सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – मनसेचा रेल्वेला ईशारा

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची मागणी मनसेने केली असून कल्याण मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्र अधिकारयांना, कल्याण स्टेशन अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, रेल सुरक्षा बळ यांना  निवेदन दिले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करू न दिल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोना काळात सावधगिरी म्हणून सरकार तर्फे सर्वात आधी उपनगरीय लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आणि नंतर अतिआवश्यक सेवे करीता सुरु ही करण्यात आल्या. सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच उपनगरीय गाड्यात प्रवास करू शकतात. आता सर्व काही पूर्व पदावर येत असतानाही, सामान्य प्रवाश्याना उपनगरीय गाड्यात प्रवेश नाही, म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच काम करीत आहेत बाकीच्या लोकांनीं  घरी बसायचा का असा सवाल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.

सामान्य जनता लाचार झाली असून आता पाणी डोक्याच्या वर जात आहे. ज्या लोकांनी एक किंवा दोन्ही लस घेतलेल्या आहेत त्यांना तरी प्रवाशाची मुभा देण्यात यावी. जर येत्या दोन तीन दिवसात सामान्य प्रवाश्याचा विचार नाही केला गेला तर, मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जवाबदारी रेल्वेची असेल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले बनवताहेत उपग्रह; आयुक्तांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांचे गौरव करताना काढले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित ‘स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021’ साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.

मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.

हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

-संतोष दिवाडकर

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला १६ तासांत अटक; KDMC च्या सीसीटीव्हीमुळे लागला शोध

प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली आहे. रिक्षाच्या हूडचा  रंग युनिक असल्याने पोलिसांनी १६ तासाच्या आत प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारास बेडय़ा ठोकल्या आहेत. अजय कांबळे असे रिक्षा चालकाचं नाव असून रशीद शेख असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे. हे दोघे कल्याण पूर्व भागातील पत्रिपुल श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत.

आकाश जैयस्वाल याने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील निक्कीनगर  चौकातून कल्याण स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्न स्थळी घेऊन गेला. आकाश जवळली महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सह प्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या १६ तासात रिक्षाचालकासह त्याचा साथीदाराला गजाआड केलं असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व नांदीवलीत वाहन पासिंग मध्ये भ्रष्टाचार ? उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे होतेय चौकशीची मागणी

वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली असून याबाबत पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी महासचिव राहुल काटकर, पवन दुबे, प्रविण के. सी., राज द्विवेदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील नंदिवाली तलाव येथे कल्याण व ठाणे आरटीओ मधील गाड्यांचे पासिंग करण्यात येते. या ठिकाणी  आरटीओ अधिकारी, दलाल व काही स्थानिक मिळून वाहन पासिंग करताना वाहन चालक, मालक यांची लुट व फसवणूक करत आहेत. या ठिकाणी वाहन पासिंग करताना लाखों रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. शनिवार व रविवार या दिवशी काही विशेष दलालांच्या गाड्यांचे पासिंग करण्यात येत आहे. आरटीओ नियमानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी वाहन पासिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक अधिकारी जास्तीत जास्त ४० वाहन पासिंग करु शकतात.

काही दलाल गाडी पासिंग करण्यासाठी ऑनलाइन मध्ये देण्यात आलेल्या तारखेला वाहन पासिंग न करता शनिवार व रविवार या दिवशी वाहन पासिंग करतात. वाहन पासिंग साठी आरटीओ नियमानुसार गाडी मध्ये काही त्रुटी असताना व आवश्यक कागद पत्र नसताना देखील अधिकारी व दलाल आर्थिक संगणमत करुन वाहन पासिंगकरत आहेत. तसेच वाहन पासिंग साठी बुक मध्ये लेखा जोखा देखील करत नाहीत. पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्या कडुन अनधिकृत पणे पार्किंग साठी १०० रुपये घेतले जात आहेत. पार्किंगची पावती (बनावट पावती) असल्या शिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत.

पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्याकडुन अनधिकृत पणे गाडी सॅनिटायझर करण्यासाठी म्हणून जबरदस्ती १०० रुपये घेतले जात आहेत. सॅनिटायझर केल्याशिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहन चालक मालक यांना गाडीला विशेष व्यक्ती कडुन गाडीला रेडीयम लावण्यासाठी सक्ती अधिकारी यांच्या कडुन करण्यात येत आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार असून यामुळे  नागरिकांची मोठी लुट होत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

या सर्व मुद्दयांवर ७ दिवसात तृतीय पक्षा मार्फत चौकशी करुन चालु असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे आरटीओ कार्यालयामध्ये तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर नांदिवली येथील भ्रष्टाचार करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, दलाल व सामील असलेल्या काही स्थानिकांच्या व्हडीओ ऑडिओ क्लिप्स देखील असल्याचे बोलले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

बाजारात पिशवी कापून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या दोन महिलांना केली अटक; टिटवाळा पोलिसांची कामगिरी

टिटवाळा बाजारपेठेत एक महिला खरेदीसाठी गेली असता या महिलेची पिशवी तिच्या नकळत कापून दोन तोळे सोने लंपास करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच कसून तपास केला आणि २४ तासांच्या आतच चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली.

कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा बाजारपेठेत सोमवारी पार्वतीबाई बोराडे वय ५० वर्षे रा. टिटवाळा या महिला बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून पिशवीत ठेवलेले ५२ हजार रुपये किमतीचा सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

       या गुन्ह्यातील आरोपींचा कल्याण तालुका पोलिस स्टेशन  पोलिस उप निरीक्षक सुर्वे, पोलिस उप निरीक्षक काजोल यादव, पोलिस कर्मचारी तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी शिताफीने शोध घेवून सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या  गुन्ह्यातील दोन महिला आरोपी ज्योती अनिल धोत्रे वय २७  वर्ष राहणार आंबिवली आणि पिंकी मनोज साळुंके वय ३५ वर्ष राहणार आंबिवली यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत.

बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असते. अशावेळी गर्दीचा फायदा घेऊन हातातली पिशवी धारदार शस्त्राच्या मदतीने नकळतपणे कापून त्यातील किमती माल गायब केला जातो. यात कोणाची पिशवी कापायची यावर अगोदरच पाळत ठेवली जाते. त्याच्या पिशवीत काय असेल ? याचा अंदाज घेतला जातो. आणि त्यानंतर आखो आखो मे इशारा करीत गर्दीमध्ये पिशवी कापून चोरटे रफू चक्कर होऊन जातात. आशा प्रकारणात अनेक महिला पोलिसांत तक्रार देणे टाळत असल्याने अशा चोरट्यांचा चांगलाच जम बसतो. या घटना शहरी भागात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गर्दीत खरेदी करताना आपल्या किंमती ऐवजाकडे विशेष लक्ष देण्याची आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

कोकणातील तळीये भूस्खलन आणि मनसे आमदाराच्या ११ लाखांच्या मदतीने भारावले गावकरी

कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गावात दोन आठवड्यांपूर्वी डोंगरावरील जमीन सरकून वाहून गेली. या भूस्खलनात जवळपास ८४ लोकांचा मृत्यू झाला. मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतीच या ठिकाणी जाऊन भेट दिली तसेच मृतकांच्या कुटुंबियांना ११ लाखांची मदत देखील केली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी मुंबई,पुणे,कोल्हापूर सह कोकणात देखील अतिवृष्टीमुळे हाहाकार पसरला होता. अनेक ठिकणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकणात दुर्गम भागात दरडी कोसळल्या तसेच भूस्खलन देखील झाले. यातीलच महाड तालुक्यातील तळीये गावात देखील घडलं. संपूर्ण गावच्या गाव उध्वस्त झाले. कुटुंब मातीखाली गेली. कोसळलेला नुसता डोंगरच नव्हता तर दुःखाचा डोंगर होता. या घटनेनंतर शक्य तितके मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता अनेक लोक रोज या ठिकाणी येऊन भेटी देत आहेत. सरकार कडून देखील मदत केली जाणार असल्याचे आश्वसित करण्यात आले आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोकण दौऱ्यावर असताना या गावात भेट दिली. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखाचे सांत्वन केले. आणि पक्षाकडून ११ लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दुखवटा म्हणून मृतकांच्या कुटुंबियांसाठी गावच्या सरपंचांकडे सुपूर्द केला. मनसेच्या आमदाराने केलेल्या इतक्या मोठ्या मदतीने तेथील लोक भारावले. दिलेल्या मदतीने गेलेला माणूस परत येत नसला तरी अश्या वेळी केलेल्या मदती बद्दल तेथील लोकांनी मनसे आमदारांचे आभार मानले. त्यामुळे सरकार कडून मदत येण्या पूर्वीच मनसेच्या आमदाराने केलेली मदत कुटुंबियांना थोडाफार पाठबळ देईल. तसे पाहता कितीही मोठी मदत दिली तरी दुःखाच्या डोंगरापुढे ती मातीच्या एका कना एवढीच आहे हे मात्र खरं.

लोकांचे संसार वाहून गेलेले आज स्वत: डोळ्यांनी पाहीले. ‘घर असावं घरासारखं’ म्हणायला ना तर घर शिल्लक आहे… न घरातली माणसं. नुसतं मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहून दु:ख भरून येणार नाही, ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण तरीही एक फुंकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ११ लाख रूपये दुखवटा म्हणून तळीये गावचे सरपंच ह्यांच्याकडे सुपूर्द केला. कधीही न भरून येणारं अपरिमित नुकसान झालंय ह्या महापूरात. आज मनसेतर्फे केलेली ही मदत शेवटची नसणार एवढीच ग्वाही जाहीर देतो. पूरग्रस्तहो, तुमच्या दु:खात मी सहभागी होतो, आहे आणि कायम राहीन. आज माझ्यासोबत दौऱ्यावर आलेले सगळे मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक ह्यांचा मला सार्थ अभिमान आहे.

– राजू पाटील (आमदार,मनसे)

-संतोष दिवाडकर

कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची शिवसेनेची मागणी

मागील माही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून सर्व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना आर्थिक व सर्वोतोपरी मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुखांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

१७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवली, वालधुनी, अशोक नगर, शिवाजी नगर, नेहरू नगर, आनंदवाडी, साई नगर, कैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या चाळी मध्ये पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान अन्न धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.  या विभागातील राहणारे सर्व नागरिक हे गरीब व मध्यमवर्गीय असून मोल- मजुरी व नोकरी धंदा करणारे असून या कोरोना च्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार आहेत. त्या मध्ये आलेल्या या नेसर्गिक आपत्ती मुळे त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.

या सर्व नागरिकांना कोणताही आधार नसल्यामुळे या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून या पूर ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास करणाऱ्या सिद्धार्थ गणाईचे कल्याण मध्ये आगमन

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघालेल्या सिद्धार्थ गणाईचे आज कल्याणामध्ये आगमन झाले असून त्याच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कल्याणनजीक असलेल्या बापगावच्या  सरपंचांच्या हस्ते या मोगली सफर चा सत्कार करण्यात आला.

या धाडसी प्रवासच कौतुक करत ह्या तरुण वयात ही जाणीव घेऊन एक पाऊल उचलण खूप मोठी गोष्ट असून सिद्धार्थ ने जे काम हाती घेतले आहे त्या कामाला आमचा पाठींबा असल्याचे सरपंचांनी सांगितले. तसेच याठिकाणी गणाई परिवारातील ज्योती निकाळजे व तमाम सदस्य आणी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यादेखील उपस्थित होत्या.

     एक 22 वर्षीय पछाडलेला तरुण त्याच्या स्वप्नांना साकार करत एक सामाजिक जाणिव घेऊन रायगडच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून हिमालयाच्या दिशेने चालत निघाला आहे. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. असे सिद्धार्थ गणाई यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण गांधारी पुलाचे झाले PWD कडून परीक्षण; पुलाला कसलेही तडे नाहीत

कल्याण येथील गांधारी पुल काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे बंद करण्यात आला होता. मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे परीक्षण केले. तपासणीअंती पुलाला कसलेही तडे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गांधारी पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच हा पूल सोमवारी रात्री खबरदारी म्हणून तात्काळ बंद करण्यात आला. कल्याण शहरातून हा पूल पडघा भागाला जोडतो. शिवाय नाशिकला जाण्यासाठी हा एक सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावरील गांधारी येथे उल्हास आणि काळू नदीच्या संगमी पात्रावर हा पूल उभा आहे. या पुलाची पुरामुळे दुरवस्था झाली असून पिलरला तडे गेले आहेत असा संशय प्रशासनाला आल्याने काल तात्काळ वाहतूक रोखली होती.

आज मंगळवारी दुपारच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,स्थानिक रहिवासी आणि पत्रकारांसमवेत बोटीच्या माध्यमातून या पुलाची पाहणी करण्यात आली. ज्या पिलरला तडे गेले आहेत त्या पिलरवर चढून अधिकारी तथापि इंजिनिअर यांनी पिलरची तपासणी केली. पुर परिस्थितीत पिलरला लपेटलेल्या काळ्या कपड्यामुळे सिमेंट उधडल्याचा आभास निर्माण होत होता. मात्र जवळून पाहणी केल्या नंतर पिलरला वेढलेले कापड आणि गवत बाजूला सारून व्यवस्थित परीक्षण करण्यात आले. यानंतर पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक दिलासादायक माहिती अधिकाऱ्यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना दिली.

गांधारी पूल सुस्थितीत असला तरीही उद्या बुधवारी पुन्हा एक एक्सपर्ट टीम या पुलाचे बारकाईने परीक्षण करणार आहे. यानंतर पुलाला हिरवा सिग्नल देऊन पुलावरील वाहतूक सुरू केली जाणार आहे. जर या पुलाचे नुकसान झाले असते तर डागडुजी होई पर्यंत वाहनचालक,स्थानिक रहिवासी आणि परिणामी प्रशासनाला मोठ्या जाचाला सामोरे जावे लागले असते. यात वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला असता. सुदैवाने पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून उद्याच्या पाहणी नंतर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

बहिणीच्या प्रियकराला चालत्या ट्रेनमधून दिलं ढकलून; महिन्याभरानंतर डोंबिवली जीआरपीने हत्येतील आरोपींना केली अटक

डोंबिवली जीआरपी पोलिसांनी खळबळजनक अशा हत्येची घटना उघडकीस आणली आहे. प्रेमाच्या विरोधात प्रेयसीच्या भावांनी तिच्या प्रियकराला महिन्याभरापूर्वी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडलेला प्रेमी साहिल हाश्मी याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले .परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीनंतर जीआरपी पोलिसांनी साहिलच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील शब्बीर हाश्मी, कासिम हाश्मी, गुलाम हाश्मी यांच्यासह १० जणांना अटक केली.

डोंबिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी साहिल हाश्मी हा एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या महिन्यात १५ जून रोजी साहिलने आपल्या प्रेयसीला पळवून नेले होते. १८ जून रोजी दोघेही रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांना समजले की आपली मुलगी साहिलसोबत पळून गेली आहे. आणि तिच्या वडिलांना राहवले गेले नाही.

मुलीच्या वडिलांनी आपल्या भावाला यूपीहून अंबरनाथ येथे फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर रत्नागिरी एक्सप्रेस १९ जून रोजी रात्री अकरा वाजता कल्याणला पोचणार होती. यापूर्वीच मुलीचा चुलत भाऊ आपल्या मित्रांसह कल्याण स्टेशनला पोहोचला. ट्रेन कल्याण येथे पोहोचल्यावर मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र ट्रेनमध्ये चढले आणि दोघांना शोधून काढले. साहिलला वाईट मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला कोपर ते दिवा रेल्वे स्थानक दरम्यान चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

सुरुवातीला पोलिसांना हा अपघात आहे असे वाटले होते, परंतु जेव्हा जीआरपी पोलिसांनी साहिलच्या नातेवाईकांशी बोलून सर्व बाबींचा बारकाईने शोध घेतला, तेव्हा सर्व तथ्य उघडकीस आले. साहिलच्या हत्येतील 10 आरोपींना डोंबिवली जीआरपीने अटक केली. एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर