वृक्ष लागवड करून शंभुदुर्ग प्रतिष्ठाणतर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा या संस्थेने सामाजिक वारसा जपत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शेरे व वेहले या गावालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वृक्षलागवड कार्यक्रमात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील संस्थेच्या शेकडो कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शेकडो झाडांची लागवड केली.

शिवभाळू, जांभूळ, आपटा,चिंच, गुलमोहर, आणि धामण आदी प्रकारची झाडांची लागवड केली असून या झाडांचे संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली असल्याचे संस्थेचे संस्थापक आदेश चौधरी यांनी सांगितले. शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ही संस्था स्थापना काळापासून संपूर्ण ठाणे जिल्हात सतत दुर्गसंवर्धन, सामाजिक उपक्रम, आपत्कालीन मदतीचे उपक्रम,तसेच धार्मिक उपक्रम राबवत असल्याने संस्था कार्याची दखल घेऊन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी संस्थेच्या संपूर्ण कार्यकारणीला सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

-कुणाल म्हात्रे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्यावतीने वृक्षारोपण

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आणि छ. शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी कल्याण पूर्वेकडील, पत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला.

संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छ. शाहू महाराजांना अभिवादन करून नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  पळस, महोगनी, जांभूळ, सीताफळ, साग, बांबू, पळस, बकुळ आदी प्रकारची ३० रोपे लावण्यात आली.

महा. अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास ‘समता संघर्ष’ संघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, ‘पुरोगामी विचार मंच’चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडे, व्यावसायिक जगदीश ठाकूर, ‘अंघोळीची गोळी’ मोहिमेचे  तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, महा. अंनिस कल्याण, डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, जिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

वृक्षारोपणासाठी जागा निवडणे, खड्डे खोदणे, कार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनी, नियोजनासाठी शरद लोखंडे, दत्ता बोंबे, तानाजी सत्वधीर, शुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली.वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना समजाऊन सांगितली तसेच केवळ वृक्षारोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मधून मधून वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी अंघोळीची गोळी, खिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली.

-कुणाल म्हात्रे

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांवर कौतुकांचा वर्षाव ; मुख्यमंत्र्यांनीही फोनद्वारे केले अभिनंदन

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी देखील आयुक्तांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. समाजातील सर्वच स्तरातून मनपा आयुक्तचे कौतुक होत असुन कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शनिवारी आयुक्तांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव रामचंद्र औटी, माजी अध्यक्ष कालीदास कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ माने हे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक करीत कल्याण डोंबिवली शहराची विकास कामांची प्रगती होत नावलैविक वाढेल अशा शुभेच्छा दिल्या.

कल्याण डोबिवली ठेकेदार आसोशियनचे पदाधिकारी सिद्धार्थ माने यांनी सामाजिक बांधलिकितुन तळागाळातील एका कामगाराचा वर्षभरासाठी विमा काढण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधलिकितुन समाजातुन असे नागरिक पुढे येणे हे सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीच्या या यशामुळे येथे राबविलेले प्रकल्प पाहणी करण्यासाठी  इतर महानगरपालिकांचे आयुक्त देखील येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उभारलं सावित्रीबाईंचे तोडलेले घर

कल्याण तालुक्यातील चवरे येथे वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी वटपौर्णिमेच्या दिवशी भर पावसात बांधून पूर्ण केले.

पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून बांधत असलेल्या आदिवासी महिलेच्या घरावर वन विभागाने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केले होते. वनविभागाच्या या कारवाईनंतर श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढत या कारवाईचा निषेध करण्यात आला होता. तसेच संबंधीतांवर कारवाई करत त्या आदिवासी महिलेला घर बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. तर प्रशासनाने घर बांधून न दिल्यास श्रमजीवी संघटना घर बांधून देईल असेही सांगण्यात आले होते.

मोर्चा मध्ये संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर यांनी ठरवल्या प्रमाणे कल्याण तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यां घर बांधणी साठी उभ्या राहिल्या व सावित्रीबाई यांच घर एका दिवसात उभ करून दिले. भर पावसात आपला संसार उघड्या वर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात यावेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू होते. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले.

यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, तालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, जिजा वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

ओबीसी आरक्षणासाठी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांनी केला रास्ता रोको

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाल्याची टीका कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, गणेश भाने, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, नरेद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले, यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  

            ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करणा:या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करुन नंतर सोडून देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणरुपी हक्क हिरावून घेतला, त्याविरोधात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा द्यायला आज श्रीराम चौक, सूचक नाका,  कल्याण पूर्व येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी आम्ही अशाच प्रकारे यापुढे देखील संघर्ष करीत राहू अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. 

-कुणाल म्हात्रे

वीजबिल वसुलीला गती द्या ; अन्यथा कारवाई – महावितरणच्या वाणिज्य संचालकांचा ईशारा

महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.

-कुणाल म्हात्रे

‘क.डों.म.पा.’ला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार ; वाराणसी आणि कल्याण डोंबिवली संयुक्त विजेते

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19  इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना  संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत   25 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये  स्मार्ट सिटी ॲवार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यातील निवडीचे निकष हे मुख्यत: केलेल्या कामाच्या गुणवत्तेशी निगडीत होते.

स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत सन 2016 पासून विविध टप्‍प्यांमध्ये एकुण 100 शहरांची निवड केली होती. यातील पहिल्या टप्प्यात 20, दुस-या टप्प्यात 40, तिस-या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता. या स्पर्धेसाठी टप्पेनिहाय पारितोषिकांसाठी वेगवेगळी संवर्गात निवड प्रक्रिया जाहिर करण्यात आली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंन्ट कार्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने “कोविड इन्होवेशन अवॉर्ड” या गटासाठी नामांकन सादर केले होते. एकुण निवड प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात सर्व शहरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या एकंदरीत कामगिरीसाठी बाद फेरी तत्वाप्रमाणे काही निकष ठरविण्यात आले होते. 

दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड केली गेली होती. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेले हे ॲर्वाड म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे,  कोविड कालावधीत महापालिकेल्या मदत करणा-या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी / कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळयांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपध्दती यापुढीही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

-संतोष दिवाडकर

अवघ्या काही तासांत पोलिसांनी शोधला चार वर्षांचा हरवलेला मुलगा

आज दि.२४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास खडेगोळवली कल्याण पूर्व येथून एक चार वर्षांचा मुलगा हरवला होता. पोलिसांना खबर दिल्या नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या मुलाचा शोध लावला आणि त्याला पालकांच्या हवाली केले.

वेदांत अनिल सिंग हा ३ वर्षे ११ महिन्यांचा मुलगा सायंकाळी पाऊने सहाच्या दरम्यान खडेगोळवली परिसरातून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, विचारपूस केली मात्र तो कुठेही सापडला नाही. वेदांतला कुणी तरी पळवून नेले असावे असा संशय त्यांना बळावला आणि भेदरलेल्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, क्राईम पोलीस सर्जेराव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे आणि सर्व टीमने आपले संपर्क वापरून नागरिकांना याबाबत अवगत केले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. आणि काही तासानंतर शोध घेताना हा हरवलेला बालक सापडला. त्यानंतर या बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी कमी वेळात घेतलेल्या या शोधाचे निश्चितच कौतुक होणे साहजिक आहे.

-संतोष दिवाडकर

“… तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव देखील राहणार नाही” – आमदार गणपत गायकवाड

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सिडको येथे आज भूमिपुत्रांकडून आंदोलन केले गेले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले.

बहुजनांचे नेते म्हणून दि.बा.पाटील यांनी लढा दिला होता. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले होते. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला देण्यात यावे याकरिता भूमिपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहिले होते. कल्याण पुर्वेचे गणपत गायकवाड हे देखील आपल्या समाजासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव असेल. उद्धव साहेबांनी त्याच्या आड येऊ नये. स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आगरी,कोळी,कुणबी आणि आणखी काही समाज तसेच धर्मातील लोकही समाविष्ट आहेत. त्यामुळे ही सर्वांची एकजुटीने केलेली मागणी आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रच आहेत. जर हे सर्व भूमिपुत्र तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव देखील राहणार नाही. अशी घणाघाती टीका आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केली. दि.बा.पाटील यांच्या नावासाठी कल्याण पूर्वचे आमदार आधीपासूनच आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत विनंती देखील केली आहे.

-संतोष दिवाडकर

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ; संपादकाने केला दावा

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर ३,२०२ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.

 महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवला जात नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रशासनाची ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था’ अर्थात् एन्.सी.ई.आर्.टी. अर्ध्या पानांपेक्षा अधिक इतिहास शिकवायला सिद्ध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये, तर येडीयुरप्पा यांच्यामुळे कर्नाटक राज्यात थोडासा इतिहास वाढवला गेला आहे; मात्र देशात शिवछत्रपतींचे विचार संपवण्याचे कारस्थान चालू आहे. देशाची शासनव्यवस्था ‘छत्रपती शिवराय हे आदर्श हिंदू राजे होते’ हे देशातील तरुणांना शिकवू देत नाही. आज देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी स्थिती आहे. केवळ शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु साम्राज्य दिन साजरा करून उपयोग नाही. काशी-मथुरा मुक्त करण्याचा शिवरायांचा संकल्प होता असे देखील सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.

या वेळी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी पाच इस्लामी आक्रमकांचा निःपात करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी राज्याभिषेक करून भाषा पुनरुज्जीवित केली. स्वतःचा राज्यव्यवहारकोश संस्कृत भाषेत आणला. राज्य संस्थापनेला त्यांनी धर्म संस्थापनेचे स्वरूप दिले. याउलट वर्ष १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य मिळाले; पण राज्य संस्थापना झाली नाही, असे म्हणावेसे वाटते; कारण ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना दडपण्यासाठी आणलेला वर्ष १८६०  चा ‘इंडियन पिनल कोड’ अद्याप लागू आहे. भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी आणलेला ‘इंडियन गव्हर्नन्स अ‍ॅक्ट १९३५  हा राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच अंतर्भूत केला आहे.  गुरुकुल परंपरा बंद पाडण्यासाठी कायदा करून चालू केलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती अद्याप चालू आहे. अरबी, इंग्रजी आक्रमकांनी आपल्या रस्ते-वास्तूंना दिलेली नावे आपण पालटलेली नाहीत.

४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणाला विचारायला गेले नव्हते. औरंगजेब, आदिलशाह, कुतबशाह आदी मुघल राजांची अनुमती घेतली नव्हती. मुठभर मावळ्यांना एकत्र करून शपथ घेतली. नंतर स्वत:चे सैन्य, शस्त्रागार, आरमार, हिंदूंची पाडलेली मंदिरे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तो आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास  यावेळी विश्‍व हिंदु परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य विवेक सिन्नरकर यांनी व्यक्त केला.

-कुणाल म्हात्रे