दुसऱ्या राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम थांबवावे; कल्याण मधील पदयात्रेतून नाना पटोलेंचं भाजपला आवाहन

कल्याण :  खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, वाढलेली महागाई, बेरोजगारीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने रविवारी कल्याणात जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जाते. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगत भाजप सरकारवर सडकून टीका केली.

कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जनजागरण यात्रेला सुरुवात होऊन सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली. काँग्रेसची भूमिका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही, असं पटोले म्हणाले.

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सैतान संबोधलं. त्यावरून पटोले यांनी सदाभाऊंना टोला लगावाल. ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबतजी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांचा  हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्यावेळी सुशांतसिंहचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा भडका; डोंबिवलीत एक कामगार होरपळला

डोंबिवली :- शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा अचानक भडका होऊन त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ अडसुळ वय ५१ वर्षे असे यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक पणे शव जाळणे ही आता जिकरीचे बनले आहे असे या घटने वरून वाटू लागले आहे.

शनिवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास डोंबिवलीच्या पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शव (मृतदेह) आणण्यात आले होते. त्याच्यावर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गॅसशवदहिनीचे बटन आणि लायटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तेथील कर्मचारी कापडाचा पेटता बोळा आतमध्ये टाकून शवदाहीनी चालू करत होते. जे की केवळ त्यांच्याच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींसाठीही अत्यंत धोकादायक बाब होती. मात्र हा धोका पत्करून गोपाळ अडसूळ यांनी स्मशानभूमीत दाखल शवावर अंत्यसंस्कारासाठी कापडाचा पेटता बोळा आत टाकला आणि त्याक्षणी गॅसचा मोठा भडका उडून त्यामध्ये अडसूळ गंभीररित्या भाजले.


दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर स्मशानभूमीतील इतर कर्मचारी आणि काही नागरिकांनी अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण तिथल्या उपस्थित स्टाफकडून देण्यात आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र ह्या कर्मचाऱ्याची खरी होरपळ ही रुग्णालयात झाली. या रुग्णालयात अडसूळ यांना उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. दुसऱ्या रुग्णाला देण्यासाठी साधे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे या घटनेतुन समोर आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे १० दिवसांपासून या गॅस शवदाहिनीत तांत्रिक बिघाड असूनही तो दुरुस्त का केला गेला नाही? याबाबत केडीएमसीच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती का? माहिती देण्यात आली असेल तर मग हा तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला गेला नाही? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या गंभीर विषयात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा अशा प्रकरणात स्मशानभूमीत अनेक नागरिकांचा राबता असतो. काही मोठी भीषण दुर्घटना झाली असती तर मनुष्यहानी ही झाली असती यात कुठलेही दुमत नाही.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये नाना पटोले यांची जनजागरण पदयात्रा; यात्रेत काँग्रेस सेवादलाची पक्षाच्या जिल्हाध्यक्षांविरोधात घोषणाबाजी

कल्याण : शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जनजागरण पदयात्रा सुरू असताना या पदयात्रेत काँग्रेस सेवादलाने बहिष्कार टाकून पदयात्रेतुन घोषणाबाजी देत बाहेर पडले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा आज कल्याणमध्ये आली होती. मात्र, या यात्रेत मानापमान नाट्य रंगलं. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये जनजागरण पदयात्रा आली होती. मात्र, सेवा दलाने या पदयात्रेवर बहिष्कार टाकला आहे. रॅलीत प्रोटोकॉल पाळला जात नाही. केवळ दादागिरी सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नाना पटोले यांनी या घटनेची दखल घेतली आहे. हा प्रकार माझ्यासमोर तर झाला नाही. असा काही प्रकार झाला असेल तर तपास करून योग्य ती कारवाई करू असं पटोले यांनी सांगितलं.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पश्चिम उंबर्डे गावात रिक्षा चालकाची हत्या; अनुचित प्रकारातुन हत्या झाल्याचा संशय

कल्याण :- शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्ती कडून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कारणाने निर्घृणपणे हत्या केली ? हे समजू शकलेले नाही. खडकपाडा पोलिसां समोर या खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही हत्या काही अनुचित प्रकारातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून तशी परिसरात चर्चा सुरु असल्याचे समोर येत आहे.

उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान दत्तू भंडारी वय ५३ वर्षे यांची सकाळी उंबर्डे या ठिकाणी हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास आपल्या कामासाठी घराबाहेर रिक्षा घेऊन जात असावेत. त्यामुळे नक्की काय कारण असेल याचे तर्कविर्तक लढविले जात आहेत. काही अनुचित प्रकारातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात केली जात आहे.

सर्व प्रकारचा मागोवा आणि या प्रकरणाची अधिक माहिती सूत्रांकडून पोलिस घेत आहेत. लवकरच हत्येतील आरोपी आणि हत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. दरम्यान खडक पाडा पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३४ अन्वेय गुन्हा नोंदवला आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्वेत सलमान खान कार अपघाताची झाली असती पुनरावृत्ती; थोडक्यात बचावल्या फूटपाथवर झोपलेल्या महिला

कल्याण :- पूर्वेतील पुणे लिंक रोड तिसगाव नाक्या जवळ शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास विचित्र अपघात झाला. एका वाहन चालकाने आपली लक्झरिअस कार डिव्हायडरला ठोकली. यामुळे ती गाडी तेथील जवळच्याच एका झाडाला अडकून थांबली. याच रस्त्याच्या फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांचा बळी जाण्यापासून वाचला. सुदैवाने कार ड्रायव्हर आणि त्याचा मुलगा त्याचसोबत फुटपाथवरील दोन महिला बचावल्या.

अपघातग्रस्त कार जर फूटपाथ वर गेली असती तर फुटपाथवर झोपलेले नक्कीच चिरडले गेले असते. मात्र सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने या विचित्र अपघातात होणारी मोठी दुर्घटना टळली. लक्झरिअस कार जणू काही पार्किंगच्या स्लॉटमध्ये उभी आहे असं भासत आहे. मात्र वास्तवात काय घडलं हे तेथील प्रथम दर्शनीनी सांगितले.

या सर्व घटनेने सलमान खानच्या कार अपघाताची पुनरावृत्ती कल्याणमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झाली असती असं म्हणायला हरकत नाही. एअर बॅग मुळे गाडीतील प्रवासी बचावले तर गाडी फुटपाथवर जाण्या पूर्वी थांबल्याने गरीब महिलांचे देखील प्राण वाचले. याबद्दल त्या महिलांनी देवाचे आभार मानले.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वाचविण्यासाठी ८५ वर्षीय महिलेने सुरू केलं आमरण उपोषण

कल्याण :- पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या कडून स्मारक तोडण्याच्या कारवाई विरोधात एका ८५ वर्षाची आजी लक्ष्मीबाई मारुती ससाणे यांनी उद्यान वाचण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. १९ नोव्हेंबर २०२१ पासून उद्यानातच आमरण उपोषणासाठी त्या बसल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने विकासाच्या नावाने व्यापाऱ्यांचा फायदा आणि बहुजन अस्मिता असणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा काही भाग घेण्याचा घाट घातला असल्याचे आंबेडकर अनुयायी म्हणत आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी साठी प्रस्तावित जागा असतांना काही हॉटेल मालकांना इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे आंबेडकर वादी आणि आंबेकरांना मानणारा वर्ग आणि समाज पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात उभा ठाकला आहे.

उद्यानाची जागा आजपर्यंत दोन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत पुन्हा उद्यानाची जागा घेऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी या ८५ वर्षाच्या आजीच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहून समर्थन देण्यासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना पाठींबा देताना समोर येत आहेत.

आयुक्त बंगल्याची भिंत बाधित होत असल्याने डीपी रस्ता थोडा नागमोडी करण्यात आला. काही वेगळा पर्याय करवून विकास पण झाला पाहिजे आणि उद्यान ही बाधित झाले नाही पाहिजे अशी काही पर्यायी व्यवस्था पालिकेने करण्याची वेळ आली आहे. अन्यथा उद्यानाचे प्रकरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत बीएम सी ऍक्ट कलम ४८७ नुसार हजारो हरकती घेण्यात आल्या आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण मध्ये मुंगूसाची हत्या; चार जणांना वनखात्याची कोठडी

कल्याण :-   कल्याण फोर्टीस् हाँस्पीटल परिसरात बुधवारी  सकाळी मुंगुसाची हत्या केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी पुढे या सर्व आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. या आरोपीना वन खात्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.

सांधेदुखीवर औषध म्हणून मुंगुसाच्या चरबीच्या तेलाला मोठी मागणी असून मुंगसाच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. यामुळे मुंगूसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुगंसाची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. 

संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड परिसरात राहणारे आहेत.

-रोशन उबाळे

डोंबिवलीत हैदोस घालणाऱ्या ‘माकडोबा’ला झाली अटक !!!

डोंबिवली : गेले अनेक दिवस डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात एका माकडाने उच्छाद घातला होता. सुरुवातीला येथील लोक मुलांना माकड दाखविण्याच्या हौसे खातर त्या माकडाला अन्न आणि फळे देत होती. यामुळे ते माकड सोकावलं आणि तेथून जाण्यास तयार नव्हतं. काही लोकांच्या घरातुन फळे न मिळाल्याने माकड जबरदस्ती घरात घुसून नासधूस करू लागलं. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 यावर संपर्क केला. यानंतर वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई आणि योगेश रिंगने यांनी तेथे प्रथम पाहणी केली. तसेच वॉर संस्था प्राणीमित्र विशाल कंथारिया यांच्या मदतीने माकडाला खायला देऊ नये ते निघून जाईल त्याला त्रास देऊ नये. अशा पद्धतीने नागरिकांमध्ये मध्ये जनजागृती केली.

एके दिवशी या माकडाने स्थानिक रहिवासी फरीदा बरूचा यांच्या फ्लॅट मध्ये शिरून नासधूस केली. याबाबत अधिक माहिती विशाल यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वनविभागाकडे याबाबत माहिती दिली व त्यांच्या परवानगीने वॉर संस्थेच्या टीमने ते माकड सुरक्षितरित्या पकडुन वनविभागाकडे सुपूर्द केले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी बिनु एलेक्स आणि सतीश बोर यांची खूप मदत मिळाली.

माकड बचाव मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे, विशाल कंथारिया, स्वप्नील कांबळे, महेश मोरे, कुलदीप चिकणकर यांनी खूप मेहनत घेतली. तसेच प्रेम आहेर, पार्थ पाठारे, सुहास पवार, वनविभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव, वनपाल दिलीप भोईर, वनरक्षक योगेश रिंगने व रोहित भोई यांचे मार्गदर्शन लाभले. जखमी माकडाला वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘अ’ प्रभाग सहाय्यक आयुक्तांना माजी नगरसेवकाकडून मारहाण; खडक पाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल

आंबिवली :- मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर झालेल्या तोडक कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक उपायुक्ताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मोहने परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या माहितीनुसार निष्कासन कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती. याच मोहिमे दरम्यान एक कारवाई करून अधिकारी ‘अ’ प्रभाग कार्यालयात आले. त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोट आपल्या सोबत १५ ते २० जणांचा सोबत ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील सावंत यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कार्यालयात शिरले.

यावेळी मुकुंद कोट यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या माजी नगरसेवकाने सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त अर्चना दिवे यांच्या समोर सहाय्यक उपायुक्तांना मुकुंद कोट या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याने कल्याण डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मुकुंद कोट यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा कोट देखील उपस्थित होता.

एकिकडे बेकायदेशीर बांधकामे कुठलेही परवानगी न घेता करायची आणि तोडकाम केल्यावर दादागिरी करून मारहाण करायची. असे म्हणत अधिकारी वर्गात संताप पसरला आहे. गुरुवारी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध पालिका अधिकारी वर्गाकडून करण्यात येणार आहे.

याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकुंद कोट आणि पंधरा ते वीस जणांवर
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे अशापद्धतीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

मारहाण होतानाचा व्हिडीओ

-रोशन उबाळे

टिटवाळ्यातील नारायण सिंग बनला राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन

कल्याण : महाड- रायगड येथे ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान सबज्युनिअर मुले व मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत टिटवाळा येथील नारायण सिंग याने उत्कृष्ठ कामगिरी करत सुवर्ण पदक  मिळवले.

 नारायण ने पहिला सामना पुण्याच्या आदी सोमु विरूद्ध पहिल्या राऊंड मध्येच, तर उपांत्यपूर्व फेरी व सेमीफायनल सामन्यात प्रतिस्पर्धीना जोरदार ठोसे मारले त्यामुळे रेफ्रीने पहिल्या राऊंड मधेच नारायणला विजयी घोषित केले, तर अंतिम सामना मुंबईच्या अवधूत कोलते विरुध्द ५-० अशा प्रकारे जिंकुंन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

नारायण सिंग हा टिटवाळा येथे गणेशनगर विद्यालयात नववीत शिकत आहे. विनायक बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक संतोष मुंढे यांच्या मार्गदरशनाखाली मागील ४ वर्षापासून सराव करीत आहे. मागील राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने कांस्य पदक मिळवले होते.  नारायण सिंगच्या या यशात कोच संतोष मुंढे यांच्यासोबतच त्याचे क्रीडा शिक्षक असलेले वडील जितेंद्र सिंग व आई सुषमा सिंग तसेच विनायक बॉक्सिंग क्लबचे अध्यक्ष विनायक कोळी यांच्याही मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.

त्याच्या या यशाबद्दल टिटवाळा वासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून व पुढील वाटचालीसाठी नारायण सिंगला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

-कुणाल म्हात्रे