साकेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ‘सायबर गुन्हे जनजागृती’चे धडे

कल्याण : कल्याण पूर्वेत साकेत महाविद्यालय व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेझिंग डे या सप्ताहानिमित्त “सायबर गुन्हे” या विषयावर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर एम.कदम यांनी युवकांना एटीएमचा पासवर्ड कोणाला शेअर करू नये, अंतरजाल द्वारा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असा सल्ला दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले सांगितले की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण व खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबत स्टडी वेल्थ संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन खरेदी करताना कोणती फसवणूक आणि कशी केली जाते याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबर झालेल्या गुन्ह्यांबद्दल चर्चा करेल चर्चा केली. त्यावर विविध उपाय सांगण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये शाखेत ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी साकेत कुमार, सीईओ शोभा नायर, पोलीस निरीक्षक डोके, उपप्राचार्य नवनाथ मुळे, प्रिया नेरलेकर हे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चौधरी व आभार प्रदर्शन प्रकाश जाधव सरांनी केले.

त्याचप्रमाणे आज सेंट पॉल कॉलेज, आशाळेपाडा याठिकाणी देखील सायबर जागरूकता दिवसाच्या अनुषंगाने सायबर अवेअरनेस या विषयावर वाख्यान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांना सायबर विषयी विविध समस्यांची, मुद्द्यांची माहिती देण्यात आली. या वाख्यान कार्यक्रमास पो. नि. धनंजय कापरे व स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील वाढीव कर मागे घेण्याची ‘जागरूक नागरिक’ची मागणी

कल्याण : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून त्या ठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचीच सत्ता असून याठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी न देता किमान जी २२ टक्के कर वाढ  केली आहे ती मागे घेण्याची मागणी जागरूक नागरिकच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. तसेच इतरही अनेक समस्या असून त्या ५ जानेवारी पर्यंत न सोडविल्यास १० जानेवारी पासून जागरूक नागरिकच्या वतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

जागरूक नागरिकने ५०० फुटापर्यंतच्या सदनिकांचा कर माफ करावाची मागणी कुठेही केलेली नाही. कल्याण-डोंबिवली च्या नागरिकांना जो २२ टक्के वाढीव कर भरावा लागत आहे तो माफ करावा अशी आपली मागणी आहे. मुळात विकासक आणि बिल्डर यांना त्यांच्या ओपन लँड टॅक्स मधून सवलत मिळावी म्हणून पालिका प्रशासनाने आधीच जमिनींचा रेडीरेकनरचा दर  ६४.३५ टक्के कमी केलेला आहे. हा कमी केलेला रेडीरेकनरचा दर नागरिकांच्या मालमत्ता कराला सुद्धा आपोआपच लागू होतो. त्यामुळे आत्ता जी बिले नागरिकांना मिळालेली आहेत ती बिले चुकीची असून त्यातही ६४ टक्के सवलत नागरिकांना मिळणे भाग असल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले.

दोन्ही महानगरपालिकेमध्ये सत्ता एकाच पक्षाची असल्याने ही मागणी अत्यंत रास्त आहे. महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असेल तर ही ठीक बाब राज्यशासनाने सोसावयास काही हरकत नाही. त्याप्रमाणे कल्याण पश्चिमेस त्वरित कल्याण डोंबिवलीचा म्हणजेच कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व,पश्चिम मांडा-टिटवाळा मोहना, २७ गावे येथील ओला व सुका कचरा येऊ नये. या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी त्याचा निचरा ही होणे गरजेचे आहे. यासारख्या मागण्यांवर दिनांक ५ जानेवारी पर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास दिनांक १० जानेवारी पासून ‘जागरूक नागरिक’ बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

कालीचरण महाराजांवर कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

कल्याण :- सध्या महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनलेले कालीचरण महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. १० डिसेंबर राजी कल्याण शहरात येऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

श्री शिवप्रताप फाउंडेशनच्या वतीने १० डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेत शिव प्रताप दिन साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. उपस्थित समुदायाला संबोधित करताना त्यांनी मंचावर भाषण केले होते. या भाषणातून त्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या थोर पुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्याचप्रमाणे दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सांगितले.

एसटीपीआय पार्टीचे फरदीन पैकर आणि राष्ट्रवादीचे नोवेल साळवे, मनोज नायर, पत्रकार बाळकृष्ण मोरे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याबाबत सोमवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यामुळे यानिमित्ताने कालीचरण महाराज पुन्हा कल्याण मध्ये येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

-संतोष दिवाडकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी क.डों.म.पा.चं अभिवादन; १० विद्यार्थिनींना हॅपीनेस किट्सचे वाटप

कल्याण : आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, विनय कुलकर्णी, अनंत कदम, वैदयकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जयंती दिन हा सर्वत्र “बालिका दिन” म्हणूनही साजरा केला जात असल्याने, त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महापालिकेच्या शाळांमधील १०  विद्यार्थिनींना (बालिकांना)  महापालिका शिक्षण मंडळ व अक्षयपात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा अंतर्भाव असलेल्या हॅपीनेस किट्सचे वाटप महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,इतर अधिकारी वर्ग व शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याहस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या घनकचरा विभाग मार्फत दि. ३ ते ९ जानेवारी हा सप्ताह प्लास्टिक निर्मूलन म्हणून साजरा केला जात असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील पालिकेच्या जे प्रभाग कार्यालयात; अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या तमाम महिला वर्गाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणा-या अन चूल-मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांना प्रवाहात आणणा-या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त रामदास कोकरे  यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्लास्टिक निर्मूलनची शपथ सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, प्रमाग क्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने शपथ घेतली. यात प्रभागातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

-कुणाल म्हात्रे

मोहने आंबिवली रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडेदर सर्वेक्षण विनाविलंब करण्याची मागणी

आंबिवली:  मोहने आंबिवली शहरातील रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर सर्वेक्षण विनाविलबं करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि मोहने आबिवंली विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस पोलिस प्रशासन यांचे मोहने आंबिवली विभागातील वाहतुक व्यवस्था याबाबत दुर्लक्ष होत आहे. मोहने आंबिवली हा परीसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे.  मोहने आंबिवली शहराचे झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण झालेले आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली आहे. हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असुनही मोहने आंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही बाब खेदजनक आहे.

आंबिवली मोहने शहरात वाहतुक व्यवस्था नियोजन या करिता आजगायत वाहतुक नियमन व उपाययोजना केल्या नाहीत. कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर निश्चिती सर्वेक्षण करण्यात आले पंरतु मोहने आंबिवली शहरातील प्रवासी व रिक्षा आवश्यकता व प्रवाशी व रिक्षांची अमाप संख्या जास्त असुनही रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा सर्वेक्षण शहराअतंर्गत केले नाही ही बाब आश्चर्यजनक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणा बाबत खुलासा व अवगत करुन विनाविलंब शहराअतंर्गत रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा रुट भाडेदर निश्चित सर्वेक्षण करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

३ जानेवारी पासून क.डों.म.पा. करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

कल्याण :- दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे. यासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबर द्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर द्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा सध्या सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधा सुद्धा मुलांसाठी उपलब्ध आहे. यावेळी येताना लाभार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगावा. पालिकेने नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या हद्दीत असणारे लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.

१. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम

२. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम

३. सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व

४. शक्तीधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व

५. आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम

६. मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड, आंबिवली

या लसीकरण केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) उपलब्ध राहणार आहे. लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड जवळ बाळगणे अनिवार्य राहील. महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) तेथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

-रोशन उबाळे

अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या युवकाला विनयभंगाच्या गुन्हयाखाली अटक

कल्याण :- तरुणी सोबत अश्लील चॅटिंग आणि व्हडिओ कॉल करणाऱ्या एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित युवकाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर मध्ये राहणारा गुरूदीपसिंग चतुरसिंग खालसा हा तरुण फेशन शॉ साठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड करतो. एका जाहिरातीत काम करण्यास नकार दिल्याने एका तरुणीला त्याने निशाणा बनवले. आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर करून त्याने या तरुणीशी संपर्क केला. पुढे अश्लील चॅट करून अश्लील व्हिडीओ कॉल केला. यामुळे संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी काहीही माहिती नसल्याने तांत्रिक आणि विविध बाबींच्या आधारे तपास केला. यात आरोपीने कश्या पद्धतीने हा प्रकार केला हे उघड झाले. यात विविध कंपन्यांचे आयपी एड्रेस वापरला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

रिक्षा चालकास मारहाण करून लुटणार्या पती पत्नीसह चौघे गजाआड; पोलिसांनी सहा तासात ठोकल्या बेडय़ा

कल्याण :- प्रवासी बनून पती पत्नी अंबरनाथ येथून रिक्षात बसले. त्यांनी रिक्षाचालकाला बोलण्यात गुंतवून कल्याण मध्ये आणले. याच दरम्यान त्यांचे आणखी तीन साथीदार रिक्षात बसले. केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग कार्यलयाजवळ असलेल्या सामसूम जागेत त्यांनी रिक्षा थांबवायला सांगतली. यानंतर पाचही जणांनी रिक्षा चालकास बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सहा तासाच्या आतच सीसीटीव्हीच्या सहय्याने चार आरोपींना अटक केली आहे. तर अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

अंबरनाथ पश्चिमेत राहणारा जावेद शेख हा रिक्षा चालवितो. २९ तारखेच्या रात्री एक पती पत्नी त्याच्याकडे आले होते. आम्हाला एका ठिकाणी जायचे आहे. तिथे घेऊन चल तुझे काय भाडे होईल ते देऊ असे सांगत ते रिक्षात बसले. ही रिक्षा उल्हासनगरात पोहचताच या दोघांचे अन्य तीन साथीदार आले आणि ते ही रिक्षात बसले. रिक्षा थेट कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात असलेल्या केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग प्रभाग परिसरात पोहचली. याठिकाणी या पाचही जणांनी रिक्षा चालकास एका ठिकाणी थांबवून नशापान केले. त्यानंतर जावेद शेख याला बेदम मारहाण करीत त्याला खाली पाडले. आणि त्याची रिक्षा घेऊन हे पाचही जण पसार झाले. या प्रकरणी रिक्षा चालक जावेद शेख याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख, पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. एका ठिकाणी रस्त्यात रिक्षातबसून रिक्षा जात असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. अवघ्या सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चार जणांना पा्ेलिसांना ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे.

करण दखनी विरोधात एकट्या उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल असून अंबरनाथ मध्ये देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांपैकी तिघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली जाणार आहे. त्याच बरोबर एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

-रोशन उबाळे

कल्याण मध्ये भरली माणुसकीची शाळा

कल्याण :  कल्याण मध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी हि माणुसकीची शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे राजू काऊतकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माणुसकीची शाळा ही संकल्पना शाहिरी जलसाचे निर्माते लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांच्या हस्तेच या माणूसकीच्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक माणुसकिचे दुत यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर संभाजी भगत यांनी माणुसकीची शाळा या संकल्पनेवर बोलत असतांना सांगितले कि, प्रत्येक समाजामध्ये माणसातील माणूसपण कमी होत चालले आहे. समाजात वावरताना समाजामध्ये फूट पडलेली जाणवत आहे. जात धर्म पंथ याचे याचे जोडे बाहेर काढून माणसांनी माणसातील माणुसकी जतन केली पाहिजे. या देशात एक मिनिटांत सोळा लोक आत्महत्या करीत आहेत. असे एका तज्ञानी हे मत व्यक केले आहे. कारण माणसावर येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ताण तणाव निर्माण होऊन या घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे.

या देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे माणसांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली असून यामुळे माणसं  डिप्रेशनमध्ये जात आहेत. माणुसकीच्या शाळेमध्ये फक्त एका विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या  लोकांपर्यंत ही माणुसकीची शाळा पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये नवतरुण महिला आणि आबालवृद्ध यांची देखील शाळा सुरू केली असल्याचे भगत यांनी सांगितले.यावेळी शाहीर संभाजी भगत यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आनंद नागरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शेरकर, साक्षी डोळस, अनिता कदम, मीरा वासनिक, वर्षा काळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माणुसकी शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजू काऊतकर, माधुरी सपकाळे, आम्रपाली भालेराव, कविता काऊतकर  आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत रात्री अपरात्री लुटपाट करणारे पाच वाटमारे जेरबंद

डोंबिवली :- मध्यरात्री उशिराने रस्त्याने घरी चालत जाणाऱ्या एका इसमास चाकू आणि कोयत्याचाधाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. मात्र पोलिसांत तक्रार दिल्या नंतर या वाटमारू लुटारूंना डोंबिवली राम नगर पोलिसांनी आता अटक केली आहे.

संतोष कुमार शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना अचानक काही लुटारूंनी त्यांची वाट अडवली. यानंतर या वाटमाऱ्यानी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा वस्तू काढून घेतल्या. जीवाला घाबरलेल्या संतोष कुमार यांनी सर्व वस्तू त्यांना देऊन टाकल्या. मात्र या नंतर संतोष यांनी या संदर्भात राम नगर पोलीस स्थानकात झाल्या प्रकारची तक्रार दाखल केली.

डोंबिवली राम नगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ही लूटपाट करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधणे कठीण गेले. मात्र संपूर्ण कसोशीने तपास करून पोलिसांनी त्या पाच जणांचा सुगावा लावला. यात २० ते २५ च्या वयोगटात असलेले आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी परीसरात राहणारे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.

-रोशन उबाळे