‘… म्हणून मी कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेत सामील झालो होतो’; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितले कारण

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून २० ऑगस्ट पर्यंत विविध मतदारसंघातुन ही यात्रा जाणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मनसे आमदार राजू पाटील हे कपिल पाटील यांच्या समवेत दिसल्याने पुन्हा मनसे भाजप युतीच्या चर्चांना फोडणी मिळाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटी नंतर सुरू झालेल्या मनसे भाजप युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला दिसत नाही. प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांना मिळणाऱ्या सारख्या उत्तराने यांचं नक्की चाललेलंय काय ? असा संभ्रम दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकार आणि महाराष्ट्राला पडलेला आहे. काल डोंबिवलीतील मनसे मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पणात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असोत किंवा आजची कपिल पाटील यांच्या यात्रेतील मनसे आमदार राजू पाटलांची हजेरी या सर्व गोष्टी युतीचे संकेत देत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनसे आणि भाजप विविध स्थानिक राजकीय कार्यक्रमातुन जवळीक साधत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातून युतीची चाचपणी सुरू आहे का असा संभ्रम निर्माण झालेला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांना जन आशीर्वाद यात्रेनंतर माध्यमांनी पुन्हा युतीचा प्रश्न केला मात्र राजू पाटील यांनी नेहमीप्रमाणेच आपले स्पष्टीकरण देऊ केले. कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांची जन आशीर्वाद यात्रा शीळफाटा हुन कल्याणच्या दिशेने निघाली होती. त्यामुळे ते आमच्या मतदार संघातून घरासमोरून जात असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी मी फक्त आलो होतो असे राजू पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर यामागे कोणतेही राजकारण नसल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर कपिल पाटील यांनीही राजू पाटील यांच्या समवेतचा फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताना सावधानतेने मनसे आमदार असा उल्लेख न करता कल्याण ग्रामीण आमदार असा केला आहे.

-संतोष दिवाडकर

स्वातंत्र्यदिनी महापालिकेला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर? पालिका आवारात कचरा टाकून वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर पडल्याची नाराजी दर्शवित पालिका आवारात कचरा टाकून वंचित बहुजन आघाडीने याचा निषेध व्यक्त केला आहे.

रविवारी भारताचा स्वांतत्र्य दिवस संपुर्ण देश साजरा केला जात आसताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली मुख्यालयाच्या आवारात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्मारकाची स्वच्छता न केल्याने पालिका प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी महानगरपालिकेच्या आवारात  कचरा टाकून जाहीर निषेध व्यक्त केला.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं शर्मिला ठाकरेंनी केलं लोकार्पण; भाजप आमदारांच्या उपस्थितीवर बोलले मनसे आमदार

१५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पार पडले. या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनीही भेट दिल्याने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. आणि याबाबत मनसे आमदारांना राजू पाटील यांना सवाल केला असता त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच काळात महाराष्ट्रातील आणखी काही महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत. अश्या परिस्थितीत मनसे आणि भाजपा या दोन पक्षात युती होण्याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, मनसे आमदार राजू पाटील यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र मनसेच्या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील भेट दिली होती. याबाबत हे युतीचे संकेत आहेत का ? असा सवाल माध्यमांनी मनसे आमदार राजू पाटील यांना केला होता. यावर बोलताना त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे भाजप युती वगैरे असे काही नाहीये. त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. ते पण आम्हाला निमंत्रण देतात तसे आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. युती बाबत पक्षप्रमुख राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यानुसार आमचे काम सुरू केले आहे.

राजू पाटील (आमदार,मनसे)

क.डों.म.पा. च्या नगरसेवकांचा कार्यकाळ हा २०२० मध्येच संपला आहे. त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका खूपच लांबणीवर पडल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई, पुण्यासह आणखी इतर मोठ्या महानगरपालिका निवडणुका होणार असून क.डों.म.पा. देखील तेव्हाच होण्याची शक्यता आहे. व त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीत विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. २००९ साली पदार्पणातच मनसेने स्वबळावर २६ जागा मिळवत विरोधीपक्ष नेतेपद भूषवले होते. यावेळी मनसेला ना भूतो ना भविष्यती असे मतदान झाले होते. पुढे मनसेची हवा कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मनसेची पराभव मालिका सुरू झाली.

क.डों.म.पा. क्षेत्रात मनसेने २०१५च्या महापालिका निवडणुकीत १० जागा जिंकल्या. शिवसेना भाजपा युती कायम असल्याने पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद मनसेला मिळाले. त्यात आता मनसेचा आमदार देखील याच महापालिका क्षेत्रात असल्याने मनसेला आणखीन बळ प्राप्त झाले आहे. यात भरीस भर भाजपा युती झाली तर मात्र इंजिनाचा करिश्मा कल्याण डोंबिवलीत दिसू शकतो असे जाणकार मंडळी म्हणत आहेत.

-संतोष दिवाडकर

ऐतिहासिक समाधीस्थळांच्या जीर्णोद्धारासाठी मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्याकडून ५१ हजारांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे सुपूर्द

क.डों.म.पा.चे मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारासाठी आपला खारीचा वाटा पुढे केला आहे. यासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश ‘राजे प्रतिष्ठाण दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य’कडे सुपुर्द केला आहे.

१५ ऑगस्ट देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजे प्रतिष्ठाणने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राजे प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांनी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या समोर समाधी स्थळाचा आराखडा ठेवला आणि संपूर्ण कामाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. छत्रपती शिवरायांना आपले प्रेरणास्थान माननारे नगरसेवक अभिमन्यु गायकवाड यांनी देखील या जिर्णोद्धाराकरिता स्वतः खारीचा वाटा पुढे केला असून ५१ हजार रुपयांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाण कडे सुपूर्द केला आहे. तसेच राजे प्रतिष्ठाणच्या संपूर्ण संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन हे ऐतिहासिक कल्याण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांनी प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्ग संवर्धन तसेच समाधी स्थळांच्या जिर्णोद्धाराचा विडा उचलला आहे. या मोहिमेत आर्थिक पाठबळ असणे देखील तितकेच गरजेचे असून लोकनिधीतून ते निधी जमा करीत आहेत. यासाठी त्यांनी अभिमन्यू गायकवाड तसेच मदत केलेल्या इतरांचेही आभार मानले आहे. याबद्दल MH मराठीने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड तसेच राजे प्रतिष्ठाण प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी MH मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठाणने माझी भेट घेतली. त्यांनी माझ्या समोर महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचा आराखडा ठेवला. अध्यक्ष राहुल महाजन यांनी काही ऐतिहासिक घटना आणि कालांतराने आजची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मुळात आपण या महाराष्ट्रात राहतो असं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत राहतो. या नात्याने आपले काहीतरी कर्तव्य बनते की आपण अशा उपक्रमासाठी नक्कीच पुढाकार घ्यावा. यासाठी आर्थिक पाठबळ देखील महत्वाचे असते म्हणून मी माझा खारीचा वाटा म्हणून एक कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे दिला आहे. माझी अशी इच्छा आहे की लवकरच हे समाधी स्थळ उभं रहावं आणि यासाठी इतरांनीही आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कर्तव्य निधी म्हणून द्यावी.

अभिमन्यू गायकवाड (मा.नगरसेवक,क.डों.म.पा.)

कल्याणचे भूमिपुत्र मा.नगरसेवक अभिमन्यूशेठ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचे ऐतिहासिक समाधीस्थळ कसे असेल याचा आराखडा त्यांना दाखवला. त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व ५१ हजार रुपयांचा एक कर्तव्य निधी स्वराज्य कार्यासाठी अर्पण केला. याबद्दल राजे प्रतिष्ठाण कडून त्यांचे मनापासून धन्यवाद. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान होत. त्यांनी शत्रुसमोर आपली चांगलीच जरब बसवली होती. त्यामुळे आता आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हा समाधी स्थळ जीर्णोद्धाराचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या खोदकाम वगैरे झालेले आहे. पावसाळा संपल्या नंतर पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी ज्याला जसे जमेल तशी मदत तुम्ही करू शकता. मदत नव्हे तर हे स्वराज्यासाठी आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणू.

राहुल महाजन (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य)

संतोष दिवाडकर

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ; स्वातंत्र्य दिनाचे साधले औचित्य

स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ८७ आणि प्रभाग क्र. १०३ मधील पाण्याची समस्या सुटणार असून २८ लाखांच्या आमदार निधीतून हि कामे होणार आहेत. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,  कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक मनोज राय,  माजी सभापती सुभाष म्हस्के तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसगाव नाका येथील तिसाई हाउस या कार्यालयाठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर १३ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.८७ मधील गावदेवी रोड वरील पराग व्हिला बिल्डींग पासून ते शंकर कॉम्प्लेक्स पर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ शंकर कॉम्प्लेक्स, गावदेवी मंदिर रोड, कल्याण पूर्व येथे करण्यात आला. या परिसरात २ ते ३ दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबत परिवहन सदस्य तथा भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी या कामासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार याठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

 तर १५ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.१०३ ओम शिव गंगा कॉम्प्लेक्स, खडेगोळवली, कल्याण पूर्व परिसरात पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शंकर पावशे रोड, कल्याण पूर्व याठिकाणी करण्यात आला. येथील बहुतांश परिसर हा चाळींचा असल्याने या ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना जाणवत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी पाण्याची लाईन टाकण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत हे काम मार्गी लावले आहे.   

-कुणाल म्हात्रे

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंसमोर माजी आमदार नरेंद्र पवारांचा शासनाला इशारा

जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत राज्यात निवडणूका होऊ देणार नाही असा इशारा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला. ओबीसी व इतर मागासवर्गीय समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्यात पवार बोलत होते.

भाजपाने कायद्याने मिळविलेले आरक्षण राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रद्द झालं असून ओबीसी इतर मागासवर्गीय तसेच मराठा समाजावर राज्य सरकारने अन्याय केला असल्याची टीकाही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.

 यावेळी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा  मुंडे, मेळाव्याचे आयोजक व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, राज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,  माजी मंत्री आ. अतुल सावे, आमदार रमेश अप्पा कराड,  भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रे, माजी आमदार विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भटके विमुक्त प्रदेश सहसंयोजक देविदास राठोड, डॉ गुलाबराव सांगळे, ऍड भाग्यश्री ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

वीजबिल वसुलीला गती द्या; कल्याण परिमंडळ प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालकांचे निर्देश

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या जवळपास दीड वर्षांपासून वीजबिल वसुलीचा आलेख सातत्याने खालावत गेला आहे. परिणामी महावितरणला दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. ही बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू विजबिलासह थकबाकी वसुलीला गती देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.

कल्याण परिमंडलात बदलीवर रुजू झालेले मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण परिमंडलातून मुख्य कार्यालयात वीज खरेदी विभागात बदलून गेलेले मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता औंढेकर, कल्याण परिमंडलातून बदलून मुख्य कार्यालयात गेलेले मुख्य अभियंता अग्रवाल, नाशिक परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनासह निसर्ग व तौक्ते चक्री वादळाच्या नैसर्गिक आपत्तीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जीवाची बाजी लावली. परंतु वेळेवर वीजबिल भरून ग्राहकांकडून या सेवेचे मोल झाले नाही. मोबाईल, डिश टीव्ही आदी सेवांचे पैसे वेळेवर भरले जात असताना उधारीवर दिलेल्या विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष झाले. ग्राहकांना अत्यावश्यक असलेल्या विजेचे बिल वेळेत भरण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक रेशमे यांनी व्यक्त केली.

कल्याण परिमंडलातून बदली झालेल्या अधीक्षक अभियंता सुनील काकडे, ज्ञानेश कुळकर्णी, प्रवीण परदेशी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, विशाल भवर यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा; रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची मागणी

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस कामाला सुरूवात झाली असून यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी रेल्वेने बंद केलेले मुख्य तिकीट घरासमोरील व एस.टी. स्टॅण्ड समोरील होम फ्लॅटफॉर्म नं.१ येथील दोन रिक्षा स्टॅण्ड तात्पुरत्या स्वरूपात तातडीने सुरू करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह संघटनेच्या प्रतिक पेणकर, जितु पवार, संतोष नवले, बंडु वाडेकर, जगन्नाथ भागडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील बंद रिक्षा स्टॅण्डची पाहणी केली.  

 कल्याण स्टेशन परीसरात स्मार्टसिटी अंतर्गत सॅटीस उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात झालेली आहे. या कामामुळे स्टेशन परीसरात प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुक नियोजन, उपाययोजना, निर्णय न घेतल्यास संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुककोंडीमुळे प्रवासी नागरीकांना अनेक समस्या व असुविधा तक्रारी निर्माण होतील. वाहतुक कोंडी विरहीत वाहतुक व्यवस्था याकरीता नियोजन व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

या संदर्भात १२ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन प्रबंधक कल्याण यांच्या दालनात रेल्वे डायरेक्टर, इतर अधिकारी रेल्वे पोलिस, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व वाहतुक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सॅटीस काम दिलेल्या मुदतीत होण्यासाठी ववाहतुक व्यवस्था नियोजन याकरीता आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करणे, एकेरी वाहतुक व्यवस्था, नो एण्ट्री करणे, तसेच स्टेशन समोरील रिक्षांची गर्दी कमी करण्याकरीता रेल्वेने नियोजित मॉल प्रवाशी सोयीसुविधा प्रकल्प या करीता बंद केलेले दोन रिक्षा स्टॅण्ड सद्यस्थितीत रिकामी असलेली रेल्वे हद्दीतील जागा तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा स्टॅण्ड करीता तातडीने दयावी अशी मागणी करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

गाडी चोरीच्या उद्देशाने वाहन चालकाची हत्या; नऊ वर्ष कोर्टात चाललेल्या केसचा लागला निकाल

जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच २०१२ साली कल्याण मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांकडून शिर्डी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी एक गाडी बुक झाली होती. मात्र या वाहनचालकाची हत्या झाली आणि संशयितांविरोधात कोर्टात खटला उभा राहिला. जवळ्पास नऊ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना आता कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

कल्याण येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे रेवणकर यांच्याकडे वाहन चालक म्हणून घनश्याम पाठक हे काम करीत होते. २०१२ साली शिर्डी साईबाबा देवस्थानाचे दर्शन घेण्याकरिता चार जणांनी गाडी बुक केली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरु असतानाच या चौघांच्या डोक्यात जी डाळ शिजत होती ती वाहनचालकाला अनाकलनीय होती. शिर्डीला जातानाच ओतूर येथे थांबून त्यांनी रश्शी विकत घेतली. ही रश्शी कशासाठी घेतली याची कल्पना ड्रायव्हरला मात्र नव्हती. शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शन घेतले. आणि नंतर पेटपूजा करून परतीचा प्रवास सुरू केला.

नाशिक येथे आल्या नंतर आडबाजूला वाहन चालकाला गाडी थांबविण्याची सूचना त्या चौघांनी केली. कस्टमरच्या सुचनेचे पालन करीत वाहनचालक घनश्याम पाठक (५३) यांनी वाहन रस्त्याहून बाजूला केले. वाहन थांबवल्या नंतर रश्शीने या चारही आरोपींनी त्याचा गळा आवळला. ड्रायव्हरची जिवाच्या आकांताने तरफड सुरू होती. मात्र चौघांच्या कचाट्यातून त्याला मानेभोवती गुंडाळलेला मृत्यूचा दोर सोडवता आला नाही आणि त्यातच त्याने दम तोडला. चौघांपैकी एकाने गाडीवर ताबा घेतला आणि नाशिक ते कसारा प्रवास करीत असताना त्यांनी मृतदेहाला मधोमध बसवीले. पुढे गाडी कसारा घाटात आणली आणि वाहनचालक घनश्याम पाठकचा मृतदेह निर्दयीपणे खोल दरीत फेकून दिला.

इकडे वाहन चालक व वाहन दोन्ही गायब असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकांची चिंता वाढली. काहीही शोध लागत नसल्याने त्यांनी थेट महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. वाहनचालक विश्वासू असल्याने त्यांनी अपहरण झाल्या संदर्भात गुन्हा दाखल केला. वाहन व चालक मिळून येत नसल्याने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहिती व शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार आरोपींबरोबर वाहनचालक ही आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र पोलिसांकडे या हत्येसंदर्भात प्रथमदर्शी असा कोणताही पुरावा नव्हता.

पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक तपासावर शहापूर मध्ये राहत असणारे चारही आरोपी गजाआड करण्यात आले. आकाश गजानन साळुंखे, सचिन उर्फ बटाट्या उर्फ सुभाष नीचीते, सचिन उर्फ सच्या सुभाष नीचीते व दिनेश काळूराम फर्डे अशी त्या चौघांची नावे. यातील तीन जणांना कालांतराने न्यायालयाने जामिनावर सोडले होते. तर एक आरोपी कारागृहातच होता. केवळ गाडी चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. शहापूर येथे राहत असणाऱ्या आरोपीच्या वतीने कल्याणातील २ ख्यातनाम वकील केस लढवित होते. तब्बल नऊ वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या दालनात काल अंतिम सुनावणी झाली आणि इतक्या वर्षांनंतर मृत व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. गुन्हा सिद्ध झाल्याने वाहनचालकाची हत्या करणाऱ्या शहापूर मधील चारही आरोपींना न्यायालयाने आता संपूर्ण जन्मभर तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.

एक चारचाकी वाहन जे मिळवण्यासाठी चार व्यक्ती एका निष्पाप जीवाचा बळी घेतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच कुटुंब देखील अंधारात येत. शिवाय काही लाखांच्या गाडीसाठी चार लोकांना आजन्म कारावास होऊन त्यांची कुटुंबाना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे चार पैसे मिळवण्याची ही हाव माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते हे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे नऊ वर्षाने का होईना अखेर न्याय निवाडा झालाच. सदर तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात २०१२ साली नोंदवली होती. मात्र नुकतेच तीन-चार दिवसांपूर्वी देखील याच पोलीस ठाण्यात अगदी अशीच तक्रार नोंदवली गेली आहे. ज्यात गाडी चोरी साठी उबेर चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला गेला आहे.

♏♓ वृत्तांकन :- रोशन उबाळे

♏♓ पुनर्लेखन :- संतोष दिवाडकर

गाडीच्या चोरीसाठी उबेर चालकाची हत्या. क्लिक करा खालील लिंकवर

https://mhmarathi.in/?p=1033

कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा; डॉग स्कॉटसह होतेय कसून तपासणी

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शहरांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर, डॉग स्कॉट्सद्वारे शोध घेतला जात आहे. यासाठी, उच्च पोलीस अधिकारी स्वतः सुरक्षा तपासण्यात मग्न आहेत. जेणेकरून दहशतवाद्यांची कोणतीही योजना यशस्वी होऊ दिली जाणार नाही. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर डॉग स्कॉटसह कसून तपासणी करण्यात आली.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ज्यात रेल्वे संरक्षण दलाचे प्रभारी भूपेंद्र सिंह स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान दिसले. संभाषणादरम्यान स्टेशन प्रभारी भूपेंद्र सिंह म्हणाले की, दहशतवादी घटना कोणालाही सांगून घडत नाही. त्यामुळे पूर्ण दक्षतेसह रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या मेल गाड्या तसेच संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर ठेवली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कल्याण आणि जवळपासच्या स्थानकांवरील अधिकाऱ्यांसह डॉग स्कॉटची टीम जिमी नावाच्या कुत्र्याचा साहाय्याने  शोध घेत आहे.  सुरक्षेच्या संदर्भात शोध मोहिमेचा भाग म्हणून मोठ्या संख्येने महिला सुरक्षा दलांनाही तैनात करण्यात आले आहे. आणि सर्वच फौजफाटा रेल्वे स्टेशनवर लक्ष ठेवण्यात गुंतला आहे.

-रोशन उबाळे