कल्याण-डोंबिवली घडामोडी

लालचौकी येथील सिग्नलचा खांबाआड लपंडाव; मनसेने चिटकवले खांबाला स्टिकर

कल्याण : लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात  आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने  दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *