आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात करावी; कल्याणमध्ये भाजपने दिलं निवेदन

कल्याण : केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते, असेच सिद्ध होते.

भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी डॉ.आंबेडकर उद्यान बाधित ? कल्याणात आंबेडकरी जनतेत संतापाचे वातावरण

कल्याण :- कल्याणातील आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले ते सुभाष चौक मधील २४ मीटरचा ३० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट आहे. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवित आपला निषेध व्यक्त केला. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेने मोर्चे बांधणी करून आंबेडकरी समाज आणि जागृत नागरिकांनी महाराष्ट्र पालिका नियम कलम ४८७ अंतर्गत हरकत वाजण्याची मागणी होऊ लागली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुर्वी मुरबाड रस्ता रुंदीकरणासाठी दोन वेळा या उदयानाची जागा घेतलेली होती. तसेच रुक्मिणीबाई हॉस्पिटलसाठी उदयानाची काही जागा रस्त्यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळेस सदरचे ठिकाणे केडीएमसी विकसित करून देणार होती. परंतु आजपर्यंत सदरचे ठिकाण विकसित केले नाही. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानका बाहेरील परिसर विकसित करण्यात येणार असून त्या अंतर्गत कल्याण पश्चिम मधील महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यँत केडीएमसी २४ मीटरचा ३० मीटर करण्यात येणार असून यात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा घेतली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने हरकती सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी पसरली आहे.

कल्याण पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालया लगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असून या उद्यानातील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी समाजाचे अनुयायी एकत्र येत असतात. तसेच आंबेडकरी चळवळीचे मुख्य ठिकाण असल्याने या उद्यानाशी समाजाची नाळ जुळालेली आहे.

सन १९९६ च्या शहर विकास आराखडया प्रमाणे २४ मीटर रस्ता हा शहरी भागासाठी परिपुर्ण असतानाही केडीएमसी या उदयानाची जागा रस्त्यासाठी घेत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरणात उद्यान बाधित होणार असल्याने कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सोशल मीडियावर जनतेला जागृत करून हरकती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिम मधील आंबेडकर उद्यान मध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवीत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी दलित मित्र आण्णा रोकडे, आंबेडकरी चळवळीतील बाबा रामटेके, भारत सोनावणे, सुदाम गंगावणे, कुमार कांबळे, संजय जाधव, शेखर केदारे, विलास गायकवाड, राजू रणदिवे, रंजना जाधव
आदी प्रमुख कार्यकत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

तर काहीं आंबेडकरी संघटनांनी पालिका मुख्यालय मध्ये धाव घेत लेखी हरकत घेतली. कल्याण शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष महिला मायाताई कांबळे, कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड, रुपेश हुंबरे, ठाणे जिल्हा महासचिव रेखा कुरवारे, सदस्य मनिषा झेंडे, कल्याण पूर्व सचिव देवानंद कांबळे आदी पदाधिकाऱयांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली.

याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील मग पुढील धोरण ठरवले जाईल. तर सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सांगितले की आज हरकती नोंदवत असून उद्या आम्ही आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू. पालिकेने हा प्रश्न हाताळला नाही तर सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शिष्ठ मंडळाला सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगत अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण मधील तरुणांनी सर केला शहापूर तालुक्यातील ‘वजीर’ सुळका

कल्याण : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला “वजीर” सुळका कल्याण शहरातील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला आहे.

कल्याण मधील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने या “वजीर” सुळका पार करण्याच्या मोहिमेचे आयोजन केले होते. यात पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देविदास गायकवाड, महेश पाडवी हे सहभागी झाले. हे सर्व तरुण कल्याण शहरातील रहिवासी आहेत. या सर्व तरुणांनी सर्वात प्रथम सुळक्याच्या पायथ्याला शिवमूर्तीचे आणि सुळक्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात केली. आणि नंतर १ तासात दोरखंडाच्या सहाय्याने वर चढले. वजीर सुळका सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो, त्यात तब्बल १०० फुटांचा ओव्हरहँग झूमरिंग करून पार करावा लागतो. हा सुळखा शहापूर तालुक्यातील वशिंद स्थानकापासून जवळ आहे.

याबाबत भूषण पवार यांनी सांगितले की हा सुळका सर करायला गिर्यारोहणाचे अत्याधुनिक साहित्य वापरूनचं सर करणे शक्य होते. ज्यात रोप म्हणजेच दोरखंड आवश्यक आहे. सुळक्यावर ठराविक ठिकाणी हा दोरखंड लावायला बोलटिंग म्हणजे खिळे ठोकले आहेत. त्यात आपण ही रोप लावून सर करता येतो. दोरखंड आणि बोलटिंग ह्यांना क्यूडी ह्या साहित्याने आपण बांधून ठेवतो. एकदा का आपण टॉपला गेलो की इतर सदस्य हे बोलटिंग आणि रोपला झुमर हे साहित्य अडकवून शरीराची ताकत लावून वर सरकतात.एकदा का वर पोहचलो की राप्पेल्लिंग करून म्हणजे दोरीच्या मदतीने आपण सुळक्याच्या पायथ्याशी येतो असे भूषण पवार यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

एसटीचा संप आणि खाजगी ट्रॅव्हल्सची चंगळ; अनेक ठिकाणी अव्वा सव्वा भाडं

मुंबई :- एसटी कामगारांनी मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रभर संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कामगार शासनाकडे आग्रही आहेत. मात्र ऐन दिवाळीत त्यांच्या या संपाचा पुरेपूर फायदा खाजगी ट्रॅव्हल्सवाले करून घेताना दिसत आहेत.

एसटीत काम करणारे कामगार हे अत्यंत कवडीमोल पगारात केवळ सरकारी नोकरी म्हणून काही वर्षे राबत आहेत. वाहनचालक आणि वाहक यांना मिळणारा मासिक पगार अगदी नगण्य आहे. कुटुंबापासून लांब राहूनही कुटुंबाची जबाबदारी निभावू न शकल्याने कंटाळून अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या. कामगारांचे शासनात विलीनीकरण करा ही एक मोठी मागणी हे कामगार आता करीत आहेत. या काही मागण्यांसह एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

एसटी कामगारांच्या या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. पर्यायाने खाजगी वाहनांचा अवलंब करून प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र यात काही खाजगी ट्रॅव्हल्सने आपले भाडे वाढवले आहे. त्यामुळे एसटीचा संप मागे येई पर्यंत लुटता येईल तितका लुटण्याचा मानस यांचा आहे का ? असा सवाल सामान्य प्रवासी विचारत आहेत. यात प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. आता राज्यसरकार एसटी कामगारांचा विचार करणार की नेहमीप्रमाणे अश्वसनांचा भडीमार करणार हे आता पहावे लागणार आहे.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा. मुख्यालयात तिरंग्याच्या प्रतिकृतीचा कंदील; मनसेकडून गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीत मतदारांना जागृत करण्या साठी लावण्यात आलेल्या कंदीलच्या प्रतिकृती मध्ये राष्ट्रध्वजाचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दाखल केला आहे.

       १ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते  करण्यात आले होते. यात राष्ट्रध्वजाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या बाबत कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात राष्ट्र गौरव प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एफआयआर मध्ये आरोपीचे नाव अज्ञात म्हणून टाकण्यात आलेले आहे. पोलिसांनी सदर झेंड्याची प्रतिकृती ही जप्त केली आहे.

 राष्ट्रध्वज संहिते अनुसार आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ हा देशाच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा अवमान होऊन नये याकरिता ‘राष्ट्रध्वज संहिता’ बनविण्यात आली आहे. विविध नियम करण्यात आले आहेत, तर त्याच्या चुकीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा कायद्याचा गुन्हेगार तर आहेच किंबहुना देशद्रोही आहे. भारताच्या महानतेचे प्रतीक असणाऱ्या या तिंरग्याची आचारसंहिता १९६४ साली सी. व्ही. वारद यांनी लिहिली. ध्वजारोहण, अभिवादन, ध्वजावतरण आणि ध्वजाचा सन्मान कसा करावा, याबाबत एक नियमावली बनविण्यात आली. त्यालाच ‘राष्ट्रध्वज संहिता’ असे म्हणतात. या अनुसार हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

 याबाबत मनपा सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण करीत मतदारांना जागृत करण्यासाठी ही थीम साकरली होती. याबाबत मनपाला कोणाची तक्रार प्राप्त नव्हती असे सांगितले गेले.

-कुणाल म्हात्रे

लालचौकी येथील सिग्नलचा खांबाआड लपंडाव; मनसेने चिटकवले खांबाला स्टिकर

कल्याण : लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात  आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने  दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या द्वारली पाड्यातील घरात शिरलं अजगर

कल्याण : जंगल शेती भागातून भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. मात्र, सर्पमित्राच्या मदतीने त्या भल्यामोठ्या अजगराला शिताफीने पकडले. ही घटना कल्याण – मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.

बाबासाहेब गोरे यांची कल्याण – मलंग रोडवरील द्वारली पाडा या ठिकाणी वीटभट्टी आहे. त्या लगतच त्यांचे घर आहे. त्यातच दुपारच्या सुमारास या घरामध्ये मोठा अजगर घुसल्याचे त्यांनी पहिले. त्यामुळे त्यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोबे यांना अजगरविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्यासह मुंबई हायकोर्टमधील कुलदीप चिकनकर मानद पशु कल्याण अधिकारी, यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गोरे यांच्या घरामध्ये आठ फूट लांबीचा अजगर घराच्या एका कोपऱयात आडोशाला दडून बसल्याचे त्यांना दिसला होता.

विशेष म्हणजे, हा भलामोठा अजगर भक्ष्य शोधण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोरे यांच्या घराच्या आसपास त्यांना दिसत होता. मात्र, घराच्या बाजूलाच असलेल्या वनसदृश क्षेत्रांमध्ये निघून जात होता. पोलीस कर्मचारी, सर्पमित्र जाधव व चिकनकर यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून, या भल्यामोठ्या अजगराला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थित निर्सगाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले.

-कुणाल म्हात्रे

विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचार्यांची संपात उडी

विठ्ठलवाडी :- महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी एसटी कामगारांकडून सध्या संप पुकारला गेला आहे. या संपात आता विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचारी देखील उतरले आहेत. दरम्यान आज आगाराबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपाची घोषणा करीत निदर्शने केली.

एसटी म्हणजेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच एसटीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या हलाखीचे जीवन काढावे लागत आहे. अगदी कमी पैशात या कर्मचार्यांना राबवून घेत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी हाल अपेष्टा कर्मचारी सहन करीत आहेत. त्यात विलीनीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने शासना विरोधात कामगारांनी महाराष्ट्रभरात संप पुकारला आहे.

रविवार दि. ७ नोव्हेंबर पासून विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील या संपात उडी घेतली आहे. कर्मचाऱ्यांकडून एसटी आगाराबाहेर निदर्शने करण्यात आली. आमचा कोणत्याही युनियन, संघटना तसेच समितीवर विश्वास राहिलेला नसून आता आमचा लढा फक्त आमच्यासाठी असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी बोलून दाखवल्या. मागण्या पूर्ण करा अन्यथा संप सुरू ठेवू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

मांडा-टिटवाळ्यातील ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :  महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील ३१ जणांविरुद्ध ८ लाख ४ हजार ४८० रुपयांची ५९ हजार ८५५ युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत ८ ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.

दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा  निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित ३१ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५  नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मिळणार मुबलक पाणी; पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण : २७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वसन पालिका आयुक्तांनी भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच २७ गावातील सन २००२ पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर देखील कमी करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आज मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी बोलावत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी चंद्रकांत मोटे यांच्यासह मोहन काळन, रवींद्र भंडारी, प्रकाश पाटील आणि गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला होता. त्यानुसार आज मोर्चाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट घडवून आणली. यावेळी आयुक्तांनी २७ गावातील नागरिकांना अमृत योजनेच्या माध्य्मानातून डिसेंबर पर्यंत मुबलक पाणी मिळणार असून ज्यांची घरे सन २००२ पर्यंतची आहेत त्यांनी आपल्या मालमत्ता कारच्या पावतीसह अर्ज केल्यास त्यांचा मालमत्ता कर कमी केला जाईल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती चंद्रकांत मोटे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे