त्यांना या गोष्टीची कसलीही शरम नसते. किंवा त्यांना या गोष्टीची सवय लागलेली असते. याच जगण्याला ते जीवन मानतात. ते एक ना अनेक उधाऱ्या करून ठेवतात. शिवाय केलेल्या काही उधाऱ्या बुडवूनही टाकतात. यात काही हितसंबंध खराब तर करून घेतातच शिवाय नावालाही बट्टा लावून घेत नशिबाला दोष देतात. आपण जे करतोय ते चुकीचं आहे असे त्यांना कधीच वाटत नाही. परिस्थिती भाग पाडते अशी मनाची समजूत काढून ते आला दिवस लोटून देतात.

घेतलेले पैसे फेडण्यास असमर्थ ठरलेले काही लोक तर पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात. कर्ज कसे फेडू शकतो? याचे यांना काहीच माहीत नसते तात्पुरती नड भागावी हा एवढाच तात्पुरता विचार करून ते आणखीन एक डोंगर डोक्यावर चढवून ठेवतात. आणि मग होतं काय परिस्थिती आणखीन बिकट होत जाते. मग एक दिवस गोचिडाकडून गैरव्यवहारी कर्ज उचलावे लागते. गोचीड म्हणजे काय? तर अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देणारे मंडळी. लाखभर रुपयांची उचल केल्यानंतर 5-10% प्रतिमाह व्याजदराने हे पैसे देतात. त्याकरिता समोरच्याची किंमती वस्तू ठेऊन घेतात. कर्ज घेणारा एक रक्कमी कर्ज फेडू शकत नाही. बऱ्याचदा तर व्याजाचे पैसे फेडणेही त्याला अशक्य होऊन बसते. पुढे जाऊन त्या व्यक्तीकडून चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली प्रतिदिन व्याज लावले जाते. परतावा न केल्यास वस्तू ठेऊन घेणे, दमदाटी करणे, वेळ पडल्यास मारहाण करणे अशाही गोष्टी घडतात. बिचाऱ्याला पैसे फेडता न आल्याने त्याची वस्तूही हातातून निघून जाते. थोडक्यात पूर्वी जे जुलुमी सावकारी चालायची ती अजूनही काही ठिकाणी संपलेली नाही. नियमबाह्य पद्धतीने कसलेही गणिती ज्ञान नसलेले व्याजदर लावून फक्त लुटपाट केली जाते. म्हणून व्हायचं ते होऊद्यात पण अशा गोचिडाच्या तावडीत फसू नका. हळूहळू करून तुमचं रक्त पिणे हेच काम त्यांना ठाऊक असते.

अतिमहत्त्वाच्या विषयाकडे आपण आता आलेलो आहोत. आपल्याकडे कुटुंब पद्धत आहे. कुटुंब म्हणजे काय तर आई वडील भाऊ बहीण बायका मुलं. एका पूरुषाच्या खांद्यावर त्याचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते. आजच्या युगात तर महिलाही ती जबाबदारी उचलतात. आता या कुटुंब पद्धतीने जगत असताना प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी झटत असतो. भवितव्यासाठी, मुला, मुलींचे शिक्षण लग्न, दवाखाना, हौसमौज यासाठी पैसे उभे करीत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर तो कुटुंबाचे आर्थिक नियोजन करीत असतो. यात जर त्याच्याकडे एखाद्याने उधारी मागितली तर तो शक्य असेल तर देतोही. पण जर त्याला ती वेळेवर परत मिळाली नाही तर मात्र याचे नुकसान म्हणून त्याच्या कुटुंबाला ते सोसावे लागते. त्यामुळेच सर्वांचेच कुटुंब आहे. जो तो त्याचे नियोजन करीत असतो. तुमच्या उधारीमुळे नकळत तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबाचेही आर्थिक गणित बिघडवून टाकता.

याउलट काय करता येईल? तर सर्वप्रथम उधारी घेण्याची सवय सोडायला हवी. आधी घेतलेली उधारी परत करावी मग स्वतःची हौसमौज बघावी. कारण तुम्हाला पैसे देणारा लवकर परत मिळण्याची आस लावून असता. तुम्ही उधारी रखडवता म्हणजे उधार घेणाऱ्याला अंधारात ठेवता. तुम्हाला त्याने वेळेवर केलेल्या मदतीची जाण नसते. तुम्हाला तुमच्या निरर्थक गोष्टींवरचा खर्च बंद करावा लागेल. परिस्थिती बदले पर्यंत दिखाव्याच्या मागे न जाता अंथरून आहे तितकेच पाय पसरवावे. आणि दुसरीकडे चार पैसे कसे जास्त कमवता येतील यासाठी मेहनत करावी. इकडून तिकडून घेतलेले पैसे व्यवस्थित नियोजन करून परत करावे. ज्यादिवशी संपूर्ण देणी संपतील तेव्हा तुम्ही उधारी घेणारे नाही तर उधारी देणारे व्यक्ती बनला आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

आता इथे कुणालाही उधार देण्याची चूक करू नका. माणुसकी म्हणून तुम्ही दुसऱ्याला उधार देता. पण तुमचेच पैसे तुम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. तुम्ही कुणाची उधारी लांबवली असेल तर तुम्हाला नक्कीच ते माहीत असेल. जो व्यक्ती खूप उधाऱ्या करतो, बुडवतो, रखडवतो. पैसे न कमवता कशावरही उडवतो अशा व्यक्तीला उधारी बिलकुल देऊ नका. परिस्थिती खूपच बेताची असेल, खूपच अडचण असेल, परत मिळण्याची खात्री असेल आणि तुमच्याकडेही अतिरिक्त असतील तर माणुसकी म्हणून द्यायला हरकत नाही. पण उधारीची सवय असलेल्या उधारखोराला पैसे देण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही कष्टाने कमवता, तुमचे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी स्वतःला अडकवून घेऊ नका. हाताशी आलेला पैसा आजच्या पुरता विचार करून उडवू नका तो उद्यासाठी जपून ठेवा. कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही निदान इतके तरी पैसे जवळ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.

रमेश आणि सुरेश दोन मित्रांपैकी एका मित्राला रमेशला ४० हजार पगार आहे. आणि दुसऱ्या मित्राला सुरेशला त्याच्या निम्माच. पण गंमत अशी आहे की ४० हजार पगार असूनही तो महिन्याच्या शेवटी हजार रुपयांची उधारी हमखास बनवतोच. का बरं असे? वीस हजार पगार असणारा हजार रुपये उधारी कसे देऊ शकतो?

ज्याच्याकडे वीस हजार पगार आहे त्या सुरेशला उधारी मागणे पटत नाही. कुणापुढे हात पसरावे लागतील अशी वेळ येऊ नये याची तजवीज त्याने केलेली असते. दरमहा घरखर्चाला घरी दहा हजार रुपये देऊन त्याच्याकडे दहा हजार उरलेले असत. त्यातलेही तो पाच हजार स्वतःसाठी वापरी. त्यात मग त्याचे काही मजाहजा, खरेदी सगळं आलंच. आणि उरलेले पाच हजार तो पद्धतशीरपणे सेविंगला सोडत. रमेशचं मात्र तसं नाही. रमेशला पगार चाळीस हजार असला तरी महिन्याला त्याच्या सुट्ट्या होत असत. त्यामुळे तिथेच पाच हजार त्याचे कापले जाई. ज्या दिवशी सुट्ट्या होई तेव्हा रमेश कुठेतरी मजाहजा करण्यासाठी गेलेला असे. त्यामुळे त्याचे तिथे चार पाच हजार आरामात खर्च होई. पुढे रमेशची महागडी बाईक जीचा वापर फारसा होत नाही. कारण रमेश तर रेल्वेने प्रवास करी. सुट्टीच्याच दिवशी काय वापर होईल तेवढाच. बाकी ती बाईक फक्त हप्ते भरण्यासाठीच त्याने विकत घेतली समजा. आणखीन एक ईएमआय म्हणजे रमेशच्या खिशातल्या टॉप मॉडेल आयफोनचा. थोडी श्रीमंती दिसावी म्हणून रमेशने तोही हप्ता बांधलाच होता. सुरेश प्रमाणे घरात खरखर्चाला तोही दहा हजार देतच होता. आता त्याचं गणित कसं बिघडले बघा. सुट्ट्यांमुळे त्याच्या हातात येई 35 हजार. त्यातले हप्त्यांना गेले 15 हजार, घरात दिले 10 हजार. उरलेले 10 हजार रमेश असेच मजेहजेसाठी खर्च करी. मग ते स्टारबक्समध्ये जाऊन कोफी पिऊ, की बर्गर किंग मध्ये जाऊन पिझा चावू. का विकेंडला मित्रांमध्ये दोन दोन बडवायजर ढकलो. सोबत चकण्याला कबाब, तंदुरी, लॉलीपॉप. मज्जोनी लाईफ. अशी लाइफस्टाइल रमेश जगत असेल तर शेवटच्या विकेंडनंतर रमेश मोकळा होऊन जात. मग त्याला गरज पडे सुरेशची. मित्र पैशावाला आहे, शिवाय पगार झाला की आपल्याला फिक्स रिटर्न करणार यामुळे उधारी द्यायला काही चिंता नव्हती.

चिंता करावी तर रमेशनेच करावी. श्रीमंत दिसण्यावर व लाइफस्टाइल जगण्यावर तो जो काही खर्च करतोय तो त्याचा बेजबाबदारपणा आहे. पुढे जाऊन रमेश आणि सुरेश दोघांचीही नोकरी जाते. 5-5 हजार बाजूला काढून सुरेशकडे लाखभर रुपये जमलेले असतात. श्रीमंत लाइफस्टाइल साठी घालवलेल्या पैशामुळे मात्र रमेशच्या खात्यात फक्त चाळीस हजारच असतात. ईएमआय भरून घेतलेला आयफोन आता जुना झालेला असतो. अर्धी किंमतही द्यायला कुणी तयार नसतो. घेतलेली स्पोर्ट्स बाईक एवढं पेट्रोल पिते की रमेशला पायी पायी जाणं योग्य वाटायला लागतं. नवी नोकरी मिळेपर्यंत चाळीस हजारात कसे गुजराण करावे या विचारात रमेशला वेड लागायची पाळी येते. याउलट सुरेशचा कसलाही मोठा खर्च नसतो. शिवाय लाखभर रुपयात तो वर्षही आरामात काढू शकतो.

सांगायचं तात्पर्य हेच की आजचा विचार न करता उद्यासाठीची तजवीज करून ठेवा. वेळ काळ सांगून येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विचारांना मोठे करा. जीवनात चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी असतातच. सर्व गोष्टींची तयारी ठेवा. परिस्थिती बदलत नाही म्हणून नशिबाला दोष देऊन रडत बसू नका. ती बदलण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. सौ बात की एक बात, तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण तुम्ही आज जे काही करणार आहात त्याचेच परिणाम तुम्हाला उद्या दिसणार आहेत. धन्यवाद !!!

विचार पटले तर आचरणात आणून बदल बघा, नाहीतर आहे तसेच उधारी मागून रडत जगा.

टीप : या लेखातून आजच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. सत्य हे कडवट असल्यामुळे अनेकांना ह्या लेखामुळे कारल्याची चव चाखायला मिळाली असेल. म्हणजेच बोचलं असेल. हा लेख परिस्थितीमुळे हतबल होऊन उधारी घेणाऱ्यांसाठी नसून उधाऱ्या घेऊन स्वतःहूनच आपली परिस्थिती हतबल बनवणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी होता. बाकी तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा.

लग्न समारंभासाठी कल्याणहुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पती पत्नीसह चिमुरडीचा अपघात

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील नांदीवली येथे वास्तव्यास असणाऱ्या घुघे परिवाराचा सोमवारी दि.२० जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात झाला. अमोल घुघे (वय २५) हे आपली पत्नी प्रतीक्षा घुघे (वय २२) व आपली मुलगी स्वरा घुघे (वय ४) यांच्या समवेत कल्याणहून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांनी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती व त्याच रिक्षाने ते गावी निघाले होते. याचदरम्यान नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घुघे परिवार व त्यांच्या समवेत त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड (वय ६०), सासू कलावती आव्हाड (वय ५८) रिक्षाने प्रवास करीत होते. याचदरम्यान ओव्हरटेक करताना रिक्षाचालक अमोल यांना समोरून येणारा कंटेनर न दिसल्याने हा अपघात घडला. या अपघातात अमोल घुघे यांच्या सह त्यांची मुलगी स्वरा व त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी प्रतीक्षा घुघे व सासू कलावती आव्हाड या मायलेकी गंभीर जखमी असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (वय २८, झारखंड) हा सध्या वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत. मात्र झालेल्या अपघातानंतर घुघे व आव्हाड या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल हे एका नामांकित वित्तसंस्थेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होते. कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी नुकतीच १ जानेवारीला नवी रिक्षा खरेदी केली होती व याच रिक्षाने ते प्रवास करीत होते. दुर्दैवाने याच रिक्षाने त्यांच्या जीवन प्रवासाचाही शेवट ठरला. या दुर्घटनेमुळे नातेवाईक, शेजारीपाजारी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

A family traveling from Kalyan to Nashik died in an accident on the highway

वाडा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेना मध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रीय कर्मचारी सेना : ठाणे विभागातील वाडा आगारातील संपूर्ण कष्टकरी जनसंघ संघटना कार्यकारणी बरखास्त करून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या संघटना सध्या एसटी महामंडळामध्ये विश्वासास पात्र ठरली असून सभासद वाढीमध्ये धुमाकूळ घालणारी संघटना बनली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वाभिमानी कष्टकऱ्यांना हा एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम म्हणाले.

याप्रसंगी पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, सचिन पवार, स्वप्नील गुरव, हेमंत घुले, योगेंद्र कदम या पदाधिकाऱ्यांनी वाडा आगारात भेट दिली. आगारातील कामगारांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे देखील समजावून सांगितली. राष्ट्रीय कर्मचारी सेनेत आल्यानंतर मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या.

Wada ST Depot employees into Rashtriya Karmchari Sena
Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतुकीचा बदलणार चेहरामोहरा; MMRDA मुख्यालयात झाली आढावा बैठक

Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार शिंदे यांनी केल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या इतर रस्त्यांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. तसेच मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावाही घेण्यात आला.

बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का? याची चाचपणी करण्याची सूचना केली. तसेच कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची खासदार शिंदे यांनी सूचना केली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, शहरप्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

मागील काही काळापासून शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यादृष्टीने येथील वाहतुकीवर मोठा ताण आलेला आहे. शिवाय शहरातील वाहतुकीत जर बदल झाले नाहीत तर येत्या काळात रस्त्यांवर वाहने चालवणे अशक्य होऊन बसेल. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी असे बरेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी कंबर कसली असून आढावा बैठकीत त्यांनी कामाला वेग मिळण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत. अशी माहिती शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी दिली आहे.

Kalyan Development Plan : The face of traffic in Kalyan Lok Sabha area will change; A review meeting was held at MMRDA headquarters

New District in Maharashtra : राज्यात नव्याने होणार २१ नवे जिल्हे?

New District in Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. याकरिता राज्यात २१ नवे जिल्हे बनविणार असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याचा देखील समावेश असून आता लवकरच कल्याण हा नवा जिल्हा होण्याची शक्यता आहे. याबाबत २६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. त्यामुळे २६ जानेवारी नंतर राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ हुन ५७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून, कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलिस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून, कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे या अगोदरही विभाजन होऊन पालघर जिल्हा वेगळा झाला होता. त्याच पालघर मधून जव्हार देखील अलिप्त होण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. तसेच ठाण्यातून कल्याण व मीरा भाईंदर देखील वेगळे होण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे मागील काही वर्षांत पाच भागांत विभाजन होत असल्याचे पहायला मिळत आहे. कल्याण सह आणखीन २० नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव असून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी शक्यता दरवर्षी वर्तवण्यात येते परंतु प्रत्यक्षात घोषणा मात्र केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावित २१ नवे जिल्हे:-
कल्याण (ठाणे), मीरा भाईंदर (ठाणे), जव्हार (पालघर), महाड (रायगड), बारामती (पुणे), मंडणगड (महाड), माणदेश (सांगली,सातारा,कोल्हापूर), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), किनवट (नांदेड), खामगाव (बुलडाणा), पुसद (यवतमाळ), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली).

New District in Maharashtra : Will there be 21 new districts in the state?

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राजेश दाखिनकर यांनी व्यक्त केला तीव्र शब्दांत निषेध

कल्याण : नागपूर सभागृहात काही दिवसांपूर्वी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य करताना अरुण गवळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. १९९९ साली विधानभवनात अरुण गवळी यांच्या शेजारी कुणीही बसत नव्हते त्याचप्रमाणे उद्या वाल्मिक कराड आले तर नवीन काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र त्यांच्या या विधानावर आता अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेने मात्र तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अरुण गवळी हे २००४ साली निवडणुक जिंकून विधानसभा सदस्य झाले होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळेच लोकांनी त्यांना निवडून दिले होते असेहि ते म्हणतात. नुकतेच नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा गवळी समर्थकांनी तसेच त्यांच्या पक्षाने अखिल भारतीय सेनेने निषेध नोंदवला असून नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांनीही पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांनी देखील नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नाना पटोले यांनी स्वतःची पायरी ओळखून अशी वक्तव्य करावीत, डॅडींचं नाव घेऊन राजकारण करू नये, पुन्हा अशी वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरून उत्तर देऊ असा ईशारा यावेळी दाखिनकर यांनी दिला आहे. नाना पटोले यांनीच काँग्रेसचे वाटोळे केले आहे असे विधान करीत राजेश दाखिनकर यांनी नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात असून नागपूर खंडपीठाने त्यांची २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. त्यामुळे लवकरच ते स्वगृही परतणार आहेत.

Rajesh Dakhinkar strongly condemned Nana Patole’s statement