डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी

डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक असून त्या बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली असून यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देण्याचे आवश्यक असल्याचे मत राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे.

  डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिन्या या कंपन्यांचे सांडपाणी वाहून त्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सीइटीपी त्यानंतर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले हे सांडपाणी खाडीत सोडले जाते.

औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे कंपन्यांचे सांडपाणी मधील सिओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) याचे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा त्यात वाढ झाल्यास व इतर रासायनिक घन कचरा आल्यास त्या जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमधून वाहून जातांना वाहिन्यांवर दाब येऊन किंवा चोकअप होऊन त्या वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. या नादुरुस्त वाहिन्यामधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाजूचा उघड्या नाल्यात किंवा रस्त्यावर वाहते. त्यावेळी त्याचे रासायनिक प्रदूषण होऊन त्याचा उग्र वास आजूबाजूचा परिसरात पसरला जातो. शिवाय ते प्रदूषित न प्रक्रिया केलेले सांडपाणी उघड्या नाल्याद्वारे खाडी, नदीत जाऊन त्यातील पाणी प्रदूषित होत असते.

       एमआयडीसी निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची स्थिती पण अतिशय खराब झाली आहे. त्या जुन्या झालेल्या वाहिन्यांना रस्ते दुरुस्ती, महानगर गॅस, पाण्याच्या पाइपलाइन तसेच केबल टाकताना त्यांना धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या असाव्यात. शिवाय त्यात वृक्षांची खोलवर गेलेली खोड/मुळे वाहिन्यांत शिरून वाहिन्या खराब झाल्या आहेत. निवासी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत असते.

   नादुरुस्त, जीर्ण, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण इत्यादी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एमआयडीसी कडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. याकामासाठी जरी काही दिवसांनी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, टेंडर काढणे इत्यादी कामांसाठी काही महिने/वर्षे जातील त्यानंतर सदर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्ष जातील. त्यामुळे आरोग्य, प्रदूषण याविषयी असलेल्या या महत्त्वाचा प्रश्नात हे काम तातडीने लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.

-शरद शिंदे

‘निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे’ – केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

“निरोगी तन व शांत मन” हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.

सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी  कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी  सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.

 कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता  नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.

जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर “सुर नवा, ध्यास नवा, आशा उदयाची “या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून  सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

-संतोष दिवाडकर

आरएसपी युनिटच्या माध्यमातून योगसंध्या स्टुडिओ मार्फत योगाशिबिर संपन्न

जागतिक योग दिनानिमित्त कल्याण मधील स्वामी नारायण हॉल येथे आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या पुढाकाराने, स्वामीनारायण हॉलचे दिनेश ठक्कर यांच्या सहकार्याने, योगसंध्या वेलनेस स्टुडिओच्या संचालिका डॉ. संध्या रॉयकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. संध्या यांनी योगाविषयी प्रॅक्टिकल सह माहिती दिली, हे शिबिर ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यामधे जवळपास ३०० लोकांनी योगासनांचा लाभ घेतला. योगविज्ञान संदर्भात माहिती देताना डॉ. संध्या यांनी सांगितले की,  योग म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्वाची आणि शरीरस्वास्थ्य सह आनंदी जीवन प्राप्त करण्याच्या उपयुक्त असा योग्य मार्ग आहे. योगाचे ज्ञानयोग भक्तियोग हटयोग कर्मयोग राजयोग मंत्रयोग नादयोग लययोग, इत्यादी प्रकार आहेत. त्यामध्ये यम,नियम, आसन प्राणायम, ध्यान, समाधी, धारणा असे अष्टांग योग सांगितले आहेत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण माहिती दिली.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्र दुसऱ्या स्तरात ; सोमवारपासून नवे नियम

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उच्छाद हा बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसत आहे. एकूण रुग्णसंख्या, मृतदर आणि हॉस्पिटलमधील उपलब्धते नुसार महापालिका क्षेत्र दुसऱ्या लेव्हल मध्ये आलेले आहे. यामुळे सोमवार पासून महापालिका क्षेत्रात नियम अटी सह नवे बदल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध लादण्यात आले होते. यानंतर ह निर्बंध आणखीन कडक करण्यात आले. मात्र आता लाट ओसरल्यावर शिथिलता आणली जात आहे. त्यात कल्याण डोंबिवलीत सोमवार २१ जून पासून सर्व काही नियमित केले जाणार आहे. नियम व अटी मध्ये नमूद केल्या प्रमाणे आस्थापना सुरू ठेवण्यास महापालिकेने मुभा दिलेली आहे. संपूर्ण आठवडाभर हा बदल असणार आहे. २१ जून ते २७ जून पर्यंत नियमितपणे आस्थापना सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात २१ जून ते २७ जून पर्यंत अशा चालतील आस्थापना :-

kdmc

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या दिवसागणिक १०० च्या आत कोरोना रुग्ण सापडत आहेत. तर मृत्युदर देखील आटोक्यात आलेले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात २० जूनच्या आकडेवारीनुसार एकूण १२३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा.च्या हिंदी जाहिरातीला मराठी एकीकरण समितीने फासले काळे ; हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप

महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांवर हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या हिंदी जाहिरातीला मराठी एकीकरण समितीने काळे फासले आहे.

महाराष्ट्रात हिंदी भाषेचे आक्रमण हे जागोजागी पहायला मिळत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा अफवेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्यातील मराठी नागरिक गपगुमान हिंदी भाषेचं आक्रमण सहन करतं आहे. कायद्यानुसार पाहिलं तर कलम ३४३ नुसार भारत देशाला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही त्याउलट मराठी राजभाषा अधिनियम २०१५(सुधारित)नुसार स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच महानगरपालिका ह्यांना १००% कारभार हा मराठी भाषेत करणे बंधन कारक आहे. केंद्राकडून येणारी कोणतीही जाहिरात ही महाराष्ट्र राज्यात मराठी भाषे मध्ये अनुवादित करणे बंधनकारक आहे.

असे असतांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्रास पणे रस्त्यावर मराठी भाषेला गुळखोबरं देऊन कल्याण डोंबिवलीकरांवर हिंदी भाषा लादत आहेत. ह्याची वारंवार विनंती करून सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेत जाहिरात करतं नाही म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण डोंबिवलीच्या शिलेदारांनी महानगरपालिका ह्यांच्या वतीने जागोजागी केलेल्या हिंदी जाहिरातीला काळे फासून मराठी भाषेची मागणी केली. या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे संदीप पाटील, रुपेश भोईर, भावेश पाटील, संभाजी चव्हाण आणि मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार सहभागी झाले होते.

कायद्यानुसार मराठी भाषेत जाहिरात समजून घेण्याचा हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊन मराठी भाषेचा अपमान करत आहे. महानगरपालिका ह्यांना केवळ मराठी भाषेत कारभार करणे बंधनकारक असतांना सुद्धा हिंदी भाषा लादली जाते ते कुठे तरी थांबले पाहिजे असे मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

पोलीस उपायुक्तांच्या हस्ते अलका सावली प्रतिष्ठानच्या गरजूंना छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ

बेघर आणि गरजू लोकांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी कल्याण पश्चिमेतील ‘अलका सावली’ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी गरजू लोकांना छत्री वाटप करण्यात येते. यावर्षी देखील संस्था हा उपक्रम राबवत असून कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते काही लोकांना छत्री देऊन आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे, गरजूंना अन्नधान्य  वाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,  गरजू विद्यार्थ्यांना सायकली, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, खेळणी वाटप, गरजू महिलांसाठी अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते.

विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. अलका सावली प्रतिष्ठान हि संस्था सतत पाच वर्षापासून अखंड कार्यरत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांनी दिली. आज या छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्तांनी देखील या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत इतर संस्थांनी देखील असा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

 संस्थेने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह, कला शिक्षक यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अनिकेत वायले, दीपक सिन्हा यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुड न्यूज ! कल्याण डोंबिवलीत आज आढळले फक्त ३२ रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला होता. आता ही लाट पूर्णपणे ओसरून गेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आज दि.१९ जून रोजी या दोन्ही शहरात एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रातून कोरोना कमी होत असल्याने सध्या येथील शहरवासीय मास्क हटवून मोकळा श्वास घेऊ इच्छित आहेत. कारण दुसऱ्या लाटेने सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. दिवसागणिक २० हुन अधिक लोकांचे जीव जात होते तर दिवसाला २४०० रुग्ण सापडल्याचा ही रेकॉर्ड बनला होता. मात्र आता हे आकडे पूर्णतः वधारले आहेत. मागील दोन दिवसात कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झालेली नाही. तर आज १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. शिवाय आज फक्त ३२ रुग्ण आढळले आहेत. यातील निम्मे रुग्ण कल्याण तर निम्मे रुग्ण डोंबिवलीचे आहेत. महापालिकेने केलेल्या विभागवारी नुसार कल्याण पूर्वेत ६, पश्चिमेत १० तर डोंबिवली पूर्वेत १० आणि पश्चिमेत ६ रुग्ण आढळले आहेत.

आज दि.१९ जून रोजीच्या नव्या आकडेवारी नुसार आता महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण १३०६ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची लाट ओसरली असली तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासन करीत आहे.

-संतोष दिवाडकर

वीज बिल भरून सहकार्य करण्याचं महावितरण कडून आवाहन

महावितरणच्या कल्याण परिमंडळात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. तर सर्वच वर्गवारीतील सुमारे दहा लाख ग्राहकांकडे ५५२ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडळ अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या १७३१ वीजजोडण्यांचे १२४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर परिमंडलात शहरी भागातील पथदिव्यांच्या २०१७ वीजजोडण्यांचे ५१ कोटी रुपये वीजबिल येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या १०३१ वीजजोडण्यांची थकबाकी ४ कोटी ४० लाखांवर गेली आहे. दोन्ही सार्वजनिक सेवांचे थकीत वीजबिल भरून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा. अन्यथा या सेवांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने सूचित केले आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ९ लाख ९९ हजार ग्राहकांकडे ४४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर ‘बीएलओ’च्या कामाचा भार

एकीकडे दहावीच्या निकालाची शाळेत कामे सुरू असून दुसरीकडे शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शाळांमधील अनेक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या कामाचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती करणे,  दुबार, मयत, स्थलांतरीत व मतदान छायाचित्र चिटकविणे, मतदारांना आपल्या ताब्यातील नोटिसा बजावणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत.

यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे करायची असल्याने सर्व शाळांमध्ये शिक्षकांची निकालाची धावपळ सुरू आहे त्यातच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्यामुळे निकालाची कामे करायची की बीएलओची ? असा संतप्त सवालही अनिल बोरनारे यांनी प्रशासनाला विचारला असून तातडीने अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत पोलीस चौकी समोरील मेडिकल चोरट्यांनी फोडलं

डोंबिवलीतील मानपाडा मुख्य रस्त्यावरील ऑप्टिलाईफ हॉस्पिटल शेजारील शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

डोबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी ५  च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजाराची रोकड आणि कॉस्मेटिक सामान चोरले. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात हि घटना घडल्याने चोरांची हिम्मत वाढविल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या बाजूला २४ तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंटची येजा असते असे असतांना देखील चोरांनी केलेली हिम्मत चिंताजनक आहे.

दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवी मध्ये भरतांनाचे फुटेज मिळाले आहे. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे प्राथमिक तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे