दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मानवी साखळीद्वारे कल्याणमध्ये मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.

कल्याण पश्चिमेत सर्वपक्षीय नेते एकवटले

दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर,  गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर,  शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचा सहभाग

विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी देखील या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. हातात पोस्टर घेऊन ते स्वतः मानवी साखळीत जोडले गेले होते. मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.

मा.नगरसेवक कुणाल पाटील आंदोलनात सहभागी

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्कीनाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली भागात ८३.५ मीमी पावसाची नोंद ; पालिका आयुक्तांची दिवसभर कंट्रोल रूममध्ये निगराणी

परवा रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काल दुपारी १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात ८३.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागक्षेत्र अधिका-यांनी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आपापल्या मनुष्य बळाच्या सहायाने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. यामध्ये कल्याण (प) छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण पूर्व मधील दामोदर नगर, डोंबिवली पूर्व स्थानक परिसर येथील सखल भागात साचलेले पाणी मनुष्यबळ लावून, मॅनहोल चेंबर साफ करून त्याचप्रमाणे जेसीबी चा वापर करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. धोकादायक इमारती कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून सदर इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ प्रभागातील २ अतिधोकादायक इमारतीमधील २८ नागरिक स्थलांतरीत करण्यात आले. ‘ह’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैंकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. त्यापैकी ५ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या व ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘अ’ प्रभागात १ अतिधोकादायक इमारत असून सदर इमारत रहिवास मुक्त करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील २०१ प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या ५५१ सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून महापालिका आयुक्तांनी तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.

-संतोष दिवाडकर

एक लाख रुपयांसाठी सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण ; दोनच दिवसांत पाच जणांना ठोकल्या बेड्या

एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या आत परत मिळविण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे. हद्दीत फिर्यादी सुनिता राजकुमार नाथ वय ३० वर्षे राहणार कल्याण मुळ रा. हाजीपुर, पटना, बिहार राज्य ह्या ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महंमद अली चौक, शिवमंदिराच्या बाजुस एका दुकानाच्या बाहेर त्याच्या ६ महिन्यांच्या मुलांसह झोपल्या असतांना रात्री १० ते १ च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुनिता यांच्याजवळ झोपलेले त्यांचे ६ महिन्यांचे लहान बाळ जिवा याचे अपहरण केले होते. याबाबत ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सपोनि सरोदे, सपोनि पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या मदतीने तांत्रीक तपास करुन या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्याप्रमाणे आरोपींचा कसोशिने व चिकाटीने शोध घेवुन आरोपी विशाल चंद्रकांत त्र्यंबके वय २० वर्षे आटाळी आंबिवली,  कुणाल विष्णु कोट वय २३ वर्षे रा.साई राणा चाळ,दिवा पुर्व, आरती कुणाल कोट वय २२ वर्षे,  हिना फरहान माजीद वय २६ वर्षे रा. कोटर मशिद जवळ, भिवंडी,  फरहान अब्दुल रझाक माजीद वय ३८ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन अपहरण केलेले ६ महिन्याचे बाळ ४८ तासाच्या  आत सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट हे काही कामधंदा करीत नाहीत. आरोपींनी आपसात संगनमत करुन आरोपी  हिना माजीद आणि फरहान माजीद यांना लहान बाळ  एक लाख रुपयांना विकण्यासाठी आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट यांनी फिर्यादी जवळ झोपलेले लहान बाळ अलगद उचलुन त्याचे अपहरण करुन ते आरोपी आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरतीने हे बाळ आरोपी हिना माजीद व फरहान माजीद यांच्या ताब्यात देवुन ते तिघेही रिक्षातुन बाळाला घेवुन जात असतांना त्यांना शिताफीने अटक करुन त्यांच्या ताब्यातुन बाळ सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी हिना व फरहान माजीद हे गुन्हयात निष्पन्न झालेल्या पाहीजे असलेल्या आरोपी महीलेला हे बाळ विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या पाहीजे असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तर या पाचही आरोपींना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ जून पर्यंत पोलीस कोठडीमध्य रवानगी केली आहे.

सदरची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, प्रकाश पाटील, पोउनि संजय जगताप, सपोउनि जे.के.शिंदे, पोहवा निकाळे, भालेराव,पोना ठिकेकर, भालेराव,  भोईर, हासे, मधाळे, पोशि जाधव, निसार पिंजारी यांनी केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ढोले हे करीत आहेत.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा ; मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण पूर्वेतील आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील वाचणार आहे.  

नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आडीवली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगपती विजय भाने, माजी नगरसेवक गणेश भाने, माजी सरपंच बळीराम भाने, समाजसेवक अनिल पाटील,   माजी उपसरपंच वासुदेव गायकर, केशव भाने, पंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागातील द्वारली आरोग्य उपकेंद्र याठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरु झाले असून आता आडीवली येथे देखील लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे. यामध्ये डुरक्या घोणस, २ धामण, धूळ नागीण आणि दिवड  या सापांचा समावेश आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर या दोघांनी हि कामगिरी केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील बितुल सोसयटी परिसरात भक्ष्य गिळंकुत करण्याच्या तयारीत असलेल्या साडेचार फुटी लांब सापाला पाहुन पाहणाऱ्याची भांबेरी उडली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डुरक्या साप आपले भक्ष्य उंदीर गिळंकृत करण्याच्या स्थितीत आढळल्याने बाघ्याची भितीने धादंल उडली स्थानिक रहिवाशी वाजपेयी यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत डुरक्या या साडे चार फुटी घोणस सापास पकडले.

  डुरक्या सापाचे वैशिष्ट्य असे की  उंदीर, घुशी, सरडे यांना पकडल्या नंतर आवळुन त्यांचा श्वास बंद झाल्यानंतर भक्ष्य गिळंकृत करतो हा घोणस प्रकारात मोडत असून बिनविषारी साप आहे. या  डुरक्या सापाबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी उपस्थितीता मध्ये जन जागृती करीत जीवनदान दिलेल्या डुरक्या सापास वनपाल एम्. डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.

       तर खडकपाडा प्रफुल सोसायटीमध्ये दिवड साप, उंबर्डे गावांमध्ये आठ-नऊ फुटाची धामण तर सापर्डे गावामध्ये धूळ नागीन मिळाली असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची आरपीआयची मागणी

पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणी आरपीआयने केली असून याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

      पदोन्नतीमध्ये आरक्षण मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणीसाठी आरपीआयच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत हि मागणी राज्यसरकारकडे पाठविण्याची विनंती केली.

-कुणाल म्हात्रे

क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे – सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

“क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, ३० मे, २०२१ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. संत निरंकारी मिशनच्या वेबसाईट द्वारे या समागमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

      उल्लेखनीय आहे, की मागील २३ मे पासून सद्गुरु माता सुदीक्षाजी आठवड्यातून तीन वेळा आपले पावन दर्शन व आशीर्वाद व्हर्च्युअल संत समागमांच्या माध्यमातून प्रदान करत आहेत.

      सद्गुरु माताजी यांनी एका उदाहरणाद्वारे समजावले, की जर आपल्या पापणीचा केस डोळ्यात गेला तर डोळ्याला खूप त्रास होतो. प्रयत्न करुन तो केस काढला तरी काही काळ डोळ्याची चुरचूर चालूच राहते. अशाच प्रकारे जेव्हा आपण एखाद्याला कठोर वचन बोलतो आणि नंतर जरी त्याची माफी मागीतली तरी त्या व्यक्तीच्या मनाला झालेली वेदना दूर होत नाही. म्हणून आपण गोड आणि प्रिय वाणीने प्रत्येकाच्या हृदयामध्ये सकारात्मक जागा तयार करायची आहे.

            विविध देशांतील वक्त्यांबरोबरच मुंबईतील काही वक्त्यांनाही या समागमामध्ये आपले भाव व्यक्त करण्याची संधी मिळाली.

-कुणाल म्हात्रे

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी सुराज्य अभियान केली मागणीहिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर विषय संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे.

महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांतील एकूण ११  ठिकाणी वर्ष 2019-20 मध्ये ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होती; मात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीत. परिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे.    घरे, फळबागा, शेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती ‘फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असता. तरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे, अनिल परब, डॉ. उदय सामंत आणि दादा भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मधील कला शिक्षकाने अवघ्या दिड तासात रेखाटले शिवचरित्र

छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त कल्याण येथील कला शिक्षक सुधाकर भामरे यांनी अवघ्या दीड तासात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतच्या प्रसंगांची ३२  रेखाटनांआधारे शिवचरित्र रेखाटण्याचा विक्रम केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून शिवाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटले आहे. या सर्वांची नोंद नॅशनल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

भामरे यांना ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी यांच्या कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. भामरे यांचे रेखाटन सुरू असतांना त्यांचे चित्रकार मित्र आनंद मेहेर यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले. विविध कलागुण असलेले सुधाकर भामरे हे २१ वर्षांपासून एल. के. हायस्कुल, चुनाभट्टी या शाळेत कलाशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. कलेवर नित्तान्त श्रद्धा असेल भामरे हे सुरवातीला थर्मोकोल पासून मूर्ती बनविण्याचे काम करत होते. त्यातही त्यांनी उंच उंच अशा साई बाबा, स्वामी विवेकानंद, गणपती बाप्पाची विविध रूपे अशा अनेक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत. विविध गणपती सजावटी ही त्यांनी केलेल्या आहेत.

 व्यक्तिचित्रण (पोट्रेट) मध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पोट्रेट बनवलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जागतिक कीर्तीचे वकील उज्ज्वल निकम, कल्याणचे नगरसेवक रवी पाटील, समाजसेवक विकास पाटील आशा अनेक व्यक्तींचे पोट्रेट त्यांनी बनून त्यांना प्रत्यक्ष भेट म्हणून ही दिली आहेत.

सर्वसाधारण कुटुंबातून आपल्या अंगभूत कलागुणांच्या ताकदीने ते इथपर्यंत पोहचू शकले आहेत. कलेची कास असलेला हाडाचा, सहृदयी कलाशिक्षक त्यांच्यात पाहावयास मिळतो. त्याचे उदाहरण म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत कलेचे शिक्षण दिले आहे.  त्या सर्व विद्यार्थांनी उत्तम कामगिरी करत कला विषयांच्या विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश ही संपादन केले आहे. त्यांची ही उत्तम कलोपासना पाहून तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री वसंत पुरके यांनी अभिनदांचे पत्र देऊन त्यांच्या कलासेवेचे कौतुक करत इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रकल्पामध्ये मित्र आनंद मेहेर यांनी मोलाची साथ दिली.

-कुणाल म्हात्रे

वाढत्या महागाई संदर्भात मोदी सरकार विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने आज कल्याणमध्ये पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आज आपल्या देशावर कोरोना महामारीचे मोठे संकट असूनही केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कल्याण शहर काँग्रेस तर्फे आज पेट्रोल डिझेल वाढीबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री मोदी यांचा निषेध करण्यात आला.

केंद्रामध्ये भाजपा सत्ता येण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा डिझेल आणि पेट्रोल भावाबद्दल मोदींकडून मोठमोठे वायदे केले जात होते. २०१४ साली भाजपा सत्तेत येण्यापूर्वी ६० रुपये असणाऱ्या पेट्रोलने आज शंभरी पार केली आहे. ‘महंगाई बड रही है ।पेट्रोल सस्ता हुआ क्या?’ असे भारतातील जनतेला सांगणाऱ्या मोदी सरकारने आज पेट्रोलची शंभरी पार केली आहे. अनेक विरोधी पक्षाने केंद्र सरकारला “जुमला” सरकार असे नामकरण केले आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांची दिशाभूल करून, सत्तेवर आलेले भाजपाचे केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेल ,गॅस वाढ करून गोरगरीब नागरिकांना महागाईच्या खाईत नेऊन सोडले आहे असे राज्यभरात चाललेल्या काँग्रेस आंदोलनातून निषेध व्यक्त करत बोलण्यात आले.

“वाह रे मोदी तेरा खेल…सोने के दाम से मिलेगा तेल”! , असे स्लोगन देऊन कल्याण शहर काँग्रेस तर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ह्या वेळी प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी,महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, युवक अध्यक्ष मनीष देसले,सेवादल अध्यक्ष लालचंद तिवारी,अल्पसंख्यांक अध्यक्ष सलीम शेख,ब्लॉक अध्यक्ष शकील खान,भुपेश सिंग,विमल ठक्कर,नावेंदू पठारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-शरद शिंदे