राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची झाली निवड

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी कल्याणमधील सुजित रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस, कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र रोकडे यांना दिले आहे.

       राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने सुजित रोकडे यांची कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी तर आदित्य चव्हाण यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा रोकडे यांच्या नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.

       सुजित रोकडे हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सक्रीय असून कल्याणमध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य असे अनेक उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबविले आहेत. पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुजित रोकडे यांनी यावेळी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

“राजसाहेबांच्या बोलण्याचा विपर्यास करून वेगळा अर्थ काढला जातोय” – मनसे आमदार राजू पाटील

नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाच्या नामकरणासाठी सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करून वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोर्चात सहभागी होत असल्याचे देखील सांगितले आहे.

“मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.

राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.

आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.

म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.”

– राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)

-संतोष दिवाडकर

सोयीसुविधांचा बोजवारा उडालेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका आयुक्त

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार असून रुग्णालयाला सुसज्ज आणी अत्याधुनिक कसं करता येईल यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी करून घेतली आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असल्यामुळे रेल्वे स्थानकानजिक असलेल्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी दिसून येते. या रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली. ही पाहणी करतांना त्यांनी रुग्णालयामागे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही भेट देवून तेथिल पाहणी केली.

रुक्मिणीबाई रुग्णालयामागे तळ मजल्यावर ऑक्सिजन प्लँटसाठी राखीव असलेल्या जागेची देखील त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, मॅटर्निटी वॉर्ड यांना भेट देवून तेथे सुधारणा करणेबाबत संबंधितांना सुचना दिल्या. यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर काम सुरु असलेल्या १०  खाटांच्या अतिदक्षता कक्षाची तसेच मॉडयुलर ऑपरेशन थिएटर यांची पाहणी केली.

   रुक्मिणीबाई रुग्णालय हे कल्याण मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात मोठया प्रमाणात ओपीडीला गर्दी असते, या रुग्णालयाचे एक वेगळेच महत्व आहे. शास्त्रीनगरच्या धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आजूबाजूस सिटी स्कॅन आणि एम.आय. आर. ची सुविधा कुठे करता येईल, एक सुसज्ज रुग्णालय कसे उभे करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी रुग्णालयाची पाहणी केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.  

यावेळी वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता भालचंद्र नेमाडे, वैदयकीय अधिकारी समिर सरवणकर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची केली जातेय मागणी

बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.

खासदार कपिल पाटील यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची काल भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्यापि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्यापी काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली. एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.

-कुणाल म्हात्रे

पगार न मिळाल्याने केडीएमसी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर चौकात कामगारांनी एकत्र येऊन कचरा गाड्या रस्त्यावर उभ्या करत कचरा उचलण्यास नकार दिला. केडीएमसीमध्ये घंटागाड्यांवर  सुमारे २५० कामगार काम करत असून त्यापैकी ५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. तर याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास उद्या हे आंदोलन चिघळण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

       कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रातील ३ प्रभागात खासगी कंत्राटदारामार्फत कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देण्यासह अर्धवट पगार मिळत असल्याचे सांगत आज सकाळी या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले. कल्याण पश्चिमेतील या ३ प्रभागातील कचरा न उचलता त्याशेजारी कचऱ्याच्या गाड्या नेऊन उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे तिन्ही प्रभागात सकाळपासून रस्त्यावर कचरा तसाच पडलेला होता.

       महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

‘बी.एल.ओ’ चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची तहसीलदारांकडे मागणी

शिक्षकांना दिलेले बी.एल.ओ चे आदेश रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांकडे केली असून शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि  बी.एल.ओ.चे काम असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववीचे गुण व इयत्ता दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाचे काम शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविल्याने निकाल तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यातच विधानसभा क्षेत्र  १४२ मतदार संघातील शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामाचे आदेश काढण्यात आले आहेत.  शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती, दुबार, मयत, स्थलांतरित, छायाचित्र चिटकवणे नोटिसा बजावणे इत्यादी कामे करण्याकरिता आदेश काढण्यात आले आहेत.

 मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील व इतर पदाधिकारी ए.व्ही. पाटील, आप्पाराव कदम यांनी विधानसभा क्षेत्र १४२ चे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व  निवेदनाद्वारे बी.एल.ओ.चे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

-कुणाल म्हात्रे

विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याबाबत कल्याण डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समिती समर्थन संघटना स्थापन

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी समर्थन करण्यासठी कल्याण डोंबिवलीतील सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी  सर्वपक्षीय कृती समिती समर्थन संघटना स्थापन केली असून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देणेच नैसर्गिक न्याय हक्काचे असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

नवी मुंबई विमानतळाला मा.दि.बा.पाटील यांचे नाव देणे हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्रांचा नैसर्गिक हक्क आहे. नवी मुंबई निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमित्रांच्या जमीनी महाराष्ट्र सरकारने बंदुकीच्या जोरावर हिसकावून घेतल्या. त्यांचे राहते घर सोडून संपूर्ण जमीनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना भूमिहीन केले. व त्यांची पारंपरिक वडिलोपार्जित असलेली शेती, मच्छीमार, मिठागरे ही उत्पन्नाची साधने देखील हिरावून घेतली व त्यांना कायमस्वरूपी बेरोजगार करून उध्वस्त केले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या या जुलमी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात दि.बा.पाटील यांनी शेतकरी भूमिपुत्रांचा एक ऐतिहासिक व क्रांतिकारक आंदोलन, लढा उभा केला. त्या आंदोलनावर तत्कालीन सरकारने लाठीमार केला,अश्रुधुर सोडले, गोळीबार केला व पाच शेतकरी भूमिपुत्र ठार मारले.  त्यात दि.बा. पाटील देखील रक्तबंबाळ झाले होते. नवी मुंबई स्थापन करण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यातील पाच शेतकरी ठार मारलेच शिवाय लाखो शेतकरी भूमिपुत्रांना भूमिहीन करून त्यांचा जीवंतपणीच बळी घेतला आहे. आणि नवी मुंबईतून भूमिपुत्रांचे अस्तित्वच उध्वस्त केले आहे. व त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे.

   सरकारच्या या अन्यायकारक कृती विरोधात आणि भूमिपुत्रांच्या पुनर्वसनासाठी दि.बा.पाटील हे अतिशय प्रामाणिकपणे जीवनाच्या शेवटपर्यंत लढले. व तेथील भूमिपुत्रांना साडे बारा टक्के विकसित प्लाँट परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून पदरात पाडून घेतला. परंतु सिडको प्रशासनाने व राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आजही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या उर्वरित मागण्या मान्य केल्या नाहीत. वाढीव प्लाँट, गावठाण विस्तार योजना, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, नोकऱ्या,रोजगार इत्यादी मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.

    त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रास्तावित असल्यापासून तेथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे हि मागणी वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा त्या सिडको प्रकल्पग्रस्तांचा नैसर्गिक हक्क आहे.  त्यामुळे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा मान राखून नवी मुंबई विमानतळाला “लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव देऊन सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना व अखिल बहुजन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समिती समर्थन संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.  

      या संघटनेत  काँ. काळू कोमास्कर, काँ. आत्माराम विशे, कॉ. पी के लाली, रवी भिलाने, ज्ञानेश पाटील, आनंद नवसागरे, काँ. जी आर पाटील, शैलेंद्र दोंदे, ज्योती बडेकर, गणेश सोस्टे, बाबा रामटेके, संजय शिंदे, संजय गायकवाड, अमित दुखंडे, काँ. महेश आवारे, संदीप पवार, विलास डिके आदींचा समावेश आहे.

-कुणाल म्हात्रे

रावसेना सामाजिक संस्थेतर्फे सिटीपार्क मध्ये वृक्षरोपण

कल्याण येथील गौरी पाड्यातील केडीएमसी सिटी पार्क परिसरात रविवारी  राव सेना सामाजिक संस्थेमार्फत वृक्षरोपणाचा अभियान राबविण्यात आले.

कोरोना काळात ऑक्सीजनचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले असून ऑक्सीजन न भेटल्यामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे ऑक्सीजन कीती महत्वपूर्ण आहे समजले. या गोष्टी लक्षात घेता रावसेना सामाजिक संस्थेमार्फत केडीएमसी सिटी पार्क परिसरात ३०  रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांत रावसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलराव सोळंके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रम प्रमुख साहिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश आखाडे, संपर्क प्रमुख आशुतोष आहेर, क्रीडा सेना अध्यक्ष निलेश शेलार, कार्याध्यक्ष चंदन वझे, जिल्हा अध्यक्ष तेजस कोंडार, रवी शर्मा,  ज्ञानेश ननावरे, शहर अध्यक्ष दीपक बांडे, जयेश मराठे, तनय गायकवाड, वेध मोरे, शुभम चौधरी, दैविक वझे, गितेश शेलार,  यश आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

मलंगगड भागात नागासह ६ नवजात पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

कल्याण पुर्वेतील नेवाळी नाका मलंगरोड येथील मोहमद शाहजाद यांच्या कपाट दुरुस्तीच्या दुकानाबाहेर नाग जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्र दत्ता बोंबे,  तसेच त्या परिसरातील सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाण्यात कर्तव्य करणारे,मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून  नियुक्त असलेले पोलीस शिपाई मुरलीधर जाधव, स्थानिक सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांना कळविले असता तातडीने घटनास्थळी सर्पमित्रांनी पोहचत  दुकानाच्या बाजुला आढोश्याला बसलेल्या नाग जातीचा पाच फुट लांबीचा विषारी सापास पकडले.

तिथे सर्पमित्रांनी अंड्यातून बाहेर पडणारी नवजात नागांची सहा पिल्ले देखील पकडुन नागासह पिल्लांना जीवनदान दिले. सर्पमित्रांनी विषारी पाच फुट नागासह नवजात नागांच्या पिल्लांना पकडल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्रांनी ताब्यात घेतलेल्या नागासह पिल्लांना  वन विभागाला कळवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षकांना लोकल प्रवासा करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्थानकात लक्षवेधी आंदोलन केले.

१५ जून पासून राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई उपनगरासह  ठाणे जिल्ह्यातील अनेक  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रेल्वेने प्रवास करत असतात. परंतू कोव्हीड 19 मुळे रेल्वेने प्रवास करण्यास बंदी आहें. रेल्वे प्रवास करण्याची अनुमती द्यावी. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. परंतू अनुमती  मिळालेली नाही.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य असल्याने मुंबई  उपनगरातून अनेक शिक्षक शाळेत येण्यासाठी निघाले असता  त्यांना स्टेशन वरती तिकीटे नाकारलीत त्यामुळे शिक्षकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्टेशन येथे कोव्हीड नियमांचं पालन करून लक्षवेधी आंदोलन केले.

कल्याण रेल्वे स्थानक मूख्य व्यवस्थापक अनुप कुमार जैन यांना निवेदन देवून त्यांच्या मार्फत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक सीएसटी मुंबई यांच्याकडे तातडीने पत्रव्यवहार करून शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक परिषेदेने केली. लक्षवेधी आंदोलना प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगराचे कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे शहर अध्यक्षा हेमलता मुनोत इतर पदाधिकारी ए. व्ही. पाटील,  आप्पाराव कदम, संध्या वाबळे, सलीम सर, अमित मिश्रा व विनोद मिश्रा उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे