परराज्यातून कल्याण डोंबिवलीत येणा-या नागरिकांना ॲन्टीजेन टेस्ट शिवाय एन्ट्री नाही ; महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची सख्त भूमिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांनी अगोदर ॲन्टीजेन टेस्ट करावी मगच शहरात यावे अशी सख्त भूमिका पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. असे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी आज दिली आहे.

परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक
कोणत्याही प्रकारची कोविडची टेस्ट न करताच शहरात दाखल होत असल्याची बाब निदर्शनास येताच आज महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याचे वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. ११ एप्रिल रोजी २४०० पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २०० पर्यंत आलेली आहे. आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन यांचे समवेत पाहणी करून परराज्यातून येणाऱ्या तसेच प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. कल्याण रेल्वे स्थानकावर आता ३ ते ४ ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असे ते पुढे म्हणाले.

‘ब्रेक द चेन’ च्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना शहरात घेतले जाईल. तसेच “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे असेही उद्गार रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी यावेळी काढले.

या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, आरपीएफ कमांडंट शहेनशहा, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर ,स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन,महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील,क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असाच काहीसा उपाय सुचवला होता. असाच पेटर्न आता कल्याणमध्ये आयुक्त विजय सूर्यवंशी राबवत आहेत असे म्हणता येईल.

कापूराचं झाडं अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का????
पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही. 
   सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.
    
     सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो. 
     
    आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
    
    आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.
    
त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.
    
   तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको. 


प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३.

रस्त्यावर बेफिकीरपणे मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाया सुरू करा ; क.डों.म.पा. आयुक्तांचे निर्देश

कल्याण-डोंबिवली महापालिका परीक्षेत्रात येत्या १५ दिवसात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणेबाबत आज सकाळी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकाना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अशा बेफिकीर लोकांवर कारवाया देखील सुरू करा असे निर्देश आता महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी. असे डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यामुळे सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी. अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.

सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे त्यामुळे १५ दिवस सर्वांनी कडक लॉकडाउनचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. सकाळी ११ नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी असेही ते म्हणाले. वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या विभागात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाहणी करावी. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.

लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते. अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल तर ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे सदर भाजी मार्केट चे नियोजन अन्यत्र विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर रेस्टॉरंट मध्ये लोक उभे राहून खातांना दिसून येतात. तसेच स्टेशनबाहेर सकाळी ११ नंतर देखील फेरीवाले दिसून येतात अशी माहिती सहा.आयुक्त अनिल पोवार यांनी दिली असता रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले . ११ एप्रिलला रुग्ण संख्या २४०० झाली होती. आता आठवड्याभरात दिवसाला ५०० पर्यंत खाली आली. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात रुग्ण संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. सकाळी ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.

सदर बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कल्याण परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण व डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, परिमंडळ – ३ अंतर्गत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

“मला कोविड सेंटरमध्ये बिनपगारी काम द्या” – पत्रकाराची प्रशासनाकडे अजब मागणी

मुरबाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरम्यान याच तालुक्यातील पत्रकार जीवन शिंदे यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्याची मागणी प्रशासनाकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. मला मानधन दिले नाही तरी चालेल पण सेवेत घ्या असेही त्यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. मात्र पत्रकार जीवन शिंदे यांच्या या अजब मागणीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याचबरोबर मृत्युदर देखील चिंतेचा विषय बनू लागला आहे. व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर या सर्व समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मुरबाडचे पत्रकार जीवन शिंदे यांनी मुरबाड तहसीलदार, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये काम मिळावे अशी मागणी केली आहे. याचबरोबर मी विना मोबदला काम करायला तयार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. एक पत्रकार कोविड हॉस्पिटलमध्ये विना मोबदला काम करण्याची का इच्छा करतोय ? या विचारात प्रशासनातील एक वर्ग पडला असल्याचे सध्या दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्तर प्रशासनाने जीवन शिंदे यांना अध्याप दिलेले नाही. पत्रकाराची मागणी ही प्रशासना समोर एक प्रकारचे आव्हानच असेल असा सूर समाज माध्यमांवर लावला जातोय.

मृत्यू दर वाढण्याला ‘या’ दोन गोष्टी कारणीभूत; भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली क.डों.म.पा. आयुक्तांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज क.डों.म.पा. क्षेत्रातील काही रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या नंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मृत्यू दर वाढण्याबाबत कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते सांगितले. त्याचबरोबर राज्यसरकारवर टीकास्त्र डागले.

क.डों.म.पा. क्षेत्रात कडक निर्बंधांनंतर कोरोना काहीसा आटोक्यात येत असल्याचे आकडे सांगत आहेत. मात्र मागील महिन्याभरा पासून मृत्यू दर हा काहीसा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णांना जाणवणाऱ्या समस्यां बद्दल त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा ५०% होत आहे आणि रेमडेसिवीरचा पुरवठा २५% होत आहे. ही दोन कारने मृत्यू दर वाढण्याला जबाबदार आहेत असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज (दि.२९ एप्रिल २१) रोजी १० रुग्ण दगावले आहेत. तर ८३५ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याच बरोबर १५४६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या आकडेवारी नुसार सध्या महापालिका क्षेत्रात एकूण १२७३४ संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

वांगणीच्या मयुरची कल्याण पूर्व आमदारांनीही घेतली भेट

मागील काही दिवसांपूर्वी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाचे प्राण वाचवणारा युवक आज देशभरात गाजत आहे. मयूर शेळके या युवकावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील आज मयुरची भेट घेतली. तसेच त्याला बक्षीस स्वरूपात एक धनादेश देखील सुपूर्द केला.

एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा ट्रेक वर पडला. त्याचवेळी एक एक्स्प्रेस तिथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने या मुलाचे अतिशय फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र अशाही परिस्थितीत मयूरने त्याचे प्राण वाचवले.

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी आज मयुरची भेट घेतली. त्याने केलेल्या कामगिरी बद्दल स्वतः आमदारांनी त्याची भेट घेऊन त्याच्याशी बातचीत देखील केली. तसेच त्याचा सन्मान करीत त्याला शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आमदारांनी मयूरला एक धनादेश बक्षीस म्हणून सुपूर्द केला. अश्या माणसांचे कौतुक करावे तितकेच कमी अशी भावना कल्याण पूर्व आमदारांनी भेट नंतर व्यक्त केली.

“मयूर शेळके याने केलेले धाडस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्याने केलेल्या शौऱ्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत. मयुरचा या अद्भुत कामगिरी आणि पराक्रमाबद्दल त्याची भेट घेऊन त्याला सन्मानित करण्यात आले.”

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)

मयूर शेळके याला रेल्वे कडून देखील ५०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनद्वारे त्याच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मयुरची भेट घेत सन्मान केला. जावा कंपनीने देखील मयुरला एक बाईक गिफ्ट केली आहे. व त्यानंतर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील मयुरला सन्मानित केले आहे. त्यामुळे मयूरच्या सन्मानासाठी सर्वच राजकीय पक्ष, उद्योजक तसेच संस्था पुढे सरसावताना पाहायला मिळाले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आठवड्याभरात कोरोनाने ‘इतके’ मृत्यू

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पुन्हा उसळी घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या आठवड्यात रविवार दि.१८ एप्रिल ते शनविवर दि.२४ एप्रिल पर्यंत ५८ रुग्ण कोरोनाने दगावल्याची नोंद झाली असून ही चिंतेची बाब बनली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यसरकारने ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रभर कडक निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी विशेष काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, इंजेक्शन आणि आता तर लसींचाही तुटवडा भासू लागलेला आहे. अशातच क.डों.म.पा. क्षेत्रात मृत्यू दर देखील हळूहळू वाढू लागला आहे. कोरोना आजार बरा होण्याचे प्रमाण जास्त असले तरी नागरिकांनी लक्षण जाणवताच फार वेळ न घालवता चाचणी करून उपचार सुरू करावे असे आवाहन आता काही डॉक्टर देखील करीत आहेत.

साधारण वर्षभरापासून महानगरपालिका क्षेत्रात दिवसाला ५ पेक्षा कमी रुग्ण दगावत होते. काही दिवशी एखादा रुग्ण तर काही दिवशी पाच. तर असेही काही दिवस होते ज्यादिवशी एकही रुग्ण दगावला नसेल. मात्र आता दिवसाला १० पेक्षा अधिक रुग्ण दगवण्याचे चित्र दिसू लागले आहे.

आठवड्याभरात दगावलेले रुग्ण :-

दि.१८ रविवार – ५ रुग्ण
दि.१९ सोमवार – ७ रुग्ण
दि.२० मंगळवार – ६ रुग्ण
दि.२१ बुधवार – ८ रुग्ण
दि.२२ गुरुवार – ९ रुग्ण
दि.२३ शुक्रवार – १२ रुग्ण
दि.२४ शनिवार – ११ रुग्ण

क.डों.म.पा. क्षेत्रात याच आठवड्यात जितक्या लोकांना कोरोनाची लागण झाली तितकेच प्रमाण बरे होणाऱ्या रुग्णांचे देखील आहे ही बाब दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दिलासादायक ! कल्याण डोंबिवलीत चार दिवसांत ७५२२ रुग्णांना डिस्चार्ज

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा आकडा कडक निर्बंधांनंतर काहीसा वधारलेला दिसत आहे. दिवसाला २ हजारांपर्यंत जाणारी रुग्णसंख्या साधारण १२०० पर्यंत आटोक्यात येत आहे. याहून दिलासादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७५२२ रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र भरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना व सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नेमून दिलेली वेळ देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश प्रशासनाला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा अधिक होत आहे.

मागील चार दिवसांत एकूण ७५२२ रुग्ण बरे झाले आहेत. या तुलनेत ५५७३ नव्या रुग्णांची नोंद चार दिवसांत करण्यात आली आहे. तर कोरोनाने महापालिका क्षेत्रात ३० लोकांचा जीव याच चार दिवसांत गेला आहे. या सर्व आकड्यांबरोबर आजच्या घडीला महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४२५१ रुग्ण आता उपचार घेत आहेत. अनावश्यक कारणासाठी फिरणे टाळा, मास्क आणि सेनीटायजरचा वापर करा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन क.डों.म.पा.च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

१ एप्रिल पासून २० दिवसांत क.डों.म.पा. ने मास्क कारवाईत जमावाला लाखोंचा दंड

क.डों.म.पा. ने १ एप्रिल ते २० एप्रिल या २० दिवसांत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे. २० दिवसांच्या या कालावधीत २४१३ लोकांवर ही कारवाई झाली आणि या लोकांकडून महानगरपालिका प्रशासनाला रु.१२,०६,५००/- रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे.

कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत आहे. असे असताना अजूनही काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अगदी बेजबाबदारपणे मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देखिल एकुण १२६ व्यक्तीकडून रु.६३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

राज्यभरात लसीकरण केंद्र सुरू करा ; मनसे आमदार राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अश्या परिस्थितीत रुग्णांना इंजेक्शन पासून बेड पर्यंत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी वेकसिनेशन होणे खूप गरजेचे आहे. याकरिता राज्यभरात पातळी पातळीवर लसीकरण केंद्र उभारावीत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

राजू पाटील यांनी पत्राद्वारे केलेली मागणी :-

केंद्र सरकारने दिनांक १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला राज्यातच हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिलेली आहे. व आता राज्यांनाही थेट उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याला कोरोना लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल अशी शक्यता असून लसीकरणही वेगाने होईल. परंतु राज्य सरकारने त्यासाठी युद्धपातळीवर पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा,तालुका व अगदी ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण हाती घ्यावे लागेल. या लसीकरणकेंद्रांचा जिल्हा, महानगरपालिका, तालुका पातळीवर संयुक्त डॅशबोर्ड तयार करावा व लस उपलब्धतेबाबत माहिती उपलब्ध करुन प्रत्येक तासाला सोशल मिडियासह विविध चॅनलवर द्यावी. तसेच ज्या व्यक्तीने लसीसाठी नाव रजिस्टर केले असेल त्यालाही द्यावी. जेणेकरुन त्याचाही वेळ वाचेल व लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

कोरोना महामारीमध्ये कोविड सेंटर, रुग्णालये महत्त्वाची आहेतच परंतु त्याच बरोबर लसीकरणही तेवढेच वेगवान केल्यास कोरोनाच्या संकाटावर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी राज्यात लसीकरण गतीमान करण्यासाठी आधीच पूर्वतयारी व नियोजन केल्यास खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये ‘लस उत्सव’ साजरा होऊ शकतो. तरी कृपया आपण राज्यभरात जिल्हा, तालुका, महानगरपालिका व ग्राम स्तरावर नवीन लसीकरण केंद्रे उघडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.