कल्याण शिळरोडलगत एमआयडीसीचे खोदकाम ; पाईपलाईनच्या खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय

डोंबिवली वरून पेंढारकर कॉलेज, ऊस्मा पेट्रोल पंप मार्गे कल्याण शीळ रोडकडे जाणारा मार्ग हा कल्याण शीळ रोड लगत एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईमुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक आणि लोकांचा रहदारीसाठी बंद असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.

या  कामामुळे येथून जाणारी येणारी सार्वजनिक बस वाहतूक, लोकांचा जाण्या येण्याचा  मार्ग बंद झाल्याने त्या सर्वांना मोठा वळसा घालुन जावे लागत आहे. हे काम पावसाळ्यात करायचे होते तर लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. कारण हा मार्ग वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन याचे नियोजन करणे गरजेचे होते.

जर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने त्याचा फटका अधिक तीव्रतेने येथे होईल. हे काम व्यवस्थित आखणी करून केले असते तर ते चार दिवसात पुरे करता आले असते. आतातरी हे काम लोकांसाठी एमआयडीसीने तातडीने लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये आता मिळणार ऑनलाइन रिक्षा ; ‘ऑटो कॅब’ अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात

ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा चालक मालक असोसिएशन संचलित आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात झाली आहे. यामुळे आता कल्याणकर नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होणार आहे.

शासनाने मुक्त केलेले रिक्षा परवाने यामुळे वाढलेली रिक्षांची अफाट संख्या त्याच प्रमाणात वाढलेली विना लायसन्स बॅच रिक्षाचालंकाची संख्या व कोरोनाचे संकट यामुळे रेल्वे लोकल व वाहतुकीवर असलेले निर्बधं विविध कारणास्तव रिक्षा व्यवसायावर विपरीत परीणाम झालेला आहे.

विना लायसन्स अनाधिकुत रिक्षाचालकांमुळे निर्माण होणार्या समस्या प्रवाशी नागरीकांच्या तक्रारी निराकरण व प्रवाशी नागरीकांना दर्जेदार सुरक्षित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्ध व्हावी व अधिकुत रिक्षाचालकांना शाश्वत रिक्षा व्यवसाय उपल्बधता या करीता रिक्षा संघटनेने ओला उबरच्या धर्तीवर आँटो कँब मोबाईल अँप विकासित केले आहे. कल्याण पश्चिमेतील मोरया हाँल, बैलबाजार येथे प्रातनिधिक स्वरुपात मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा समाविष्टता या करीता रिक्षा चालक नोदंणी अभियान शुभारंभ करण्यात .

याप्रसंगी उपस्थितीत रिक्षाचालकांना मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा भविष्यातील उपयुक्ता व माहीती जितेद्रं पवार व बिनाँय बाबु यांनी दिली. संतोष नवले व प्रतिक पेणकर यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी व प्रवाशी नागरिकांनी मोबाईल अँप रजिस्टर्ड व डाऊनलोड करावे असे आवाहन केले. याप्रसंगी विलास वैद्य, अजगर कुरेशी, विजय डफळ, प्रंशात धनावडे, संजय बागवे,  बंडु वाडेकर, बापु चतुर, महीला रिक्षाचालक कल्पना वाघमारे  व अन्य रिक्षाचालक उपस्थितीत होते.

दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1  आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत 15 दिवस रिक्षाचालक नोदंणी सुरु राहणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनगटावरील शिवबंधून सोडून घातले घड्याळ ; क.डों.म.पा. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पक्षबांधणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून  शिवसेनेचा भाग असलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे.   

कल्याण पश्चिममधील शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (युवा सेना) कल्याण पश्चिम येथील युवासेना विभाग अधिकारी निखिल कदम,  युवासेना उपविभाग अधिकारी रिकी चक्रवर्ती, युवासेना उपशाखा अधिकारी रोहन सोनवणे, समाजसेवक ब्रिजेश कांबळे यांच्यासह युवासेनेच्या गट अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

झालेल्या या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरवात झाली असून निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार कि स्वतंत्र याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिवसेना युवासेनेतील स्थानिक राजकारणाला कंटाळून या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारसरणी पटली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कल्याण मध्ये अधिक प्रमाणात वाढेल यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी यावेळी दिली.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा.च्या वतीने डॉक्टर दिवस साजरा

डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची सर्व देशभरात वाहवा झाली, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी आज काढले. आजच्या डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहात आयोजिलेल्या डॉक्टरांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते.

 मी रुजू झाल्यावर कोविड सुरु झाला, परंतू डॉक्टर्स संघटनांनी ऊत्साह वाढविला, आशा दिल्या त्यामुळे ‘डॉक्टर्स आर्मी’ ही संकल्पना कल्याण डोंबिवलीत रुजली, रुळली.  डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर  ही संकल्पना आता सर्व देशभर वाखाणली गेली आहे. अत्यंत अल्प कालावधीत जॅंम्‍बो फॅसिलीटी उभारणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. व्हॅलेंटाईन दिनाला रुजू झालो कारण काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे. अशी‍ मिश्किल पुस्ती देखील त्यांनी यावेळी जोडली.

  कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतव्हॅली, शक्तिधाम, विठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या  ४  ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची १६  नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण २५  आणि भविष्यात ३६  नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.

     या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्स,  आयएमए, कॅम्पा,   निमा,   होमिओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याहस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटर, ओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.

क.डों.म.पा. क्षेत्रात चार दिवसांपासून लसीकरण बंद ; १० दिवस सुरू आहे लसींचा तुटवडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात शेवटचे लसीकरण २८ जून रोजी झाले होते. व त्यानंतर चार दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण ठप्प झाले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरीकांना वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहे. मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवलीकर वैतागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता. तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. अस असले तरी प्रत्यक्षात मात्र लसीकरण केंद्र चार दिवसापासून बंद पडली आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात २३ जून पासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. २३ जून ते २६ जून या चार दिवसांत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण व सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली या दोनच ठिकाणी लसीकरण सुरू होते. त्यानंतर २७ जूनला लसीकरण पूर्णपणे बंद झाले. २८ जून रोजी महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने या दिवशी २५ लसीकरण केंद्रांवर लोकांना लस देण्यात आली. त्यांनंतर २८ जून पासून २ जुलैपर्यंत महापालिकेला शासनाकडून कोणताही लसींचा पुरवठा झाला नाही. परिणामी चार दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले आहे.

क.डों.म.पा.ला नुकताच कोव्हीड इन्होव्हेशन पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला असल्याने आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रातील टाटा आमंत्रा हे कोव्हीड सेंटर आता बंद केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नसल्याचा हा शुभ संकेत असू शकतो असेही ते म्हणाले होते. मात्र असे जरी असले तरी कल्याण डोंबिवली करांचे लसीकरण लवकरात लवकर करून देण्याच्या प्रयत्नात जरी ते असले तरी शासनाकडून काही कारणाअभावी लसींचा पुरवठा उपलब्ध होत नाही ही निराशाजनक बाब म्हणावी लागेल.

-संतोष दिवाडकर

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांचा विविध व्यापारी संघटनांनी केला नागरी सत्कार

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला मिळालेल्या कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत नागरी सत्कार केला.

      भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      आज देखील अशाच प्रकारे कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय सामाजिक संघटनांनी एकत्र येत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, मुथा कॉलेज चेअरमन, ज्वेलर्स असो अध्यक्ष प्रकाश मुथा, माजी नगरसेवक तथा अग्रवाल कॉलेज व्हॉईस चेअरमन ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक इफ्तेकार खान, कल्याण शहर काँग्रेस ओबीसी अध्यक्ष तथा खवा व्यापारी संघटना सचिव जयदीप सानप, डॉ गिरीश लटके, कपडा व्यापारी असो. हशुभाई शाह, ज्वेलर्स असो वीरेंद्र मुथा, मुथा कॉलेज मुख्याध्यापिका साधना गाधिया, दिपाली मॅडम, स्याम्युल चार्ल्स, महेन्द्र शंकलेशा, जयंतीला शंककलेशा, जयराज सर, किशोर खराटे, राजा सुदाम जाधव केबल व्यावसायिक उपस्थित होते.     

संपूर्ण देशाची कोरोना परिस्थिती कशी आहे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची कोरोना स्थिती कशी होती हे सर्वाना माहिती असून अशा परिस्थितीत केडीएमसी आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने  अतिशय चांगले काम केलं असून त्याबद्दल भारत सरकारच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. हि अभिनंदनाची बाब असून त्याबद्दल आम्ही हा नागरी सत्कार केला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश मुथा यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व कर्पेवाडीतील शाळेची जीर्ण इमारत महापालिकेने केली जमीनदोस्त

कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातील जे प्रभाग क्षेत्रातील कर्पेवाडी येथील द्वारका शाळा ही इमारत ३० वर्षापूर्वीची असून या इमारतीतील शाळा गेल्या १० वर्षापासून बंद आहे. हि इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीत गर्दुले व समाज कंटक बसत असून त्यांचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी केडीएमसीकडे प्राप्त झाल्या होत्या. 

या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे या शाळा इमारतीच्या मालकांस नोटीस बजावून इमारत निष्कासीत करणेबाबत कळवूनही संबंधितांनी ही इमारत निष्‍कासीत केली नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार व विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागक्षेञ अधिकारी वसंत भोंगाडे यांनी जे प्रभागातील अतिक्रमण निमुर्लन पथक, महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपअभियंता सुनिल वैदय, कनिष्ठ अभियंता धर्मेद्र गोसावी यांच्या मदतीने व 1 जेसीबी, 1 ब्रेकर,1 गॅस कटरचा वापर करून काल दिवसभर सदर धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई केली असून आज हि कारवाई पूर्ण करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

अखेर दीड वर्षांनंतर कल्याण डोंबिवलीच्या सर्वात मोठ्या कोविड सेंटरला महापालिका आयुक्तांनी ठोकले टाळे ; टाटा आमंत्रा बंद

टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला.  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्या-या डॉक्टर्स,  नर्सेस,  वॉडबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभात बोलतांना त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. 

टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले,  हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणा-या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ,  प्रमोद मोरे, डॉ. दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले.

 टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

        महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलासॉफर, गाईड,  फ्रेन्ड आहेत.  त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.  भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणा-या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले.  आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत, असेही पुढे ते म्हणाले.

        कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती.  अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत 40 हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.  त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळीउपायुक्त  रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत शेकडो बुलेट सायलेन्सरवर फिरवला रोडरॉलर ; आता गॅरेज वाल्यांची धरणार गचंडी

मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून यापुढे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या वतीने १०३ मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करत हे मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर ठाकुर्ली येथील ९० फुट रोड, म्हसोबा चौक येथे रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

डोंबिवली शहरातील काही दुचाकी स्वार, आपल्या दुचाकीस कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असतात यामुळे ध्वनिप्रदुषण होत असून, आवाजामुळे सामान्य जनता विशेष करून वयोवृध्द नागरीक, रूग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.

या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहा पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, पोलीस उप निरीक्षक नवनाथ चव्हाण, वाहतुक पोलीस अंमलदार, यांनी डोंबिवली शहरात विशेष मोहिम राबवून एकुण ८३ मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच कोळसेवाडी वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिरसाट, पोलीस उप निरीक्षक काशीनाथ चौधरी व वाहतुक पोलीस अंमलदार कोळसेवाडी यांनी कोळसेवाडी वाहतुक शाखेची हद्दी मध्ये २० मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेले एकुण १०३ सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत आर.टी.ओ.कडून खात्री केली असुन, हे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशिर असल्याने त्याचा परत कोणाकडून वापर होऊ नये यांकरीता ते आज म्हासोबाचौक, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व या रस्त्यावर मांडुन त्यावर रोलर फिरविण्यात आला.

यापुढेही वाहतूक पोलिसांच्या वतीने मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्यात येणार असून हे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण पश्चिम विधानसभेत केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राजकीय पक्ष आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता केल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या प्रभागात कोरोनामुक्तीसाठी जोमाने काम करायचे आहे असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला आहे.

      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई व कार्याध्यक्ष उदय जाधव यांच्यावतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नियुक्तीपद वाटप कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी येथील  माळी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,  सरचिटणीस प्रशांत माळी, विधानसभा युवक अध्यक्ष योगेश माळी,  ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे, क प्रभाग अध्यक्ष दिनेश परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

      पक्षाच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमेतील सर्व वार्डचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाची तिसरी लाट येत असून यापासून बचावासाठी कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करून प्रभागातील नागरिकांचे देखील कोरोनापासून रक्षण करा. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे, यासाठी  मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियम पाळा असा सल्ला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेल्या पुरस्कारात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा देखील वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तर आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढवतील असेही सांगितले.

-कुणाल म्हात्रे