देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ; संपादकाने केला दावा

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर ३,२०२ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.

 महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवला जात नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रशासनाची ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था’ अर्थात् एन्.सी.ई.आर्.टी. अर्ध्या पानांपेक्षा अधिक इतिहास शिकवायला सिद्ध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये, तर येडीयुरप्पा यांच्यामुळे कर्नाटक राज्यात थोडासा इतिहास वाढवला गेला आहे; मात्र देशात शिवछत्रपतींचे विचार संपवण्याचे कारस्थान चालू आहे. देशाची शासनव्यवस्था ‘छत्रपती शिवराय हे आदर्श हिंदू राजे होते’ हे देशातील तरुणांना शिकवू देत नाही. आज देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी स्थिती आहे. केवळ शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु साम्राज्य दिन साजरा करून उपयोग नाही. काशी-मथुरा मुक्त करण्याचा शिवरायांचा संकल्प होता असे देखील सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.

या वेळी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी पाच इस्लामी आक्रमकांचा निःपात करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी राज्याभिषेक करून भाषा पुनरुज्जीवित केली. स्वतःचा राज्यव्यवहारकोश संस्कृत भाषेत आणला. राज्य संस्थापनेला त्यांनी धर्म संस्थापनेचे स्वरूप दिले. याउलट वर्ष १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य मिळाले; पण राज्य संस्थापना झाली नाही, असे म्हणावेसे वाटते; कारण ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना दडपण्यासाठी आणलेला वर्ष १८६०  चा ‘इंडियन पिनल कोड’ अद्याप लागू आहे. भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी आणलेला ‘इंडियन गव्हर्नन्स अ‍ॅक्ट १९३५  हा राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच अंतर्भूत केला आहे.  गुरुकुल परंपरा बंद पाडण्यासाठी कायदा करून चालू केलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती अद्याप चालू आहे. अरबी, इंग्रजी आक्रमकांनी आपल्या रस्ते-वास्तूंना दिलेली नावे आपण पालटलेली नाहीत.

४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणाला विचारायला गेले नव्हते. औरंगजेब, आदिलशाह, कुतबशाह आदी मुघल राजांची अनुमती घेतली नव्हती. मुठभर मावळ्यांना एकत्र करून शपथ घेतली. नंतर स्वत:चे सैन्य, शस्त्रागार, आरमार, हिंदूंची पाडलेली मंदिरे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तो आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास  यावेळी विश्‍व हिंदु परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य विवेक सिन्नरकर यांनी व्यक्त केला.

-कुणाल म्हात्रे

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची झाली निवड

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी कल्याणमधील सुजित रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस, कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र रोकडे यांना दिले आहे.

       राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने सुजित रोकडे यांची कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी तर आदित्य चव्हाण यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा रोकडे यांच्या नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.

       सुजित रोकडे हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सक्रीय असून कल्याणमध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य असे अनेक उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबविले आहेत. पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुजित रोकडे यांनी यावेळी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

“राजसाहेबांच्या बोलण्याचा विपर्यास करून वेगळा अर्थ काढला जातोय” – मनसे आमदार राजू पाटील

नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाच्या नामकरणासाठी सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करून वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोर्चात सहभागी होत असल्याचे देखील सांगितले आहे.

“मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.

राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.

आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.

म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.”

– राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)

-संतोष दिवाडकर

सोयीसुविधांचा बोजवारा उडालेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका आयुक्त

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार असून रुग्णालयाला सुसज्ज आणी अत्याधुनिक कसं करता येईल यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी करून घेतली आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असल्यामुळे रेल्वे स्थानकानजिक असलेल्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी दिसून येते. या रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली. ही पाहणी करतांना त्यांनी रुग्णालयामागे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही भेट देवून तेथिल पाहणी केली.

रुक्मिणीबाई रुग्णालयामागे तळ मजल्यावर ऑक्सिजन प्लँटसाठी राखीव असलेल्या जागेची देखील त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, मॅटर्निटी वॉर्ड यांना भेट देवून तेथे सुधारणा करणेबाबत संबंधितांना सुचना दिल्या. यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर काम सुरु असलेल्या १०  खाटांच्या अतिदक्षता कक्षाची तसेच मॉडयुलर ऑपरेशन थिएटर यांची पाहणी केली.

   रुक्मिणीबाई रुग्णालय हे कल्याण मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात मोठया प्रमाणात ओपीडीला गर्दी असते, या रुग्णालयाचे एक वेगळेच महत्व आहे. शास्त्रीनगरच्या धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आजूबाजूस सिटी स्कॅन आणि एम.आय. आर. ची सुविधा कुठे करता येईल, एक सुसज्ज रुग्णालय कसे उभे करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी रुग्णालयाची पाहणी केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.  

यावेळी वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता भालचंद्र नेमाडे, वैदयकीय अधिकारी समिर सरवणकर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

टिटवाळ्यात आढळला दुर्मीळ ‘सिसिलिअन’ उभयचर जीव

टिटवाळ्यातील  काळू नदीलगत सापासारखा जीव सोमवारी रात्रीच्या सुमारास रोड क्रॉस करताना नागरिकांना आढळून आला. त्याच्या पाठीवर जखम झाली होती त्याला कोणीतरी दगड मारून जखमी केल्याचा अंदाज होता. स्थानिक नागरिकांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर फोन करून याची माहीती दिली तेव्हा टिटवाळा टिमचे सर्पमित्र धनुष वेखंडे व सुमित भडांगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जीव सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. प्रथमदर्शनी हा मांडूळ  असल्याचा भास झाला परंतू कल्याण येथील वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे संपर्क साधला व ओळख निश्चित करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. वरद गिरी, सरिसृप संशोधक यांची मदत मिळाली.

या जीवाला शास्त्रीय भाषेत  इंग्लिश मध्ये  बॉम्बे सिसिलिअन व मराठीत देवगांडूळ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणि व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतो याचे मुख्य अन्न गांडूळ आहे तसेच स्वः संरक्षणासाठी स्वतःच्या शरीरावर चिकट स्त्राव  सोडतो त्यामुळे त्याचे शरीर खुप गुळगुळीत होते म्हणूनच त्याला शिकारीकडून सहज पकडणे सहज शक्य होत नाही. हा जीव प्रमुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. टाचणी च्या आकाराचे सहज न दिसणारे डोळे व गोलाकार रिंगण असलेले शरीर यावरून त्याची ओळख निश्चित करता येते. अशा जीवाला वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमला यश आले आहे.

हा सिसिलिअन उभयचर जीवाला वनविभागाच्या परवानगीने कल्याण येथील खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोले यांनी  प्रथमोपचार केला असून तज्ञव्यक्ती व वनविभागाच्या परवानगीने शास्त्रीय नोंदी घेऊन त्याला निर्सगमुक्त करण्यात येईल अशी माहिती   वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार (वन्यजीव अभ्यासक) यांनी दिली.

कल्याण डोंबिवली व टिटवाळ्यातील जैवविविधतेचा परिपूर्ण अभ्यास करून असून वन्यजीव व इतर जीवाची नोंद करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य व कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेत जैवविविधता नोंद वही असून त्यात या उभयचर वर्गातील सिसिलिअन (देवगांडूळ) याची नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे  वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.

-कुणाल म्हात्रे

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची केली जातेय मागणी

बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.

खासदार कपिल पाटील यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची काल भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्यापि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्यापी काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली. एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.

-कुणाल म्हात्रे

पगार न मिळाल्याने केडीएमसी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर चौकात कामगारांनी एकत्र येऊन कचरा गाड्या रस्त्यावर उभ्या करत कचरा उचलण्यास नकार दिला. केडीएमसीमध्ये घंटागाड्यांवर  सुमारे २५० कामगार काम करत असून त्यापैकी ५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. तर याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास उद्या हे आंदोलन चिघळण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

       कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रातील ३ प्रभागात खासगी कंत्राटदारामार्फत कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देण्यासह अर्धवट पगार मिळत असल्याचे सांगत आज सकाळी या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले. कल्याण पश्चिमेतील या ३ प्रभागातील कचरा न उचलता त्याशेजारी कचऱ्याच्या गाड्या नेऊन उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे तिन्ही प्रभागात सकाळपासून रस्त्यावर कचरा तसाच पडलेला होता.

       महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

विकृत मुलाने वयोवृद्ध आई बापावर केला लाठीमार ; आईचा मृत्यू तर बाप जखमी

रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा उजेडात आली आहे. शिरूर तालुक्यातील एका विकृत मुलान आपल्या जन्मदात्या वयोवृध्द आई वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत उपचारादरम्यान त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर जखमी वडिलांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे संपूर्ण जग फादर डे साजरा करीत होत तर शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मात्र एक विकृत आपल्या जन्मदात्या आई बापावर काठीने हल्ला करीत होता. बाबासाहेब खेडकर असं या विकृत मुलाचं नाव आहे. ज्या आई बापाने या बाबसाहेबाला वाढवलं, मोठं केलं त्याच आई बापांना हा मुलगा इतक्या क्रूरतेने मारताना या व्हडीओ मध्ये दिसतोय.

७० वर्षीय शहाबाई खेडकर आणि ७५ वर्षीय त्रिंबक खेडकर जिवाच्या आकांताने घाव सोसत विव्हळत होते. “धावा धावा पांडुरंगा” अशी आर्त साद त्याचे वडील घालत होते. मदतीसाठी ते दुरून पाहणाऱ्या जमावाला हाक मारत होते. जवळपास गावकरी शेजारीपाजारी जमले होते. मात्र कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हता. त्यातीलच एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले. जर कुणी पुढे गेला असता आणि सैतानी वृत्तीच्या त्या निर्दयी मुलाला थांबवलं असत तर त्याला जन्म देणाऱ्या माऊलीचा जीव नक्कीच वाचला असता. मात्र जो पर्यंत गावकऱ्यांनी मध्यस्थी केली तोपर्यंत उशीर झाला होता. मारहाण झालेल्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दुर्दैवाने त्या माउलीला मृत घोषित करण्यात आले. तर पित्यावर अद्याप उपचार सूरु आहेत.

बीड रिपोर्टर डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार या घटने विरोधात पोलीस ठाण्यात भा द वि कलम 302 307 आणि 323 अनव्ये गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. शिवाय आरोपीला देखील जेरबंद करन्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा हा मानसिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जाचाला कंटाळून पत्नी देखील माहेरी निघून गेली असल्याची माहिती मिळाली आहे. या विकृतीचे आई वडील देखील आपल्या लेकीकडे राहतात. मात्र आपल्या लेकाला कोरोना झाल्याचे समजल्याने जीवाची पर्वा न करता दोघेही आपल्या मुलाला भेटायला घरी परतले होते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गुम्ह्णाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरोक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत

आई वडील जन्म देतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना वाढवतात आणि काही विकृत मुलं त्याचे असे पांग फेडताना दिसतात. जन्मदात्या माता पित्यांना मारहाण करण्यासाठी यांचे मन आणि हात कसे धजावतात हे समजायला कठीणच. पण गुन्हा घडला आहे आणि आता अशा विकृतांना धडा शिकवला जाणं ही काळाची गरज बनू लागली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ

-संतोष दिवाडकर

आंबिवली अटाळी परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी शिवसेना नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

आंबिवली, अटाळी परिसरात पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शिवसेना अटाळी शाखेच्या वतीने मंगळवारी ‘अ’  प्रभागक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंबिवली, अटाळी परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसातून एक तास पाणी वितरीत होते. त्यात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असुन अनेक वर्ष तक्रार करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक दशरथ तरे, शिवसेना शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील, माजी नगरसेविका हर्षाली थविल, लीलाबाई तरे, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील  आदींसह शिवसैनिकांनी मंगळवारी अ प्रभाग कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करीत पाणी वितरण सुरळीतपणे करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.                               

        अ प्रभाग क्षेत्रात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता नसल्याने “अ” प्रभागक्षेत्राचा संपूर्ण कार्यभार उप अभियंता संभाळत आहेत. यामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त भार येतो व ते फोन घेत नाहीत तसेच पाणी पुरवठा संबंधित कामांना गती मिळत नाही. तसेच “अ” प्रभागासाठी मोहेली येथुन ९८ एमएलडी तसेच टिटवाळा येथून ७ एमएलडी पाणी पुरवठा होत असताना देखील पाणी पुरवठ्याचे समान वितरण का होत नाही, पाणी जाते कुठे असा खडा सवाल  उपस्थित  करीत प्रशासनाला माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी धारेवर धरले.

केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावरून वडवली पाणी पुरवठा लाईनला दैनंदिन होणारा पाणी पुरवठा हा शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, नेपच्यून या भागात होत असतो. परंतु या पाणी पुरवठ्याचे सर्व भागात समान वितरण होत नाही. काही भागांना दिवसातील चौदा ते सोळा तास पाणी वितरत होते. तर अटाळी, आंबिवली परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसाला एकच तास पाणी वितरित होते. पंरतु एक तास होणारा होणारा पाणी पुरवठा सुध्दा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक वर्ष याबाबत तक्रार करूनही कुठलीही सुधारणा होत नाही. सर्वांना समान पाणी बील आहे. त्याप्रमाणे पाण्याचे वितरण समान वाटप करावे ही जनतेची मागणी असुन याबाबत प्रशासनाने दखल घेऊन पाण्याचे समान वाटप करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

“अ” प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा उप अभियंता उदय सूर्यवंशी यांनी  तंत्रिक अडचणीमुळे उशीराने पाणी पुरवठा होतो, येत्या आठवड्यात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत  ज्या परिसरात पाणी टंचाई होत आहे. त्या बाबत तपासणी करून पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले.  या ठिय्या आंदोलनात माजी नगरसेवक दशरथ तरे, दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका लीलाबाई तरे, हर्षाली थवील, शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील शिवसेना पदाधिकारी रमेश पाटील, लता भोईर, चतुर सोनावणे आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

-कुणाल म्हात्रे

‘बी.एल.ओ’ चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची तहसीलदारांकडे मागणी

शिक्षकांना दिलेले बी.एल.ओ चे आदेश रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांकडे केली असून शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि  बी.एल.ओ.चे काम असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववीचे गुण व इयत्ता दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाचे काम शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविल्याने निकाल तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यातच विधानसभा क्षेत्र  १४२ मतदार संघातील शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामाचे आदेश काढण्यात आले आहेत.  शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती, दुबार, मयत, स्थलांतरित, छायाचित्र चिटकवणे नोटिसा बजावणे इत्यादी कामे करण्याकरिता आदेश काढण्यात आले आहेत.

 मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील व इतर पदाधिकारी ए.व्ही. पाटील, आप्पाराव कदम यांनी विधानसभा क्षेत्र १४२ चे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व  निवेदनाद्वारे बी.एल.ओ.चे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

-कुणाल म्हात्रे