Rickshaw strike : रिक्षा चालकांचा चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

Rickshaw strike : रिक्षा प्रवासात एकावेळी तीन हुन अधिक प्रवासी प्रवास करीत असल्यास सदर रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. सोमवारी या संदर्भात चक्कीनाका येथील वाहतूक उपशाखेत निवेदन देण्यात आले आहे.

ओव्हर सीट बसविल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून दहा हजार रुपयांचा दंड रिक्षा चालकांना ठोठावण्यात आला असून ही कारवाई अन्यायकारक आहे. एखादा प्रवासी स्वतःहून बसत असेल तर त्याच्यावर का कारवाई करीत नाहीत? आम्हालाही कुटुंब आहे. त्यांचे उदरनिर्वाह सर्व काही आम्हा रिक्षाचालकांवर अवलंबून आहे. सध्या इतक्या रिक्षा वाढल्या आहेत की आम्हाला व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात आम्ही इतका भरमसाट दंड कसा भरणार? असे अनेक सवाल रिक्षा चालकांकडून करण्यात आले. दरम्यान ही कारवाई थांबली नाही तर अर्धे ठाणे चक्का जाम करू असा इशारा रिक्षा चालकांकडून देण्यात आला.

Rickshaw drivers warn of massive strike

Waldhuni Bridge ला हाईट बॅरियर; अवजड वाहनांना नो एन्ट्री

Waldhuni Bridge : पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यातीलच एक असलेल्या वालधुनी पुलावर आता अवजड वाहनांना प्रवेश नसणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक विभागाच्या समन्वयातून हाईट बॅरियर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उंच अवजड वाहने या बॅरियर मधून जाऊ शकणार नाहीत. मालाची वाहतूक करणाऱ्यांची मात्र आता बऱ्यापैकी गैरसोय होणार आहे.

कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे. पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने वालधुनी पुलावरून वाहतूक करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीच विठ्ठलवाडी एसटी आगाराला आपली वाहने पत्रिपुलावरून नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटीची वाहतूकही या पुलावरून बंद करण्यात आली होती.

आता अवजड वाहनांचाही प्रवेश बंद केल्याने या कोंडीतून सुटका होते का हे पहावे लागणार आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केल्याने उल्हासनगर व कल्याण पूर्वेत जाण्या येण्यासाठी शहाड अथवा पत्रिपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.

Height barrier on Waldhuni Bridge; no entry for heavy vehicles

हिंदी शिकवायची नाही! मनसेचं शाळांना पत्र

कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिली पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय दिला असून मनसेने या निर्णया विरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवू नये या आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व शाळांना देण्याच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी मनसेने कल्याण पूर्वेत एक एक शाळा पिंजून काढीत शाळेतील मुख्यध्यापकांना राज ठाकरेंचे पत्र दिले आहे.

इयत्ता पहिली पासूनच शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जावी अशी सक्ती शिक्षण मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला विरोध होत असल्यामुळे ही सक्ती हटवून शाळेने आपल्या मर्जीनुसार हिंदी शिकवावी असे सांगण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने आपल्या शाळेत हिंदी शिकवू नये याकरिता मनसेने सर्व शाळांमध्ये जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याचा धडाका लावला आहे. कल्याण पूर्वेतील मराठी, इंग्रजी अशा सर्वच माध्यमातील शाळांना मनसे कार्यकर्त्यांनी भेट देत निवेदन दिले आहे.

या अगोदर इ.पाचवी पासून अभ्यासक्रमात हिंदी आणली जात होती. आता पहिली पासूनच विद्यार्थ्यांना जर तीन तीन भाषा लादल्या तर त्या लहान मुलांसाठी जाचक ठरेल असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून उत्तरेकडील भाषा आहे त्यामुळे ती महाराष्ट्रात लादू नये. राज्यभाषा म्हणून मराठी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी या दोन भाषाच ठीक आहेत. परंतु उत्तरेकडील लोकांना इकडे येऊन महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीच इथे आतापासून हिंदी माथी मारली जातेय. त्यामुळे आपण आपल्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवू नये, मनसे तुमच्या सोबत असेल असे राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

Hindi should not be taught! MNS’s letter to schools

Ganesh Vidya Mandir शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं मस्तीत स्वागत

Ganesh Vidya Mandir : जून महिन्याच्या या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत समारंभ शाळेकडून करण्यात आला. कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही काहिसे असेच मजेदार स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून, कागदी टोप्या घालीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

एकेकाळी शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसतीच रडगाणी. परंतु आता बदलत्या काळानुसार पहिला दिवस म्हणजे फक्त नाचगाणी अशीच नवी प्रथा प्रचलित झाली आहे. गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षकांनी आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस चांगलाच मजेदार आणि अविस्मरणीय बनवला. लहान मुलांना आवडणारी गाणी लावून शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत थिरकू लागले. शाळेत संपूर्ण दिवसभर या विद्यार्थ्यांचा नुसता कल्ला सुरू होता. आपल्या आवडीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी चांगलाच ताल धरला होता. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे शिक्षक आणि नवे मित्र. एकंदरीतच सारे काही नवे नवे.

शाळेतील मुख्यद्यापीका ललिता मोरे यावेळी म्हणाल्या की, “पूर्वी असे काही नव्हते. शाळेच्या पहिल्या दिवशी छडी चालवायची नाही एवढेच आम्हाला माहीत असायचे. पण आता शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक सोहळ्या सारखा साजरा करण्याची पद्धत बनली आहे. खरेतर ही छान गोष्ट आहे, कारण हा दिवस पुढची दहा वर्षे म्हणजेच दहावीच्या निरोप समारंभा पर्यंत ही मुले लक्षात ठेवतील”.

Ganesh Vidya Mandir School welcomes first standard students with fun

“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.

अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.

MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge

Kalyan East : अवेळी आलेल्या पावसाने चाळ परिसरांची उडाली दाणादाण

Kalyan East : वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरा शहरात नालेसफाईची कामे मार्गी लावावी लागतात जी साधारपणे मे महिन्यात केली जातात. मात्र पावसाने अवेळी हजेरी लावल्याने सफाई कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ मोठ्या नाल्यातील सफाईला ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र लहान सहान गटारातील गाळ उपसण्याचे काम महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिकणीपाडा, जिम्मी बाग, विठ्ठलवाडी हा सखल भाग बहुतांश चाळ परिसराचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ‘४-जे’ प्रभाग क्षेत्रातील मंगल राघो नगर भागात नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र पाऊस आल्याने सफाई कामगारांनी काम थांबवून आडोसा घेतला. अर्धवट नालेसफाई असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही चाळींमध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या उंबरठ्या पर्यंत पाणी पोहोचले होते. आणखीन काही वेळ पावसाने ब्रेक लावला नसता तर असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असल्या तरी पाऊसच वेळेपूर्वी आल्याने प्रशासनाची देखील गोची झाली आहे. अपुऱ्या नालेसफाईमुळे अनेक ठिकणी पाणी साठत असल्याने करदाते नागरिक संपूर्ण रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला असून याच काळात महापालिकेला संपूर्ण नालेसफाई करण्यास मुभा मिळणार आहे.

Kalyan East : Unseasonal rains have washed away the rice fields.

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. २७ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच अतिरिक्त पाणीसाठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मंगळवारी २२ के.व्ही. एन.आर.सी.-२ फीडरवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या सबस्टेशनहुन महापालिकेच्या १५० द.ल.लि. नेतीवली व १०० द.ल.लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा बंद असणार असल्याने परिणामी जलशुद्धीकरण केंद्रही बंद राहणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती करणे देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीकरिता महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८ तासांकरिता बंद असणार आहे. यादरम्यान कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाला पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water supply to Kalyan Dombivali to be cut off on Tuesday

डोंबिवलीच्या क्रीडापटूंना ‘द्रोणाचार्य’ व ‘शिवछत्रपती’ पुरस्कार

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे डोंबिवलीकर असलेल्या पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले. ही डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाबा आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले पवन भोईर तर जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर झालेले राही पाखले, आदर्श भोईर या युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने रवींद्र चव्हाण यांनी यथोचित सन्मान केला. त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, “हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे.”

पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. ‘माझे डोंबिवलीकर माझा अभिमान’ असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘Dronacharya’ and ‘Shivchhatrapati’ awards to athletes from Dombivali

Power Cut Kalyan : कल्याण पूर्वेत उद्या तब्बल सात तास पॉवर कट

Power Cut Kalyan : पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून सर्व वीज यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. याचकरिता उद्या दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असणार असल्याचा एक मॅसेज समाज माध्यमांवर फिरत आहे. दोन तीन नव्हे तर तब्बल सात तास कल्याण पूर्वेतील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. ऐन उकाड्यात इतके तास रहायचे कसे? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

समाज माध्यमांवर फिरत असलेल्या मेसेजनुसार या सात तासांत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, विजयनगर, आमराई, गवळी नगर, तिसगाव नाका, आदर्श नगर, संतोष नगर, चक्की नाका परिसराचा वीजपुरवठा बंद असणार आहे. देखभाल दुरुस्तीकरिता पॉवर कट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. अलिकडल्या काळात तापमानाचा पारा हा ४०℃ ला खेटला असून विजसेवा खंडित झाल्यावर रहायचे कसे असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

कल्याण पूर्वेतील परिसर हा चाळ परिसर असल्याने पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दुपारच्या तापमानात इतक्या तासांचा पॉवर कट सोसवणे जिकरीचे आहे. तर अनेक घरांत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तर आजारी रुग्ण देखील आहेत. शिवाय व्यापारी वर्ग, डेअरी चालक देखील या निर्णयाविरोधात आहेत. त्यामुळे हा पॉवर कट सलग सात तासांचा न घेता तो दोन अथवा तीन टप्प्यात घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. इतक्या तासांच्या पॉवर कट विरोधात लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेते आवाज का उठवीत नाहीत? त्यांच्या घरात इन्व्हर्टर व गाडीत एसी असतो म्हणून त्यांना सामान्य नागरिकांना बसणारी झळ समजणार नाही असाही रोष कल्याण पूर्वतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे महावितरणला आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.

Power Cut Kalyan: Power cut for seven hours tomorrow in Kalyan East

“गोली मार दुगा” हिंदी भाषेतून धमकीचा फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याचे पडसाद मात्र अजूनही कल्याण शहरात उमटतच आहेत. सहा गोळ्या लागून बचावलेले महेश गायकवाड यांचे कार्यालय प्रमुख असलेले निलेश रसाळ यांना आता फोनद्वारे धमकी आली आहे. सारखे सारखे कोर्टात जातोस, तुला गोळ्या घालून मारीन अशी धमकी सदर इसमाने दिली आहे. मात्र ही धमकी देणारा व्यक्ती हा हिंदीतुन बोलत असून तो नेमका महाराष्ट्रातील आहे की परराज्यातून फोन करून अशी धमकी देत आहे ही बाब देखील तपासली जाणार आहे.

मनसेच्यागुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या इतर भाषिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मराठी बोलता येत नसेल तर काही खैर नाही असे चित्र आता मनसेने उभे केले आहे. त्यातच कल्याण मधील निलेश रसाळ या मराठी युवकास आलेला धमकीचा फोन हा एका अमराठी भाषिकाने केल्याने आपल्याच घरात मराठी माणसाच्या गळ्यावर नख लावले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निलेश रसाळ हे महेश गायकवाड यांचे कार्यलयीन कामकाज पाहतात. त्यामुळे अनोळखी इसमाने त्यांना कोर्टात सारखा दिसू नको नाहीतर गोळ्या घालीन अशी उघड धमकी दिली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे. परंतु सदर इसम हा अमराठी असून येथील स्थानिक मराठी भाषिकालाच जीवे मारण्याची धमकी देत आहे ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. आता ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कानावर गेल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण संभाषण ऐका पुढील लिंकवर

https://www.facebook.com/share/v/164WouekZ1

Hindi speaker threatens to kill local man