कल्याण शहरात जल्लोषात सुरू झाला ‘कल्याण महोत्सव’

Kalyan Mahotsav : मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने तिसगाव येथील गांवदेवी मंदिराच्या प्रांगणात काल पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती जपणारा महोत्सव म्हणून कल्याण महोत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. १२ मार्च ते १६ मार्च पर्यंत कल्याण पूर्व तिसगाव गांवदेवी मंदिर मैदानात हा महोत्सव सुरू असणार आहे. लकी ड्रॉ मार्फत दररोज महिला व युवतींसाठी साड्या तसेच ड्रेसपीस बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहे. महोत्सवात भजन, कीर्तन, पोवाडे, मंगळागौरी, होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा तसेच कुस्तीचे सामने असे विविध सांस्कृतिक उपक्रम पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खवय्यांसाठी खाणपानाचे स्टोल व इतर वस्तूंचे स्टोल देखील आहेत. लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी एम्युजमेंट पार्क देखील बनवण्यात आला आहे. तसेच या महोत्सवात दररोज सेलिब्रिटिंच्या भेटी देखील होणार आहेत.

कल्याण महोत्सवाची प्रमुख कार्यकारिणी : दिलीप दाखिनकर (अध्यक्ष), महेश गायकवाड (आधारस्तंभ), संजय गुजर (कार्याध्यक्ष), प्रशांत बोटे (उपाध्यक्ष), प्रतीक महिले (सल्लागार), अस्मिता माने (सचिव), निलेश सावंत (सहसचिव), संदीप भालेकर (सहसचिव), अजित चौघुले (खजिनदार), वैशाली ठाकूर (सहखजिनदार), सुगंधा चव्हाण (सहखजिनदार), रवींद्र उतेकर (प्रसिद्धी प्रमुख).

-संतोष दिवाडकर

Web Title : Kalyan Mahotsav starts in Kalyan city

कल्याण पूर्वेत सहा हजार रोपांच्या माध्यमातून साकारणार शिवरायांची प्रतिमा

Kalyan Shiv Jayanti : कल्याण पूर्वेतील गेल्या ३६ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी वृक्ष रोपांच्या माध्यमातून भव्य अशी शिवप्रतीमा निर्माण करण्यात येणार असून शिव जयंती नंतर हीच वृक्षांची रोपे विविध संस्था संघटनांना वृक्षारोपणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.

गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंध कायम असल्याने कोरोना संदर्भातील सर्व अटी शर्तींना अधिन राहून १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती उत्सव तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या उत्सवा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  चेहर्‍याची विविध प्रकारच्या सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून प्रतीकृती निर्माण करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश तसेच विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुमारे पंधराशे चौरस फुटामध्ये साकारण्यात येणाऱ्या शिवप्रतीमेत वापरली जाणारी वृक्षांची रोपे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था संघटनांना देण्यात येणार असुन ज्या संस्था संघटना या रोपांचे पुढच्या वर्षा अखेर चांगल्या प्रकारे जतन आणि संवर्धन करतील अशा संस्था संघटनांचा पुढील वर्षीच्या जयंती उत्सवात विशेष असा सन्मान करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमातील साकारण्यात येणाऱ्या शिव प्रतीमेचे दर्शन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Web Title : The image of Shivaji maharaj will be created through 6,000 saplings in Kalyan East

Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप केला आहे. मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी या प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला असून शिवसेनेने फायदा होईल अशीच रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “जिसकी लाठी उसकी भैस” या पंक्ती प्रमाणे शिवसेना सत्तेचा फायदा घेत आहे आणि आपल्या सोइ नुसार प्रभाग पाडले जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कोरोनामुळे KDMC निवडणूक बरीच लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुकेचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने आरोप केल्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या जातात की नाही हे देखील पहावे लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र आता युतीतून वेगळे झाल्यानंतर भाजपची काय भूमिका असेल हे देखील पहावे लागणार आहे.

-रोशन उबाळे

Raju Patil: MNS MLA alleges that Shiv Sena has formed wards according to its own convenience

KDMC New Ward : ‘इतके’ आहेत नवे प्रभाग; तुमचा प्रभाग जाणून घ्या

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आज नवी प्रभाग रचना ( KDMC New Ward ) जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारांची आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.

क.डों.म.पा.ने जाहीर केलेल्या यादीनुसार आता १२२ ऐवजी ४४ प्रभाग असणार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रभागांची संख्या कमी वाटत असली तरी प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक विस्तार आणि सीमा वाढविण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि भौगोलिक रचनेच्या आधारावर नवे प्रभाग बनविण्यात आले आहेत. एका प्रभागात चार जागांसाठी निवडणुका रंगतील तर काही प्रभागात मात्र तीन जागा असणार आहेत. अश्या एकूण १३३ जागांवर क.डों.म.पा.ची निवडणूक रंगणार आहे.

नव्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्ष यांना आपल्या योजना आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे OBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात सुरू असून राज्यसरकारचे लक्ष त्यावर आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला असून तेथेही प्रशासकीय राजवटीची तयारी केली जात आहे. त्यामुळे प्रभाग रचना जरी जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात निवडणुका केव्हा होतील हे काही सांगू शकत नाही.

-संतोष दिवाडकर

KDMC New Ward : New ward structure of Kalyan Dombivali Municipal Corporation announced

मोठी बातमी! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बाप आणि भावाकडून लैंगिक अत्याचार

Kalyan Crime : बाप आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कल्याण च्या कोळसेवाडीमध्ये उघडीस आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बाप आणि भावा कडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना उघड झाल्या नंतर कोसळसेवाडी पोलिसांनी दोन्ही बाप बेट्याना अटक केली आहे.

कोळसेवाडी परिसरातील बाप लेकावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाले आहेत. मित्राला चहा का दिला यावरून पीडितेच्या बापाने पिडीतेला बेदम मारहाण केली होती. यानंतर सामाजिक संघटनांना याबाबत माहिती मिळाली असता सखोल विचारपूस केल्यानंतर अल्पवयीन पीडितेने नराधम बापाने आणि भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर कथन केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपींना गजाआड केले आहे.

बाप आणि भावाकडून लैगिंक अत्याचार होत असल्याची माहिती आईसह शेजाऱ्यांना पिडीतेने दिली होती. यानंतर सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आणि घृणास्पद आणि संताप जनक प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई होण्यासाठी देखील मागणी होऊ लागली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख व पोलिस अधिकारी बोचरे आणि कोळसेवाडी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

-रोशन उबाळे

A minor girl was sexually abused by her father and brother in Kalyan

KDMC च्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल; मनसे आमदार राजू पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत.

क.डों.म.पा. (KDMC) चे माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन आणि गोविंद बोडके यांच्यासह चंद्रप्रकाश सिंह, रवि राव, मारुती राठोड ADTP, सुरेंद्र टेंगले, ज्ञानेश्वर आडके, सुखदेव जाधव, रघुवीर शेळके, संजय भोळे, भागवत, सुहास गुप्ते, हरकचंद जैन, अनिल आर. निरगुडे आणि स्वत: विकासक यांच्यासह इतरत्र बदली झालेल्या माजी महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.

माजी अपक्ष नगरसेवक अरुण पी गीध यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अ‍ॅड. अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिला. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली आहे असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्यानंतर अनेक अनियमित नियमाना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एसएचओने सांगितले की, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८, १२० बी, आर डब्ल्यू , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण भाग जानेवारी २००४ च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.

“माजी आयुक्तांच्या पाठीवर कुणाचा हात ?” – राजू पाटील

जोरदार चर्चेत असलेल्या आणि चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आता समाज माध्यमांद्वारे सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनो यावर काय बोलाल ? कोटींचा घाटा त्यात वाघाचा घाटा ? या आयुक्तांमागे कुणाचा हात ? यांचा कोण नाथ असेल ? असे प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत. या पोस्ट नंतर शहरातील पालिका वर्तुळात हा विषय आता आणखीनच चर्चेत आलेला आहे.

-रोशन उबाळे, संतोष दिवाडकर

Charges filed against former KDMC commissioner; MNS MLA Raju Patil’s question to the ruling party

प्रेरणादायक : कचरा वेचून महिलेने विकत घेतली नवी कोरी चारचाकी गाडी

कल्याण :-काम ही सर्वश्रेष्ठ बाब आहे. मग ते कोणतेही असो याची महती सांगणारी प्रेरणा दायक घटना कल्याण (Kalyan News) मधील वाडेघर डम्पिंग ग्राउंड परिसरात घडली आहे. निर्माण होणारा घनकचरा हा फेकून दिला जात असला तरी तो योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरू शकतो. हीच किमया कचरावेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क नवी कोरी बोलेरो पिकअप गाडी घेतली. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने त्यांच्यासह अन्य कचरावेचकांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २५ मे २०२० पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली. ती प्रत्यक्षात आण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे बंद केले होते. त्यामुळे त्याठिकाणी कचरा वेचणाऱ्या जवळपास ४०० कचरा वेचकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना क आणि ब प्रभाग क्षेत्रातील ५० सोसायट्यांमधून सुका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी रेखा यांनी पुढाकार घेतला. गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी रेखा महापालिकेस देतात.

त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यापैकी विक्री योग्य कचऱ्यातून त्यांना उत्पन्न मिळते. उर्वरीत कचरा रिसायकलिंगसाठी जातो. कचऱ्यातून त्यांनी पैसा कमावून चक्क बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली आहे. सध्या हा प्रयोग दोन प्रभाग क्षेत्रात राबविला जात असला तरी उर्वरीत ठिकाणीही तो राबविण्याचा मानस उपायुक्त कोकरे यांनी व्यक्त केला.

-रोशन उबाळे

In Kalyan, a woman bought a new four-wheeler by selling garbage

डोंबिवलीत कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा सप्लाय करणाऱ्या तिघांना अटक; अतिदुर्गम भागातून आणल्या जात होत्या गोण्या

डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ठाणे वनविभागाची धडक कारवाई

कल्याण : भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून ठाणे वनविभागाने (Thane Forest) हि  धडक कारवाई केली आहे.  रमेश तुकाराम वाळिंबे रा.आल्यानी, बारकु गणपत हिलम रा.कळगाव, गणेश गुरुनाथ वाघ रा.कळगाव अशी आरोपींची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणारे आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे वनक्षेत्रपाल पडघा यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून रेंज स्टाफ वनपाल वनरक्षक पडघा यांच्या समवेत नाशिक मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोड जवळ मौजे कासने गाव हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी भेकर जातीचे पिल्लू अवैध विक्री व्यवहार करताना तीन आरोपींना जिवंत भेकराच्या पिल्ला सोबत पकडले. या आरोपींना भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत दिनेश माळी (वनपाल पडघा), विलास निकम (वनपाल वडपा), श्याम चतुरे (वनपाल दिघाशी), अजय राठोड (वनरक्षक सांगावं), अमित कुलकर्णी (वनरक्षक पाच्छापूर), जमीर इनामदार (वनरक्षक लोनाड), पंकज भाऊसाहेब (कार्यालयीन लेखापाल), महेंद्र भेरे (कार्यालयीन कर्मचारी), वाहन चालक विकास उमतोल, संतोष गोडांबे, वनमजूर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत आरोपीने वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त केल्या असल्याची माहिती वनपाल साहेबराव खरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

Three arrested for selling deer calves; Action taken by Thane Forest Department

रस्त्यावरील बेवारस उभी वाहनं KDMC ने हटवली

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काही निर्देश घालून दिले होते. यानुसार ‘4-जे’ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव रोड, सुचकनाका, पत्रीपुल, कचोरे या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली व दैनंदिन साफसफाईस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली एकुण १६ बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

आज सकाळी करण्यात आलेली ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या सहाय्याने व टोइंग मशीन, डंम्‍पर व जेसीबी च्या मदतीने करण्यात आली.

सध्या महानगरपालिका शहरातील स्वच्छता या विषयावर मोठा भर देत असून वास्तवात शहराला बकालपणातुन बाहेर काढीत सौन्दर्यदृष्टी प्रमाणे कामकाज सुरू आहे. वेळोवेळी नागरिकांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, भिंतीवर रंगकाम अश्या सर्व बाबींवर महापालिका बारकाईने काम करत आहे. मात्र शहराला स्मार्ट करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आधी स्मार्ट होणं गरजेच आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC removed unattended vehicles on the road