येत्या आठ दिवसांत केडीएमसीकडून ठोस आश्वासन न मिळाल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड मध्ये बाधित होणाऱ्या फ्रेंड्स कॉलोनीतील रहिवाशांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र वारंवार निवेदन देऊन सुद्धा पालिकेच्या वतीने या घरांवर कारवाई न होण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने यासाठी जवाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता वनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.
त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अमनवजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मात्र वारंवार निवेदन देऊन देखील ठोस आश्वसन मिळत नसल्याने येत्या आठ दिवसांत येथील रस्त्याबाबत निणर्य न झाल्यास कार्यकारी अभियंता सुनिल जोशी आणि उप अभियंता प्रशांत भुजबळ यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, सबंधित अभियंत्यांना नागरिकांच्या मागणीची पडताळणी करण्यास सांगितले असून, अलाईन्मेंट मध्ये काही बदल करून जर नागरिकांची घरे वाचवता येत असतील तर तसा आम्ही प्रयत्न करू त्याबद्दलच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना केल्या असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली.
-कुणाल म्हात्रे