डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपीं विरोधात आरोप पत्र दाखल; ३३ पैकी चौघांना जामीन मंजूर

डोंबिवली :- मानपाड़ा पोलिस स्टेशन मध्ये २२ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. यात तब्बल ३३आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी १५ वर्षीय मुलीवर ९ महिने लैगिक अत्याचार केला होता .यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकत्ये यांचा समावेश असल्याने पोलीस प्रशासनावर ही मोठा दबाव होता. प्रकरण संवेदनशील असल्याने मानपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय मध्ये ८८५ पानांचे चार्जसीट (दोषारोपपत्रक) दाखल केले असून १२२ साक्षीदार जाब जबाब नोंदविण्यात आले आहे.

या घटनेत तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून एकूण ३३ जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेचा तपास महिला सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला. या घटनेचा तात्काळ निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर मोठा दबाव होता.  साधारणत: पोलीस कोणतीही घटना घडल्यानंतर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करतात. मात्र या प्रकरणात दीड महिन्यात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा शेखर बागडे यांनी दिली.

 एकूण ३३ आरोपींपैकी ४ आरोपी अल्पवयीन असून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित २९ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. पीडितेवर डोंबिवली, नवी मुंबई, रबाळे, मुरबाड या ठिकाणी बलात्कार आणि नशेचे पदार्थ ही देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

-रोशन उबाळे

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्यांनी त्यांची माहिती पालिकेला द्यावी; क.डों.म.पा. ने केले आवाहन

कल्याण :  गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य  विभागाला कळविण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ओमायक्रॉन विषाणूचा परदेशात झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात जोखमीच्या देशातून म्हणजेच युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोटस्‍वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड,‍ झिम्‍बॉबे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्रायल या व शासनाने वेळोवेळी  निर्धारित केलेल्या इतर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व नागरिकांनी भारतात परतल्यानंतर आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा लोकांना ७ दिवस घरी विलगीकरणात राहायचे आहे. व ८ दिवसांनी पुन्हा तपासणी करायची आहे आणि त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील ७ दिवस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायचे आहे.

परंतू जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येईल व त्यातुन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील उपचाराची रुपरेषा निश्चीत केली जाईल. यामधून ५ वर्षाखालील मुलांना वगळण्यात येत आहे, परंतू जर त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर मात्र त्यांची आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील.

परदेशातील काही देशात ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीया या देशातून काही दिवसापूर्वी भारतात आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची आरटी पीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आढळून आली, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

 या नविन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसात परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेस कळवावी त्याचप्रमाणे स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट महानगरपालिकेच्या चाचणी केंद्रातून करुन घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटयांनी देखील आपल्या गृहसंकुलात गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास किंवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण उल्हासनगरच्या काही भागांत भटक्या कुत्र्यांची नागरिकांत दहशत

कल्याण :- पूर्वेतील आडीवली तसेच उल्हासनगर मधील काही भागांमध्ये कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. लहान मुलांचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्व आडीवली ढोकळी तलावाजवळील कचराकुंडीच्या शेजारी असलेल्या कृष्ण नगरीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून लहान मुलांना कुत्र्या कडून चावे घेण्याचे प्रकार घडत असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांना कुत्र्याकडून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ होत असून पालिका प्रशासनाने या परिसरातील भटक्या कुत्र्यांवर आळा घालून त्यांचं निर्बीजीकरण करणं गरजेच मानलं जातं आहे.

उल्हासनगरमध्ये रात्रंदिवस झुंडीने भटक्या कुत्र्यांचा वावर असून रात्री बाहेर फिरणं देखील नागरिकांना कठीण झालेय आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार नक्की शहरात कार्यरत आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय. एखाद्या बालकाचा जीव जाण्यापूर्वीच प्रशासन जागे झालं तर अनुचित प्रकार टाळता येईल एवढ मात्र नक्कीच.

-संतोष दिवाडकर

शेअर रिक्षांचे अंतिम दरपत्रक सादर करण्याची रिक्षा संघटनेची RTO कडे मागणी

कल्याण : शेअर रिक्षा सर्वेक्षण, निश्चित भाडेदर, आक्षेप हरकत,  त्रुटी दुरूस्ती, काही रूट वर पुर्नसर्वेक्षण तसेच सन २०१५ पूर्वी प्रमाणे निश्चित भाडेदर, महत्वाचे प्रवासी टप्पे या प्रमाणे अंतिम दरपत्रक सादर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे निवेदनाद्वारे केली आहे.

       शेअर ऐ रिक्षा भाडे दर निश्चिती पहीला टप्पा सर्वेक्षणात ९ रूपये ३१ पैसे होत असतांना ९ रूपये प्रतिप्रवासी निश्चित केलेली आहे. प्रवाशांना शेअर रूटवर सहजरित्या रिक्षा उपलब्धता व सुट्टे पैसे चणचण व देवाण घेवाण या वरून वादविाद टाळणे याकरीता पहिला टप्पा प्रतिप्रवासी १० रूपये अशी निश्चित करावी असे व्यवहारीकदृष्टया रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. शेअर ऐ रिक्षा भाडेदर अंतिम भाडेदर सुची जाहीर करतांना प्रत्येक रूटवर जास्त प्रवाशांचे संख्या असलेले टप्पे यादीत घ्यावे. सन २०१५ पुर्वीची शेअर रिक्षा दरपत्रक सुची वाचन व आकलन करावे.

गेली ६ वर्ष रिक्षा चालकांना भाडेवाढ मिळाली नव्हती. नवीन भाडेवाढ जाहीर होवून एक वर्षानंतर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. रिक्षा दुरूस्ती खर्च टायर टयुब पंक्चर व सि. एन. जी. दरात प्रचंड दरवाढ झालेली आहे. कल्याण आर.टी.ओ. कार्यक्षेत्रात रिक्षा व्यवसाय संपुर्ण रेल्वे प्रवाशांवर व सकाळी स्टेशनकडे व सायंकाळी स्टेशनकडुन इच्छित स्थळी असा वनसाईड आहे. त्यामुळे पत्राची योग्य दखल घेवुन अंतिम रिक्षा भाडेदर पत्रक जाहिर करण्यापुर्वी रिक्षा चालक प्रतिनिधी रिक्षा संघटना यांच्याशी चर्चा विनीमय करून जुने सन २०१५ पुर्वीचे दरपत्रक आकलन करून अंतिम दरवाढ जाहीर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग १५ डिसेंबर पर्यंत बंद

कल्याण :- राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात केडीएमसीच्या शालेय समितीची बैठक केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. नवीन येणाऱ्या व्हेरीयंटचा अंदाज घेऊन नियोजन करता येईल असे प्रशासनाचे धोरण असू शकते.

या बैठकीत सध्याच्या परिस्थितीतील कोविड -१९ प्रादुर्भाव व जागतिक पातळीवर आलेला कोविड -१९ चा नवीन व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार यावर चर्चा करण्यात आली. कोविड -१९ चा व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु न करता १५ डिसेंबर २०२१ पर्येंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान १५ डिसेंबर नंतर कोविड-१९ ओमीक्रोनच्या प्रसाराबाबतची त्या वेळची स्थिती लक्ष्यात घेउन समितीचे पुन्हा बैठक घेऊन पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करायचे कि नाही हे ठरविण्यात येईल असा निर्णय सुद्धा झालेल्या या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे तूर्तास कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा ह्या १५ डिसेंबर पर्येंत बंद राहतील हे स्पष्ट झाले आहे.

-रोशन उबाळे

डोंबिवलीत भरपावसात महिलांची सायकल रॅली; महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला अभिमान

डोंबिवली :  हिरकणी प्रतिष्ठानचा सायकल रॅलीचा उपक्रम अतिशय अभिमानास्पद आहे. असे उदगार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठान व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने डोंबिवली पूर्व येथील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकापासून महिलांच्या “सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले आणि या सायकल रॅलीस शुभेच्छा दिल्या. या सायकल रॅलीत भर पावसातही सुमारे ७५ महिलांनी आपापल्या सायकलींसह अत्यंत उत्साहात आपला सहभाग दर्शविला होता. या रॅलीमध्ये महिलांसमवेत लहान मुलींची देखील उपस्थिती लक्षणिय होती.

रॅलीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅ. विनयकुमार सच्‍चान स्मारकास पुष्पांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त तसेच बँक‍ ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर देवदत्त रोकडे, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय जाधव व इतर मान्यवरांचा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ व सचिव पूजा तोतला यांच्याहस्ते फुलांचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीमधील महिलांना शुभेच्छा दिल्यामुळे आमचा उत्साह व हुरुप द्विगुणित झाला असे भावोद्गार हिरकणी प्रतिष्ठानच्या  सचिव पूजा तोतला यांनी यावेळी व्यक्त केले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रिपरिप

कल्याण :- कल्याण डोंबिवली व आसपासच्या शहरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. जवळपास ८ तासांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नॉन स्टॉप पडत आहे. यामुळे नक्की डिसेंबर आहे की जून असा संभ्रम निर्माण झाला आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम मानला जातो. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिना हिट देतो आणि नोव्हेंबर पासूनच थंडीला सुरुवात होते. मात्र वाढलेल्या जागतिक तापमानानुसार डिसेंबर मध्येही फारशी थंडी जाणवत नाही. ज्याठिकाणी झाडी झुडूप असतील तितक्याच भागात थंडी जाणवते. कल्याण डोंबिवली सारख्या गर्दीच्या शहरी भागात थंडी फक्त सकाळच्या सुमारासच जाणवते. परंतु याच थंडीच्या दिवसांत पावसाळ्यात पडतो अगदी तसा पाऊस दिवसभर पडताना दिसत आहे.

कल्याण डोंबिवली शहरात सकाळपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. स्वेटर काढून रेनकोट घालण्याची पाळीच अक्षरशः आलेली आहे. त्यात पालिका क्षेत्रात काही शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना देखील जून महिन्याचा आभास झाला. यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड मिम्स आणि विनोद पसरत आहेत. हिवाळ्या नंतर डायरेक्ट पावसाळा सुरू झाला आहे मग उन्हाळा गेला कुठं ? अश्या पद्धतीचे विनोद सध्या वाचायला मिळत आहेत. तर काहींनी पुन्हा एकदा पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला. तर काहींनी घरच्या घरी गरमागरम भजी बनवण्याला पसंदी दिली. त्यामुळे वेळी असो की अवकाळी पाऊस पाऊस आहे.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत निष्कासित केलेली अनधिकृत इमारत पुन्हा राहिली उभी; पडद्याआड चाललेलं बांधकाम ‘ग’ प्रभागाला दिसेना ?

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणीपुरवठा न देण्याचे ठरवले आहे. मात्र छुप्या पद्धतीने पालिका आयुक्तांना चकवा देऊन अधिकारीवर्ग त्यांच्या आदेशांना बगल देण्याचे काम करीत आहे की काय असा प्रश्न आता पडू लागला आहे.

डोबिवली पूर्वेतील दत्ता नगर भागात पालिकेने इमारती वर एप्रिल महिन्यात तोडक कारवाई केली होती. अनधिकृत बांधकाम केले म्हणून तोडण्याचा खर्च बांधकाम व्यावसायिकाकडून घेतला. यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रभाग अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक प्रफुल गोरे यांना नोटीसही बजावली होती. असे असताना आता सद्य स्थितीत त्या शासकीय भूखंडावर नव्याने तळमजला +३ बांधून पडद्याआड उभे आहेत. कायदेनियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे? अशी चर्चा परिसरात केली जात आहे. संबंधित बांधकाम मोक्याच्या ठिकाणी आणि नेहमीच रहदारीचे असून ‘ग’ प्रभाग कार्यालयाला का दिसून आले नाही? लोकप्रतिनिधीना कसलीही माहिती कशी नाही? हा आश्चर्यकारक विषय आहे. यात प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्त प्रसारित करू नये म्हणून २० ते २५ हजाराची बिदागी देऊन त्यांचे तोंड बंद केले असल्याच्या देखील चर्चा जोरात सुरू आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित बांधकाम दिसत नसावे असेही म्हटले जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कायदे नियम पायदळी तुडविले जाऊन बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. याच बांधकामावर काही महिन्यापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती. या बांधकामाला कुठलीही पालिकेची परवानगी नव्हती तीच इमारतीचे मोठ्या जोमाने मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे बांधकाम सुरू आहे. सद्यस्थितीत ग्राउंड प्लस थ्री बांधकाम पूर्णही झाले आहे. शासकीय भूखंडावर उभी राहणारी इमारत तोडली असताना कुठलेही नियम कायदे न पाहता केवळ रेड कार्डच्या आधारे इमारत उभी राहत असल्याचे मानले जात आहे.

यात चक्क डोंबिवलीतील कर्मचारीच बांधकाम व्यावसायिक कडून पैसे घेऊन बिदागी सारखे वाटप करत आहे असे बोलले जात आहे. आणि यात काही माध्यम प्रतिनिधी तसेच प्रसिद्धी प्रमुखांनी दहा ते वीस हजार घेऊन बातम्या दाबण्याचे ठरवले आहे असे देखील म्हटले जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी आणि चौथ्या स्तंभा साठी लाजिरवाणी आहे. चांगले काम करणाऱ्या प्रतिनिधी आणि वार्ताहरा साठी येणारा काळ घातक ठरणार आहे याची थोडी सुद्धा खंत काही वेठबिगरीना नसून ही शरमेची बाब आहे. हा प्रकार खरंच घृणास्पद आणि चीड आणणारा आहे.

हा प्रकार ‘ग’ प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांच्या लक्षात आणून दिला गेला. दरम्यान त्यांनी याप्रकरणी ४७८ अनवये नोटीस बजावली असून चार-पाच दिवसात पोलीस आरक्षण मिळाल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने तोडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. याबाबत पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

-रोशन उबाळे

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला इसम पॉजिटीव्ह; ओमीक्रॉन बाबत दक्षता घेण्याचं पालिका आयुक्तांच आवाहन

डोंबिवली : दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक ३२ वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच या व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या इसमाच्या ८ जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे. तर या विषाणूचा धोका लक्षात घेता मास्क परिधान न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या  मार्फत करण्यात आले आहे.

हा विषाणू आत्यंतिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सदर विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर कुठेही फिरतांना नाक व तोंड झाकेल अशा पध्दतीने मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या नागरिकांवर त्याचप्रमाणे एखादया दुकानामध्ये, मॉलमध्ये विना मास्क येणा-या नागरिकांवर तसेच संबंधित दुकानदारांवर  कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मध्ये हरविलेले मोबाईल नागरिकांना केले परत; सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाची कामगिरी

कल्याण : कल्याण मध्ये म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध लावत ते नागरिकांना परत करण्याची कामगिरी कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या टीमने केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, यांच्या अंतर्गत असलेली म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१८, २०१९, २०२० या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉप्रटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेण्या बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील व त्यांच्या वाहन चोरी विरोधी व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच. जी.ओऊळकर, पोहवा  पवार, पोना गायकवाड, वाघ, पोशि  चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे एकुण ४४ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षात नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून परत करण्यात आले असून, स्टेशन परिसर, गर्दीच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल अथवा इतर वस्तू चोरी होतात अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली असून चोरीच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील यांनी दिली.

       दरम्यान नागरिकांना आपले हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ओतूर येथील उषा तांबे यांचा २०१९ साली कल्याण पश्चिमेतील रामबाग येथून मोबाईल गहाळ झाला होता. त्यांना देखील आपला मोबाईल मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

-कुणाल म्हात्रे