कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणमध्ये नारायण राणें विरोधात पेटून उठली शिवसेना; तीव्र आंदोलनात पुतळा, चपला आणि कोंबड्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या मध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरू होत्या. मात्र आता हा वाद विकोपाला गेला असून टीकेची पातळी देखील खालावताना दिसतेय. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली जात आहेत. कल्याण मध्येही विविध ठिकाणी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने करीत राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

एकेकाळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केलेले नारायण राणे हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे जन आशीर्वाद यात्रेवर असल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. शेवटी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली आहेत. कल्याण मध्ये शिवसेनेचे मोठे वर्चस्व असल्याने या शहरात देखील या आंदोलनाचे तीव्र असे पडसाद उमटले आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ही आंदोलने करण्यात आली.

कल्याण मध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यालयाचे नुकसान केल्याचे समोर आले. डोंबिवलीत देखील शिवसेनेकडून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. तर दुसरीकडे शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत शिवसेना शाखेसमोर राणें विरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त करण्यात आला. तर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरही शिवसैनिक एकवटले होते. यावेळी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा झोड देण्यात आला. तसेच या आंदोलनात कोंबड्या दाखवून निषेध करण्यात आला.

एकीकडे इंधनाचे दर आणि महागाई प्रचंड वाढली आहे आणि हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. या जन आशीर्वाद यात्रा नसून जन शाप यात्रा आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी कल्याण मध्ये येऊन यात्रा काढून दाखवाव्यात असे खुले आव्हान महेश गायकवाड यांनी राणे यांच्यावरील रोष व्यक्त करताना दिले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर भाजप कार्यालयाची नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नारायण राणें विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले. याचदरम्यान राणे यांनी अटकपूर्व जामीन देखील केला होता. मात्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांनी आता नारायण राणेंना अटक केली आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *