राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने ‘आम्ही यशस्वी महिला’ परिसंवाद

कल्याण : विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने आम्ही यशस्वी महिला ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता.

 शाळेतील मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना टिळक नगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका लीना मॅथ्यू म्हणाल्या, शिक्षणातून सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. मला माझ्या आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या योगदानामुळे मी खेळाडू  झाली आणि शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाली आता मुख्याध्यापिका आहे. उच्च न्यायालयातील वकील मनीषा भिलारे यांनीही मुलांना आपण कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचं जीवन कष्टमय असते असंही त्या म्हणाल्या.

उद्योजक लीना शिर्के यांनी चिकाटी आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत अपयश येते पण खचून न जाता प्रयत्न करा. माझ्यासारख  तुम्हालाही यश मिळेल असे त्या म्हणाल्या. परिसंवादात शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सह शिक्षक विद्यार्थी उपथित होते. गायत्री चव्हाण. सुहानी चौधरी. सुवार्ता पवार. प्रशिक थोरात  या मुलींनी सहभाग  घेतला. परिसंवादाचे प्रस्ताविक व आभार सहशिक्षिका माधुरी काळे यांनी मानले. जिजामातांच्या भूमिकेत मनस्वी मढवी व बाल शिवाजी मंथन मढवी हे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण होते.

-कुणाल म्हात्रे

भूमिपूजन सोहळे आटपून खासदार श्रीकांत शिंदेंचं निकटवर्तीयाच्या घरी स्नेहभोजन

मलंगगड :- मलंगगड भागात विविध ठिकाणच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे निकटवर्तीय अक्षय बाळाराम काठवले यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. याच ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेल्यांनी स्नेहभोजन केले. अक्षय काठवले यांच्याशी विविध कामाच्या विषयांवर चर्चा केली.

या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, वामन म्हात्रे, धनंजय बोडारे, महेश गायकवाड तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदारांनी काठवले यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन मलंगगड भागातील रखडलेल्या कामांबाबत चर्चा केली. लवकरात लवकर कामे केली जातील असे आश्वासन शिंदे यांनी काठवले यांना दिले. अक्षय काठवले यांनी खासदारांना महाराष्ट्र ग्रामीणमधील खेडेगावांची गावठाण विस्ताराची समस्या तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात एक निवेदन देखील दिले आहे. या निवेदनाचा स्वीकार करत खासदार श्रीकांत शिंदेंनी अक्षय काठवले यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली आहे.

-संदेश दाभने

ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीत दोघांचा मृत्यू

डोंबिवली :- ताडीचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या तरुणांचा यात मृत्यू झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे.

विषारी ताडीमुळे हा मृत्यू झाल्याची आधी चर्चा होती मात्र ताडीच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना डॉक्टरांकडून मिळाली आहे. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र सोमवारी सायंकाळी आपल्या आणखी दोन मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरमध्ये ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि स्वप्नील घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.

ताडी पिऊन इतर दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन केले असता ताडीचे अति सेवन केल्यामुळे त्यांना झोप लागली आणि त्यात त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

‘एपीएमसी’ मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांना ‘नो एन्ट्री !’ – क.डों.म.पा. आयुक्त

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांचे कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस झालेले असणे बंधनकारक असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतिले आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार देखील जात असतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळते. यासाठी बाजार समितीला किरकोळ ग्राहकाला परवानगी देऊ नये, घाऊक व्यापारी आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा लस घेतली असेल त्यांनाच परवानगी द्यावी. बाजार समितीमध्ये  गर्दी होणार नाही यासाठी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

 लक्ष्मी मार्केट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते तिथे देखील एक दिवसा आड ओटे सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत. मोठ्या गृहसंकुलांमध्ये २५ टक्के सदनिका मधील रहिवासी पॉझिटिव आले तर त्या गृह संकुलातील सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरकाम करणारे किंवा अजून काही नोकरचाकर असतील त्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक असणार आहे. संसर्ग असलेल्या घरांमध्ये कोणालाही परवानगी देऊ नये ही सर्व जबाबदारी त्या हाउसिंग सोसायटीचे असणार आहे. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या गृहसंकुलाला पहिल्यांदा ५ हजारांचा दंड असून दुसऱ्या वेळी देखील नियम मोडल्यास त्या गृहसंकुलाला १० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

 वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जेवढ्या खाटा लागतात त्याच्यापेक्षाही जास्त व्यवस्था केलेली आहे. नऊ हजार सहाशे पंचावन्न आपल्याकडे खाटा असून त्यामध्ये २९९५ ऑक्सिजनचे बेड असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मधील पोलिसाची त्याच्याच पत्नी आणि मुली कडून हत्या

कल्याण :- पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या नाना पावशे चौकातील एका इमारतीत रहाणाऱ्या पोलिस हवालदार कुटूंबाचा घरगुती वाद इतका विकोपाला गेला की या वादातून पत्नीने पेशाने पोलिसात असलेल्या पतीच्या डोक्यावर जबरी मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. या मारहाणीत मयत इसमाची मुलगीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पत्नी आणि मुलगी या दोघां विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाना पावशे चौकातील हिरा पन्ना अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्या वरील रूम नं १५ मध्ये रहाणाऱ्या बोरसे कुटूंबामध्ये ६ जानेवारीच्या रात्री ९ चे सुमारास कौटूंबीक वाद होऊन या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. विकोपाला गेलेल्या या हाणामारीत मयत प्रकाश राजाराम बोरसे (५५) याला त्यांची पत्नी ज्योती प्रकाश बोरसे (४५) आणि मुलगी भाग्यश्री प्रकाश बोरसे (२७) या दोघींनी कपाळावर, तोंडावर जड वस्तूने मारहाण करीत ठेचून मारल्याने या मारहाणीत जबरी जखमी झालेले प्रकाश बोरसे यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात नेले असता औषधोपचार सुरु होण्या पूर्वीच प्रकाश बोरसे याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जिवे ठार मारण्याच्याच उद्देशाने केलेल्या मारहाणीत प्रकाश बोरसे यांचा खून केल्या प्रकरणी पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भा . द . वि . ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री . बशीर शेख यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक सी. एम . कदम अधिक तपास करीत आहेत. मयत प्रकाश बोरसे हे कुर्ला येथील पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होते.

-शरद शिंदे

कल्याण आरटीओ परिसरात बेकायदेशीरपणे उभ्या राहिलेल्या टपऱ्या हटवल्या

कल्याण :- बिर्ला कॉलेज जवळील परिवहन प्रादेशिक कार्यालय परिसरामध्ये असणाऱ्या बेकायदेशीर टपऱ्या व अतिक्रमणावर नुकतीच कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या ‘ब’ कार्यालयातील आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई केली आहे. परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर टपर्‍या लावल्याने लोकांना येण्या जाण्यास आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण केला होता.

चंद्रमणी उपाध्याय यांनी होणाऱ्या त्रासा विषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. यानंतर जेसीबी, पोलीस फाटा आणि महापालिका कर्मचारी बाळू शिंदे, म्हात्रे , शेवाळे, महाले आणि पथक कर्मचारी उपस्थित होते. या छोट्याशा पण महत्त्वाच्या कारवाई नंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

-रोशन उबाळे

व्यापाऱ्यांनो प्लॅस्टिक पिशव्या वापरताय तर सावधान! प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची सुरू आहे जोरदार कारवाई

कल्याण : प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध  प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे १६७  किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले आणि १ लाख ६० हजार  इतका दंड संबंधितांकडून आकारला आहे.

डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात रेल्वेस्थानक लगतच्या परिसरात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी तेथील नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करणे बाबत अवाहन करून जनजागृती केली त्याच प्रमाणे फ प्रभागातील भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. आय प्रभागात ही प्लास्टिक बंदी बाबत सहा. आयुक्त संजय साबळे यांनी व्यापारी संघटना व महिला बचत गट यांची एकत्रित सभा घेऊन त्यांना प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल न वापरणे बाबत सूचना केल्या.

-कुणाल म्हात्रे

वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार खमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातुन मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयासाठी जबरदस्तीने अपहरण करुन नेल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच सपोनिरी दत्तात्रय सानप यांना तक्रारदार यांची तक्रार घेवुन त्याप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला.

डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. बॅनर्जी याने या तिन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतकडून दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात झाला. बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. त्याने दोन साथीदारांसह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत बॅनर्जी यांचे अपहरण केले.

अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या नंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच तांत्रिक बाबीचा तपास करून पोलिसांनी नालासोपारा येथील गोराई नाक्या जवळील एका हॉटेल मध्ये छापा मारून  बॅनर्जी यांची सुटका करून मनजीत यादव व त्याचे दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांना   ताब्यात घेतले. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश मध्ये राहणारे असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

-कुणाल म्हात्रे

‘भारत सेवा रत्न गोल्ड मेडल २०२२’ पुरस्काराने शिक्षिका ललिता मोरे सन्मानित

कल्याण : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन उडीसा राज्य तर्फे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मनिलाल शिंपी (ब्रँड अँबेसिडर डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र) यांच्या वतीने गणेश विद्या मंदिर शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांना “भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड 2021” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कारसमयी आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठक्कर, संध्या माध्यमिक विद्यालयाचे अरविंद देवरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका छाया शिंपी,  ज्येष्ठ शिक्षिका स्मिता सोंजे, रंजना पाटील, रिता मिस्त्री या ज्येष्ठ शिक्षकांच्या व इतर शिक्षक सहकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत छाया शिंपी यांनी ललिता मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. पुरस्काराचे मानपत्र  आरएसपी कमांडर मणीलाल शिंपी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना सी.सी.टी.व्ही.च्या सहाय्याने केली अटक; डोंबिवली मानपाडा पोलिसांची कामगिरी

डोंबिवली : दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलीसांनी सी.सी.टी.व्ही.च्या आधारे पाठलाग करून अटक केले आहे. कल्याण तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रात चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे घडल्याने, सर्वसामान्य जनतेमध्ये त्यात विशेषतः महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. अशाच प्रकारच्या अनेक चैन स्नचिंग डोबिंवली शहरामध्ये झाल्यामुळे पोलीस विभागास गुन्हे उघडकीस आणणे व आरोपींना अटक करण्याचे एक मोठे आव्हानच आरोपींनी दिले होते.

चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी विविध पोलीस पथके तयार केली होती. या पथकांनी ज्या भागातुन चैन स्नैचिंग झाली आहे. त्या भागातील ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी मानपाडा पोलीसांनी केली. चैन स्नॅचिंगचे  गुन्हे उघडकीस आणणेसाठी मानपाडा पोलीसांकडून अहोरात्र सर्वोतोपरी प्रयत्न चालु होते. मानपाडा पोलीस डोबिंवली शहरामधील  सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीचा पाठलाग करत असताना चैन स्नैचिंग करणारे दोन इसम  विकेश रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकुर दोन्ही रा. दावडीगांव, डोंबिवली पुर्व यांना पकडुन त्यांच्याकडे चौकशी केली असता लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी एका बाइकवर वेगवेगळ्या ठिकाणी चैन स्नैचिंग करुन ते दागिने जबरीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० हजार किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल व २४०० रुपयांचे दोन मोबाईल असा एकुण ७ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली व विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीतील १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांचेकडे आणखी चौकशी सुरू असुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे,  सपोनिरी. सुरेश डांबरे, अविनाश वनवे, पोहवा राजेंद्र कोळी, खिलारे, विजय, पोना महादेव पवार, यल्लपा पाटील, अनिल घुगे, प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, दिपक जाधव ,पोशि महेंद्र मंझा यांच्या पथकाने केले.

-कुणाल म्हात्रे