कल्याणमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हडिओमध्ये आशिष चौधरी नामक इसम आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करताना दिसत आहे. आणि हीच व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या मुलाची जवळपास ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी याने १९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालय, पोलीस महा संचालक आणि संबंधी सरकारी यंत्रणांना तक्रार केली आहे. त्याच मे महिन्यातील हा व्हिडियो असून २०१९ च्या कल्याण पूर्व विधान सभेत काही ठिकाणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला आहे आणि याबदल्यात ५० लाख रुपये मिळाले होते असे त्याने म्हटले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडियोत दावा करणाऱ्या आशिष चौधरीने आपल्या मूलाची ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडियोची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करत असल्या बाबत पोलिसात तक्रार
आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर ब होणे गरजेचे आहे यासाठी शुक्रवारी पोलिस उपायुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितलं.
ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे. आतापर्यंत १३५ करोड लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात असलेल्या संशयाला आणि चर्चेला हॅकरने सिद्ध करून दाखवले आहे. लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास गोपाळ लांडगे ( कल्याण जिल्हा प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.
-रोशन उबाळे
