राज ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त डोंबिवलीत मनसेने वाटली मोजून ‘इतकी’ रोपं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला. यंदा राज ठाकरेंचा ५३ वा वाढदिवस असल्याने १०५३ फुलझाडांचे वाटप मनसे डोंबिवली शहरातर्फे करण्यात आले.

गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले, टवटवीत, सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.

डोंबिवलीकर नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी केवळ १ तासात तब्बल १०५३ रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

-कुणाल म्हात्रे

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी क.डों.म.पा. सज्ज ; राबवणार ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज होत असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत. तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-19 ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळाच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल. याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील  कोविड-19 संसर्गाची लागण होणा-या 8 ते 12 वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैदयकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विदयालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विदयालये,  खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव,मेल आयडी, व्हॉटॲप क्रमांक,शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.

यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक‍ विदयालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुलक्षून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणा-या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विदयालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे  महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणानंतर भांडी चिकटतात या दाव्याची अखेर पोल खोल

कोविडशिल्ड लस घेतल्यानंतर शरीरात विशिष्ट चुंबकीय शक्ती संचारते व त्यामुळे ज्या ठिकाणी लस घेतली आहे त्या भागात व त्या आजूबाजूला चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. अशा प्रकारचा दावा करून एकप्रकारे बुवाबाजीला समर्थन केल्यासारखे होत आहे. याची पोल खोल शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी केली आहे.

लसीमुळे अंगात चुंबकीय शक्ती येऊन फक्त घरातील उथळ भांडे, चमचे, कॉईन हे चिपकत असतील तर अर्धा किलो ते एक किलोचे वजन ही चिपकायला हवे. तसेच दुकानात असलेले मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारे ५० ग्राम पासून पुढे सर्व वजने ही चिपकायला हवीत फक्त स्टेनलेस स्टील चिपकलेले दिसत आहेत. विज्ञान निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग यांवर विश्वास ठेवते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे कोणत्याही प्रकारची साधना व दैवी शक्ती नाही हे समजुन घ्यायची गरज असल्याचे स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

चमत्कार मागे हातचालाखी किंवा विज्ञान ह्या दोन गोष्टी असतात. ह्याच विज्ञानाचा आधार घेऊन चमत्कार केले जातात ज्याला दैवी शक्तीचं नाव दिले जाते. मानवी शरीर हे मलमूत्रची गटार आहे. विविध मार्गातून शरीरातील द्रव्ये ही बाहेर टाकली जातात. त्याचप्रमाणे घामामध्ये “सिबम” नावाचा चिकट द्रव्य असतो. तो घामावाटे शरीरातून बाहेर पडतो व त्वचेवर राहतो. जर खरोखरच अंगामध्ये चुंबकीय शक्ती असेल तर जमिनीवर ठेवलेल्या वस्तू ही बोटाने स्पर्श करून उचलता यायला हव्यात. तसेच अंगात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी घरात थांबू नये कारण घरातील किंवा आसपासच्या सर्व वस्तू अंगावर येऊन चिपकतील. तरीही डोळस होऊन एखाद्या चमत्कारामागील कारणमीमांसा समजुन घ्यायला हवी असेही शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन व जागर विज्ञानाचा कार्यक्रम शाहिर स्वप्नील शिरसाठ हे ठिकठिकाणी सादर करत असतात त्यात ते विविध चमत्कारांची उकल ही करत असतात. बुवाबाजी विरोधात संघर्ष करणाऱ्यांनी स्वतःवर ठाम विश्वास ठेवायला हवा. भूलथापांना बळी पडू नये चिकित्सक होऊन एखाद्या गोष्टींमगील कारणे शोधली पाहीजेत. स्वतःला व इतरांनाही बुवाबाजी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. कारण संतांनी समाजसुधारकांनी त्यासाठीच आपले आयुष्य वेचले होते असेही ह्यावेळी शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

‘…तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू ; कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा ईशारा

ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व कल्याण शहर (जि.) प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी गुरुवारी कल्याण मधील मुथा कॉलेज येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण शहर ओबीसी अध्यक्ष जयदीप सानप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सानप यांनी माळी यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत करत आपला कार्यअहवाल सादर केला.

यावेळी माळी यांनी बोलतांना सांगितले कि, ओबीसी समाज हा कॉंग्रेसमधून इतरत्र विखुरला आहे, मुस्लिमांची संख्या देखील देशात मोठी आहे. ते देखील विवीध राजकीय पक्षात दाखल झाल्याने कॉंग्रेच्या हक्काची मते बाजूला गेली आहेत. त्याचप्रमाणे दलित समाज देखील कॉंग्रेसपासून दूर गेला आहे. या सर्वाना पुन्हा पक्षात आणण्याचं काम प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी सोपवले असून या कामात यशस्वी होणार असून महाराष्ट्रात दलित, बीसी, ओबीसी, एससी, एनटी समजातील लोकांची आवक कॉंग्रेसमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रबळ होईल.

    आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच गाजला आहे. नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे मुद्दे सर्व विकून टाकले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं त्या त्या कंपन्या विकून खाजगीकरण केलं आहे. त्यामुळे आरक्षण पूर्णपणे संपत आलं आहे. जे काही थोडं आरक्षण आहे त्याच्यावर देखील घाला घालून या देशातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लीम यांना देशोधडीला लावायचा ऐतिहासिक कार्यक्रम बीजेपीने आरएसएसच्या माध्यमातून करायला सुरवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस कदाचित स्वंतत्रपणे लढून आपला प्रभावी पक्ष स्थान निर्माण करेल यासाठी तीन वर्षाचा कालवधी देखील आहे. कल्याण डोंबिवलीत देखील कार्यकर्त्याचं म्हणणे ऐकून नाना पटोलेयांच्यासोबत बैठक आयोजित करून पक्षाला उभारी द्यायचं काम केलं जाईल.   

काँग्रेस नेते प्रकाश मुथा, अलका आवळस्कर, माजी नगरसेवक इफ्तेकर खान यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी शिक्षण समिती सदस्य चंदर पांडे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनराज राठोड, शेरेकर, दिनकर राऊत, राजा जाधव, शिबू शेख, उपअध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजेश शर्मा, विनोद शिंपी, रियाज सय्यद, सुमित जाधव, रॉकी सिंह, संतोष नेटारे, अशपाक शेख आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भर पावसातही NDRF पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी केली कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींची पाहणी

हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या NDRF च्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम येथील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.

कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टी च्या काळात कोसळून दुर्घटना होण्याच्या संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या, त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.

११ ते १३ जुन या तीन दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज NDRF च्या टिम बरोबर त्यांनी पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्‍डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल ? याची तयारी करण्यासाठी देखील कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये NDRF च्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-संतोष दिवाडकर

दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मानवी साखळीद्वारे कल्याणमध्ये मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.

कल्याण पश्चिमेत सर्वपक्षीय नेते एकवटले

दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर,  गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर,  शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचा सहभाग

विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी देखील या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. हातात पोस्टर घेऊन ते स्वतः मानवी साखळीत जोडले गेले होते. मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.

मा.नगरसेवक कुणाल पाटील आंदोलनात सहभागी

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्कीनाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली भागात ८३.५ मीमी पावसाची नोंद ; पालिका आयुक्तांची दिवसभर कंट्रोल रूममध्ये निगराणी

परवा रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काल दुपारी १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात ८३.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागक्षेत्र अधिका-यांनी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आपापल्या मनुष्य बळाच्या सहायाने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. यामध्ये कल्याण (प) छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण पूर्व मधील दामोदर नगर, डोंबिवली पूर्व स्थानक परिसर येथील सखल भागात साचलेले पाणी मनुष्यबळ लावून, मॅनहोल चेंबर साफ करून त्याचप्रमाणे जेसीबी चा वापर करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. धोकादायक इमारती कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून सदर इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ प्रभागातील २ अतिधोकादायक इमारतीमधील २८ नागरिक स्थलांतरीत करण्यात आले. ‘ह’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैंकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. त्यापैकी ५ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या व ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘अ’ प्रभागात १ अतिधोकादायक इमारत असून सदर इमारत रहिवास मुक्त करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील २०१ प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या ५५१ सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून महापालिका आयुक्तांनी तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.

-संतोष दिवाडकर

एक लाख रुपयांसाठी सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण ; दोनच दिवसांत पाच जणांना ठोकल्या बेड्या

एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या आत परत मिळविण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे. हद्दीत फिर्यादी सुनिता राजकुमार नाथ वय ३० वर्षे राहणार कल्याण मुळ रा. हाजीपुर, पटना, बिहार राज्य ह्या ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महंमद अली चौक, शिवमंदिराच्या बाजुस एका दुकानाच्या बाहेर त्याच्या ६ महिन्यांच्या मुलांसह झोपल्या असतांना रात्री १० ते १ च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुनिता यांच्याजवळ झोपलेले त्यांचे ६ महिन्यांचे लहान बाळ जिवा याचे अपहरण केले होते. याबाबत ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सपोनि सरोदे, सपोनि पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या मदतीने तांत्रीक तपास करुन या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्याप्रमाणे आरोपींचा कसोशिने व चिकाटीने शोध घेवुन आरोपी विशाल चंद्रकांत त्र्यंबके वय २० वर्षे आटाळी आंबिवली,  कुणाल विष्णु कोट वय २३ वर्षे रा.साई राणा चाळ,दिवा पुर्व, आरती कुणाल कोट वय २२ वर्षे,  हिना फरहान माजीद वय २६ वर्षे रा. कोटर मशिद जवळ, भिवंडी,  फरहान अब्दुल रझाक माजीद वय ३८ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन अपहरण केलेले ६ महिन्याचे बाळ ४८ तासाच्या  आत सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट हे काही कामधंदा करीत नाहीत. आरोपींनी आपसात संगनमत करुन आरोपी  हिना माजीद आणि फरहान माजीद यांना लहान बाळ  एक लाख रुपयांना विकण्यासाठी आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट यांनी फिर्यादी जवळ झोपलेले लहान बाळ अलगद उचलुन त्याचे अपहरण करुन ते आरोपी आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरतीने हे बाळ आरोपी हिना माजीद व फरहान माजीद यांच्या ताब्यात देवुन ते तिघेही रिक्षातुन बाळाला घेवुन जात असतांना त्यांना शिताफीने अटक करुन त्यांच्या ताब्यातुन बाळ सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी हिना व फरहान माजीद हे गुन्हयात निष्पन्न झालेल्या पाहीजे असलेल्या आरोपी महीलेला हे बाळ विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या पाहीजे असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तर या पाचही आरोपींना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ जून पर्यंत पोलीस कोठडीमध्य रवानगी केली आहे.

सदरची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, प्रकाश पाटील, पोउनि संजय जगताप, सपोउनि जे.के.शिंदे, पोहवा निकाळे, भालेराव,पोना ठिकेकर, भालेराव,  भोईर, हासे, मधाळे, पोशि जाधव, निसार पिंजारी यांनी केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ढोले हे करीत आहेत.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा ; मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण पूर्वेतील आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील वाचणार आहे.  

नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आडीवली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगपती विजय भाने, माजी नगरसेवक गणेश भाने, माजी सरपंच बळीराम भाने, समाजसेवक अनिल पाटील,   माजी उपसरपंच वासुदेव गायकर, केशव भाने, पंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागातील द्वारली आरोग्य उपकेंद्र याठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरु झाले असून आता आडीवली येथे देखील लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे. यामध्ये डुरक्या घोणस, २ धामण, धूळ नागीण आणि दिवड  या सापांचा समावेश आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर या दोघांनी हि कामगिरी केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील बितुल सोसयटी परिसरात भक्ष्य गिळंकुत करण्याच्या तयारीत असलेल्या साडेचार फुटी लांब सापाला पाहुन पाहणाऱ्याची भांबेरी उडली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डुरक्या साप आपले भक्ष्य उंदीर गिळंकृत करण्याच्या स्थितीत आढळल्याने बाघ्याची भितीने धादंल उडली स्थानिक रहिवाशी वाजपेयी यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत डुरक्या या साडे चार फुटी घोणस सापास पकडले.

  डुरक्या सापाचे वैशिष्ट्य असे की  उंदीर, घुशी, सरडे यांना पकडल्या नंतर आवळुन त्यांचा श्वास बंद झाल्यानंतर भक्ष्य गिळंकृत करतो हा घोणस प्रकारात मोडत असून बिनविषारी साप आहे. या  डुरक्या सापाबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी उपस्थितीता मध्ये जन जागृती करीत जीवनदान दिलेल्या डुरक्या सापास वनपाल एम्. डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.

       तर खडकपाडा प्रफुल सोसायटीमध्ये दिवड साप, उंबर्डे गावांमध्ये आठ-नऊ फुटाची धामण तर सापर्डे गावामध्ये धूळ नागीन मिळाली असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे