अरेच्चा! एवढे मोठे केंद्रीय राज्यमंत्री आणि एवढीशा खुर्चीसमोर नतमस्तक ? कपिल पाटलांनी असं का केलं बरं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाच दिवस भेटी दिल्या. याचदरम्यान शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी एका खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी असे का केले ? याबद्दल काही लोक अनभिज्ञ आहेत.

राजकारण असोत किंवा इतर कोणतेही क्षेत्र प्रत्येकाची सुरुवात ही तळा गाळातून आणि शून्यातूनच होत असते. आणि शून्यातुन सुरुवात करून केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणारे कपिल पाटील हे देखील त्यातीलच एक. कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश म्हणजे हीच खुर्ची जिला कपिल पाटील यांनी विनम्रपणे हात जोडले. ती खुर्ची होती सरपंच पदाची. म्हणूनच कपिल पाटील यांनी कुटुंबातील लोकांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. आणि याच गावचे ते सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील हा प्रवास ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांना गहिवरून आले. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.

-संतोष दिवाडकर

ईव्हीएम मशीन हॅकिंग प्रकरणाची चौकशी करा; शिवसेना नेत्यांनी केली मागणी

कल्याणमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दै.बातमीदारने प्रसिद्ध केलेल्या या व्हडिओ मुळे उडाली खळबळ

व्हायरल होत असलेल्या व्हडिओमध्ये आशिष चौधरी नामक इसम आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करताना दिसत आहे. आणि हीच व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या मुलाची जवळपास ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी याने १९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालय, पोलीस महा संचालक आणि संबंधी सरकारी यंत्रणांना तक्रार केली आहे. त्याच मे महिन्यातील हा व्हिडियो असून २०१९ च्या कल्याण पूर्व विधान सभेत काही ठिकाणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला आहे आणि याबदल्यात ५० लाख रुपये मिळाले होते असे त्याने म्हटले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडियोत दावा करणाऱ्या आशिष चौधरीने आपल्या मूलाची ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडियोची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करत असल्या बाबत पोलिसात तक्रार

आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर ब होणे गरजेचे आहे यासाठी शुक्रवारी पोलिस उपायुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितलं.

ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे. आतापर्यंत १३५ करोड लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात असलेल्या संशयाला आणि चर्चेला हॅकरने सिद्ध करून दाखवले आहे. लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास गोपाळ लांडगे ( कल्याण जिल्हा प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची प्रतिस्पर्धी धनंजय बोडारे यांची मागणी

-रोशन उबाळे

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; माजी आमदाराचा आंदोलनाचा पवित्रा

११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियामध्ये ओबीसी, एन टी, व्हीजेएनटी, आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती केली जात असून यामध्ये तातडीने बदल करावा अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहे. याबाबत नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आज निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

      मुंबई एमएमआर क्षेत्रासह राज्यातील अन्य भागात ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्याची विद्यार्थ्यांना सक्ती केली जात असून याचा फटका राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्ही जे एन टी तसेच एन टी विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० ऑगस्ट असल्याने एव्हड्या कमी कालावधीत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर अनेक विशेष प्रवर्ग, एन टी, व्ही जे एन टी, व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार आहे.

वास्तविक पाहता मागील वर्षी अशा प्रमाणपत्राची कोणतीही अट शालेय शिक्षण विभागाने टाकली नव्हती. यंदा देखील कोरोनाचा काळ पाहता नॉन क्रिमिलिअर ची सक्ती करण्यात येऊ नये. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात. याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन एन टी, व्ही जे एन टी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव या अन्यायाविरोधात शालेय शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

जन आशीर्वाद यात्रेमुळे भाजप पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल मग राष्ट्रवादीच्या नेत्यांवर का नाही? उठवला जातोय सवाल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात कोरोना काळात गर्दी जमावल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली च्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यातील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील काही पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत असा सवाल सध्या विचारला जात आहे.

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतचा कार्यक्रम मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन कोरोना काळात गर्दी जमवील्या प्रकरणी गुन्हे का दाखल नाहीत ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आगरी समाजातुन असलेल्या कपिल पाटील यांचा सत्कार सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आगरी समाजाच्या नेत्यांनी मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन गर्दी जमवून देखील या बाबत गुन्हे का नोंद झाले नाहीत? हा वादाचा विषय ठरला आहे. सर्वपक्षीय संघर्ष समिती व राष्ट्रवादीचे नेते असलेल्या गुलाब वझे व दत्ता वझे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची पोलिसांना माहिती नव्हती का? की डोळेझाक केली जात आहे? अशाप्रकारे दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांत पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एकाला एक न्याय आणि त्याच प्रकरणात दुसऱ्याला दुसरा न्याय हे खरंच खेदजनक आणि निषेधार्थ आहे. असा सूर उमटला जात आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसून शासनाने सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपने डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नियम पायदळी तुडवल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक असताना यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत लोकांना एकत्र जमा करणे, मास्क चा वापर न केल्याने ४३६/२०२१ भा.द.वी.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे आयोजकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास  जन आशीर्वाद कार्यक्रमा वेळी डोंबिवली नागरीक सहकारी बँक चौक, सोनारपाडा कल्याण शिळ रोड येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी  भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, शशिकांत कांबळे, संजय उर्फ बबलू तिवारी, दत्ता माळेकर व इतर पदाधिकारी  व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मग बाकीच्यांना वेगळा न्याय का ? अशा चर्चा सध्या नागरिकांमध्ये तसेच राजकिय वर्तुळात सुरू आहेत.

-रोशन उबाळे

घरफोडी करणारा टिटवाळ्यातील १९ वर्षीय सराईत आरोपी पोलिसांच्या हिरासतीत; कल्याण क्राईम ब्रांचने फेकलं जाळं

टिटवाळा येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवा आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने बुधवारी जाळं पसरून अटक केली. अत्यंत शिताफीने केलेल्या या शोधात हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागला असून त्याच्या कडून काही ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

तमन उर्फ नरेंद्र बाबू भंडारी हा १९ वर्षीय युवक सराईत आरोपी असून तो घरफोडी आणि चोऱ्या माऱ्या करीत होता. गुन्हे शाखा ३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपीची माहिती काढली. त्यानंतर गोपनीयपणे ओळख पटवून त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे ३८ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन सापडले. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी घरफोडी केली असल्याचे त्याने चौकशीत मान्य केले. यासाठी त्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

या कारवाईत वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३, कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक, मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगोरी नाही; राजकारणी असोत किंवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच -खा. श्रीकांत शिंदे

राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखेच आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. अप्रत्यक्ष नियमाचे चाललेले उल्लंघन समाज मनावर सावत्र वागणूक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच पुढे बोलतांना आपल्या मतदारसंघात मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय ३८० कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर कल्याण – शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. विकासकामे संथगतीने सुरू असतील तर त्यांना गती प्राप्त करून देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याची कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावली.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणूका जवळ आल्याने राजकीय वातावरण पावसाळा असून सुद्धा गरम होऊ लागले आहे.

-रोशन उबाळे

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाची लूट

कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरातल्या रेती बंदर रोडला भद्रनिसा चाळीत राहणारे अमीर बुडान शेख (५७) यांनी मंगळवारी लुटमारी संदर्भात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका भाड्यावर गेले असताना भुरळ घालून त्यांना प्रवाशांनी पेढा खायला दिला. आणि गुंगी येताच लुटारूनी आपला दावा साधला.

अमीर शेख हे शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एम एच ०५/डी झेड/ २६१८ क्रमांकाची त्यांची रिक्षा घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी डेपो समोर प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबले होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी रिक्षास हात दाखवून त्यांना वालधुनी येथिल रेल्वे हॉस्पीटल येथे जायाचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर शेख यांनी ७० रूपये भाडे होईल असे सांगितले. हे दोघेजण रिक्षात बसले. वालधुनी दिशेकडे जात असताना त्या इसमांनीअमीर यांना उल्हासनगर येथे जाण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी उल्हासनगरच्या सेंटल हॉस्पीटल येथे नेले. त्यातील एका प्रवाश्याने अमीर यांना पत्नीस भेटून येतो असे, असे सांगून रिक्षातून उतरून तो इसम निघून गेला. पुन्हा काहीवेळात पुन्हा रिक्षाजवळ आला असता त्याच्या हातात असलेला पेढ्यांचा बॉक्स पुढे करून मला मुलगा झाला आहे असे बोलून अमीर यांना पेढा खाण्यास दिला. आनंदाच्या भरात अमीर यांनी त्यातला पेढा खाल्ला.

त्यानंतर त्या अनोळखी इसमांनी मावशीला भेटण्याकरीता उल्हासनगरच्या खेमाणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी त्यांची रिक्षा खेमाणी येथे नेली. त्यातील एक इसम उतरून काहीवेळाने परत रिक्षात आला आणि अमीर यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सोडण्यास सांगितले. रिक्षा चालवत असताना अमीर शेख यांना थोडे अंधुक दिसू लागले. चालकाला गुंगी आल्याचे रिक्षातील लुटारू प्रवाश्यांना हेरले. त्यांनी अमीर यांना वालधुनी जकात नाक्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आणि घात केला.

लुटारूंनी आपल्याकडील मोबाईल, घड्याळ आणि काही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्यानंतर ठोसा-बुक्क्याने मारहाण करून रिक्षासह बिर्ला कॉलेजसमोर सोडून पळ काढल्याचे या वयोवृद्ध रिक्षावाल्याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कोरोना काळात लुटीच्या सर्रास घटना वाढू लागल्या आहेत .या प्रकरणी  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील फरार लुटारूंनी हुडकून काढण्याची जबाबदारी सपोनि देविदास ढोले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

सात वर्षे स्वतःच अस्तित्व बदलून राहणारा आरोपी सापडला महात्मा फुले पोलिसांच्या सापळ्यात

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात एका आरोपी विरोधात २०१४ साली विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा आरोपी मागील सात वर्षे पोलिसांना चकवा देऊन स्वतःचे अस्तित्व बदलून लपून छपून आपले जीवन जगत होता. आता आपल्याला कोणी ओळखणार नाही या भ्रमात असतानाच पोलिसांनी आज त्याला यशस्वीपणे आपल्या सापळ्यात पकडले आहे.

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात २१ नोव्हेंबर २०१४ साली माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख याच्या विरोधात फसवणूकीच्या प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी तसेच विविध कलमा नुसार गुन्हा नोंदवला गेला. मात्र अटक होण्याच्या भीतीने तो फरार झाला. न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याची लखनऊ येथील पाऊने दोन कोटींची प्रॉपर्टी लिलावास काढली. मात्र तरीही माजिद अली हा काही समोर आला नाही. आणि पोलीस पुढील सात वर्षे त्याचा शोध घेत राहिली. पण माजिद अली स्वतःच अस्तित्व बदलून राहत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.

पोलिसांना चकवा देऊन राहत असलेल्या मन्सूर अलीला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदाराची मदत घेतली. यानंतर त्याचा सध्याचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक शोध घेतला. यानुसार तो आता नवी मुंबईत कामोठे येथे राहत असल्याचा पत्ता त्यांना प्राप्त झाला. व अधिक शोध घेऊन त्याचा सध्याचा फोटो देखील पोलिसांनी मिळवला. आणि सापळा रचून सात वर्षे लपंडाव खेळणाऱ्या माजिद अलीचा गॅम ओव्हर केला आणि त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात हजर केले.

माजिद अली सध्या पोलिसांच्या कैदेत असून त्याच्यावर या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तरप्रदेश येथेही त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

जन आशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपच्या पदधिकाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीत गुन्हे दाखल

कोरोना नियम असताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. सर्वसामान्य जनतेला नियम आणि राजकीय नेते आणि पक्षांना वेगळा न्याय याबाबत जनतेत वेगळी भावना पसरली होती. याचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासनाने “जन आशिर्वाद  यात्रा” आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कोविड १९ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.  हे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक होते. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.  मंगळवारी त्यांच्या भेटीचे आयोजन डोंबिवली पूर्व मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक चौक, सोनार पाडा कल्याण शील रोड वर देखील करण्यात आले होते. या घटनेत पोलिसांच्या मनाई आदेश आणि कोविड -१९  प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले. प्रचंड गर्दी पाहाता आणि कोरोनाची गांभीर्य विसरलेल्या भाजपा पदाधिकारी  व नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात मानपाडा पोलिसांनी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली ग्रामीण मंडळ अधिकारी संजय तिवारी, दत्ता मळेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर खडकपाडा, महात्मा फुले व कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही विविध पदाधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

-रोशन उबाळे

तरुणांच्या लसीकरणला प्राधान्य देण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आयुक्तांकडे मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तरुणांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्षांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

कल्याण डोंबिवलीत तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. त्यातील ७०% ते ८०% घरातील एकमेव कमावते असल्याकारणाने त्यांचा रोज प्रवास किवा रोजगार निमित्त जास्त लोकांसोबत संपर्क येतो. त्यामूळे त्यानां कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्य सरकारने जाहिर केलेल्या नविन नियमावली नुसार फक्त २ डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची मुभा आहे.

 या सर्व बाबी लक्षात घेवुन तरुणांना प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावे असे निवेदन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा कार्याध्यक्ष यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुक डॉ. विजय सुर्यवंशी यांना दिले. याबाबत आयुक्तांनी लवकरच लसीकरणासाठी एक मोबाइल वॅन उपलबध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे