६ महिन्यांत बारावे वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे होणार बंद ; केवळ सुख्या कचऱ्याचे होणार वर्गीकरण

येत्या ६ महिन्यांत कल्याणमधील बारावे येथील कचरा वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे पूर्णपणे बंद होणार असून याठिकाणी केवळ सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी बारावे प्रकल्पाविरोधात लढणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.

बारावे कचरा वर्गीकरण केंद्रावर ओल्या कचऱ्याचा ढीग साचला असल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गोदरेज हिल परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धडक देत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना काही दिवसांपूर्वी जाब विचारला होता. त्यानंतर याठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या आदेशांची अमलबजावणी करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागीतली होती. यावर चर्चा करण्यासाठी येथील नागरिकांना देखील बोलविण्यात येणार होते. त्यानुसार मंगळवारी  दुपारी  मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे आणि इतर सदस्यांनी घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कोकरे यांनी या शिष्टमंडळाला सर्वप्रथम एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर तेथे उंच भिंत बांधण्यात येईल. एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे ५ जून २०२१ पासून उंच झाडे लावण्यात सुरूवात करण्यात येईल. ओल्या कचऱ्यातून निघणाऱ्या लिचड वर लवकरात लवकर प्रक्रिया चालू करणार. आत्ता जो कचऱ्याचा ढीग आहे त्याचे स्क्रिनिंग करून स्टेप बाय स्टेप संपवणार तो पर्यंत तेथे नवीन कचरा टाकण्यास बंद करणार. आत्ता जो दिवसा व रात्री जास्त दुर्गंधी येते त्यासाठी दोन शिप मध्ये कल्चर फवारणी केली जाणार जेणे करून दुर्गंधी येणार नाही.

२ ते ३ महिन्यात महानगरपालिकेचा प्रयत्न असेल की ओला कचरा बारावे प्रकल्प येथे पूर्णतः टाकण्यास बंद करणार व फक्त सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण तेथे केले जाणार, जो कचरा रिसायकल करण्यासाठी बाहेर मार्केट मध्ये विकला जाणार. जास्तीत जास्त ६ महिन्यात १०० टक्के ओला कचरा बारावे येथे टाकायचे बंद करणार असल्याचे आश्वासन उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले.

कोकरे यांचा इतर नगरपालिका व महानगरपालिकांचा अनुभव पाहता ते नक्कीच बारावे, गोदरेज हिल रहिवासी यांना या दुर्गंधीतून मुक्त करतील अशी खात्री बाळगत असल्याची माहिती बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

एम.आय.डी.सी परिसरातील रस्त्यांना येणार अच्छे दिन ; खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली येथील निवासी व औद्योगिक विभागातील भागातील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी यांच्या हद्दीच्या वादात या रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरणाचे काम रखडले होते. अखेरीस खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमआयडीसी आणि महापालिका यांनी या रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी ५०% टक्के खर्च करणार असून हा पेच सुटला आहे. आता निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांनालवकरच सुरुवात होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या परीसरातील, तसेच निवासी क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चालू होते. त्यानुसार दि. २५ जानेवारी २०२० रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता सपना कोळी यांच्या नियोजित बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ व २ या विभागातील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार असून उर्वरित निवासी वसाहतीमधील रस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घ्यावे असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.

महापालिका व एमआयडीसी या दोन्ही प्राधिकरणांनी या रस्त्यांसाठी खर्च करावा, अशी भूमिका घेत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, त्यानुसार त्यानुसार सदर रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसीने मंजुरी दिली.

महापालिकेने ४० टक्के रस्त्यांसाठी निविदा काढल्यानंतर महामंडळही उर्वरित ६० टक्के रस्त्यांची कामे हाती घेणार होते. त्यानुसार, ५५.१५ कोटी रुपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यासाठीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. परंतु, महापालिकेची आर्थिक अवस्था लक्षात घेऊन नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश येऊन श्री. शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७.३७ कोटी रुपये अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

सदर रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. याबद्दल महापालिका व खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एमएमआरडीए व सर्व संबधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.

– कुणाल म्हात्रे

पुण्यात वाढदिवसा निमित्त युवकाने शेकडो गरजूंना केले अन्नदान

अलीकडल्या काळात वाढदिवसाला केकचा सत्यानाश करण्याची प्रथा अलीकडे खूप वाढू लागली आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अंगावर कसलेही द्रव्य ओतून अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर अंडी फोडून त्याला माखवले जाते. या सगळ्या गोष्टी एकाबाजूला ठेवून पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा वाढदिवस अन्नाची नासाडी न करता गरिबांना अन्नदान करून साजरा केला आहे.

शुभम शिंदे या तरुणाचा १ जून रोजी २१ वा वाढदिवस होता. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. आधल्या दिवसा पासूनच त्याने लागणारे साहित्य जसे की पेकिंग बॉक्स, बिसलेरी, कच्च्या भाज्या, मसाले, तांदूळ असे साहित्य आणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच शुभम आणि त्याचे मित्र कामाला लागले. एकत्र बसून त्यांनी आणलेल्या भाज्या कापायला सुरुवात केली. काही मित्रांनी भात घातला. असे करून उत्तम आचारी मित्रांच्या मदतीने व्हेज बिर्याणी बनवली. या बिर्याणीचे जवळपास शंभर पेकेट्स त्यांनी पेक केले.

दुपार पासूनच शुभम आणि त्याचे मित्र पुण्यातील शनिवार वाडा आणि आसपासच्या परिसरात फिरू लागले. कोरोना उपासमारीच्या काळात रस्त्यावर उपाशीपोटी दिसणारे बेघर, गोर गरीब, दोन वेळच्या अन्नासाठी भटकणारे कष्टकरी, लहान मुले या सर्वांना शुभमने हे अन्नाचे पेकेट्स वाटले. त्यानंतर मात्र एक केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला गेला.

“केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला. काही उत्साही मित्र असतात. माखवा माखवी होतेच थोडीफार. परंतु अति नासाडी टाळून तेच अन्न गरिबांच्या पोटात गेलं याच मला समाधान आहे. माझ्या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. मला याचा कुठं गवगवा करायचा न्हवता. नायतर लोक म्हणतील देखावा करतोय. पण माहीत नाही मित्रांनी व्हडीओ काढलीच थोडीशी. हे अन्नदान करून मला खूप समाधानी वाटलं. कदाचित असंच इतरांनी देखील करावं. आणि पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात वाढदिवस असाच साजरा व्हावा असं मलाही वाटत.”

– शुभम शिंदे

अलीकडे तरुणाई मध्ये केक खाणारे कमी आणि माखवुन वाया घालवणारे आपल्याला अधिक मिळतात. बऱ्याचदा अक्खाच्या अखा केक तोंडावर मारून वाढदिवस साजरा करतात. यात कोणते समाधान आहे हे समजणे कठीणच. पण केक आणि अंड हा एक अन्नाचा प्रकार असल्याने ती एक उतमात आहे हे निश्चित. आपण मात्र गरिबांना अन्नदान करावं असं शुभमने ठरवलं. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचे देखील सहकार्य लाभले. करण गायकवाड, साहिल शेलार, आकाश खरात, आकाश जाधव, हर्षद भिकुले, सचिन वाघमारे,अभिषेक ठोंबरे, देवा गाडे, संकेत जोरी, तेजस साठे, प्रतीक आरसकर या मित्रांनी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व स्तरातून शुभमची व त्याच्या मित्रांची स्तुती होत असून इतर तरुणांनी ही असा आदर्श घ्यावा असे अनेक समाजसेवक म्हणत आहेत.

“गेल्या अनेक वर्षांत मी हजारो केक बनवले असतील. प्रत्येक केक हा आम्ही मनापासून बनवत असतो. अर्थात आम्हाला कस्टमर पैसे देतात खरे परंतु त्या केकची नासधूस झालेली आम्हाला खरोखर आवडत नाही. ते एक अन्न आहे ते एखाद्याच्या मुखी लागणे उत्तम. काही लोक आपला वाढदिवस आश्रम अथवा आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करतात. त्यासाठी मला केकच्या ऑर्डर येतात. अशावेळी मी बऱ्याचदा त्यांना डिस्काउंट देत असतो. कारण ज्या लोकांसाठी ते करणार आहेत त्याबद्दल आम्हालाही आपुलकी आहे. नासधूस करण्यापेक्षा अन्नदान केव्हाही श्रेष्ठ”

– महेश बनकर (रोसो कॅफे,कल्याण)

– संतोष दिवाडकर

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क.डों.म.पा. क्षेत्रात दि.२ व ३ जून रोजी लसीकरणाची विशेष सुविधा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्रपणे कोविशिल्ड लसीकरणाची व्यवस्था उद्या दि.२ जून व ३ जून रोजी आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.

परदेशात शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विदयार्थ्यांनी कोविशिल्ड लसीकरणासाठी येताना काही कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत.

  • शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्ट यापैकी एक)
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)
  • १२० फॉर्म अथवा डीएस १६० फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विदयापीठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक.

वरील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर आणावयाची आहेत. झेरॉक्स प्रती लसीकरण क्रेंदावर जमा करुन घेतल्या जाणार आहेत. परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विदयार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे क.डों.म.पा. तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेत लस उपलब्ध न झाल्यामुळे परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांना आणि इतर सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद असणार आहे.

– संतोष दिवाडकर

दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन ; संबंधीतांवर कारवाई करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

सोमवारी दुर्गाडी येथील नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव बंदीचे आदेश असतानाही शिवसेना भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून संचारबंदी, जमावबंदी नियमांचे उल्लघन केल्याने त्यांच्यावर कोरोना माहामारी नियम कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

देशात, राज्यात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत असून त्यामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोनाची साखळी मोडण्या करीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बध लावलेली आहेत. राज्यात संचारबंदी, जमावबंदी असताना देखील मुख्यमंत्री यांच्या मंत्रीमंडाळातील मंत्री, खासदार आमदार, पक्षाचे पदाधिकारी हे सर्रास्स पणे संचारबंदी व जमावबंदीचे नियम मोडताना दिसत आहेत.

लॉकडाऊनमुळे नागरीक घरा बाहेर निघु शकत नाहीत. अनेक नागरीकांचे, व्यावसायीकांचे रोजगार तसेच उद्योग धंदे बुडालेले आहेत. काहींवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. जर एखादा व्यक्ती काही कारणस्तव घरा बाहेर आला तर त्याच्यावर पोलीस, पालीका यंत्रणे मार्फत कारवाई केली जाते. तसेच अनेक व्यावसायीक दुकानांवर कारवाई करून सिल केली आहेत.

असे असतांना दुर्गाडी नविन पुलाचे उद्घाटन करते वेळी त्या ठीकाणी राजकीय मान्यवराची गर्दी झाली. तसेच त्यांच्या सरंक्षणा करीता पोलीस कर्मचारी, महा नगरपालीका तसेच ईतर प्रशासकीय कर्मचारी यांची गर्दी झाली होती. यांच्यापैकी एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल आप ने उपस्थित केला आहे.  

 कायदा नियम हे फक्त सामन्य जनतेसाठीच असतात, राजकीय नेत्याना त्यातून वगळले जाऊन सूट दिलेली आहे का असा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. तरी कायद्या हा सर्वासाठी एकच आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी सबंधितांवर संचारबंदी, जमावबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

– कुणाल म्हात्रे

दुर्गाडी पुल लोकार्पण दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती सेना भाजपच्या झेंड्यांचा वेढा ; शिवप्रेमींमध्ये नाराजी

कल्याण भिवंडी रोडवरील नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गीकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगलीच चढाओढ रंगली होती. यासाठी पुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. श्रेय घेण्याच्या अट्टहासात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती पक्षाच्या झेंड्यांची झालर लावली होती. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास अशाप्रकारे राजकीय प्रदर्शन केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.  

अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना आपल्या श्रध्दा स्थानी मानतो. अशा युग पुरुषांच्या स्मारका ठिकाणी आपल्या पक्षीय प्रेमा पोटी विद्रुपीकरण करणे कदापी  महाराष्ट्रातील शिवप्रेमी सहन करणार नाही. या प्रकाराचा, निष्क्रिय प्रशासनाचा आणि शासनाची  यासंबंधी नियमावली असताना काम चुकारपणा करणार्या केडीएमसी प्रशासनाचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमी सुभाष गायकवाड यांनी दिली.

महाराजांच्या पुतळ्याभोवती अशाप्रकारे राजकीय झेंडे लावणे हे निंदनीय असून, या प्रकाराबाबत संबंधित प्रभाग अधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवप्रेमी श्याम आवारे यांनी दिली.

– कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता

महाराष्ट्रभरात लोकडाऊन १५ जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली असून मॉल आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ ५ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोवीड रुग्णसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आता केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. १ जुन सकाळी ७ वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल. दुपारी ३ नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार. कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.

कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यँत सुरू राहतील. दुपारी २ नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे २  नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने (मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार असून  यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील असे आदेश केडीएमसी प्रशासनाने काढले आहेत.

  • कुणाल म्हात्रे
नवीन दुर्गाडी पुल आज पासून वाहतुकीसाठी खुला ; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ऑनलाईन तर पालकमंत्र्यांच्याहस्ते फीत कापून लोकार्पण

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेनचे अखेर आज लोकार्पण करण्यात आले असून गेल्या काही वर्षापासून भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन तर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

कल्याण भिवंडी शहराला जोडणारा तसेच ठाणे, मुंबईकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा मनाला जातो. कल्याण शहरासह आसपासच्या शहरातील हजारो नागरिक याचा वाहतुकीसाठी वापर करतात. मात्र वाहतुकीसाठी वापरत असलेला पूल अपुरा पडत असल्याने तब्बल ६ वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली. अखेर आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा करावा लागणारा सामना आता थांबणार आहे.

जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. आज यापैकी नविन दोन लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या चार लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नविन आणि २ जुन्या अशा एकूण ८ लेन नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, केडीमसी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उदघाटन प्रसंगी सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सकाळी पूलाचा पाहणी दौरा केला. यावेळी पूल बांधण्यासाठी परवानगी आणि निधी माझ्या कार्यकाळात मंजूर झाला. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होणेसाठी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला. असे असताना देखील या उद्घाटन सोहळ्यात साधे निमंत्रण देखील दिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुणाल म्हात्रे

खेदजनक : गेट उघडण्यास उशीर झाला म्हणून बुलेटच्या चैनने वोचमनला मारहाण

सोसायटीचे गेट उशिरा घडल्याचा रागातून एका तरुणाने वोचमनला बुलेटच्या चैनने मारहाण केल्याची खेदजनक घटना कल्याण मध्ये घडली आहे. कल्याण पूर्व चिंचपाडा रोड भागातील रंजना अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली आहे.

रंजना अपार्टमेंटमध्ये राहणारा स्टॅलिन नावाचा इसम दररोज रात्री उशिरा मध्यपान करून येत होता. यामुळे वोचमनला गेट उघडण्यास उशीर झाला होता. या रागातून रात्री स्टॅलिनने वोचमन मुकेश थापा यास शिवीगाळ केली होती. यानंतर सकाळी त्याने रात्रीचा राग काढण्यासाठी या वोचमनला चक्क बुलेटच्या चैनने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याची आई मध्ये येत होती मात्र तो तिलाही जुमानत नव्हता. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पसरत असून स्टॅलिन सारख्या प्रवृत्ती बद्दल कठोर भूमिका घ्यावी असे म्हटले जात आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या व्हिडीओची दखल घ्यावी अशी मागणी समाजा कडून व्यक्त केली जात आहे.

पहा या घटनेचा व्हडिओ :-

घराच्या वाटणीच्या वादातून भावाने घेतला भावाचा जीव ; उल्हासनगरमध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा

घराच्या वाटणीत हिस्सा मिळत नाही. याला भाऊ जबाबदार असल्याच्या समजूतीतून भावानेच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

उल्हासनगर कँम्प क्र. -१ येथील भिमनगर परीसरात विठ्ठल कदम यांचे वडलोपार्जीत घर आहे. तिथं त्यांची आई जनाबाई कदम रहातात. या घराची वाटणी कर आणि मला त्यातील हिस्सा दे अशी मागणी करत मुलगा संतोष हा आईमागे तगादा लावत होता. याबाबत जनाबाई यांनी आपल्या मुलाला म्हणजेच फोन वरुन सांगितले. त्यानंतर विठ्ठल कदम आणि त्यांचा मुलगा विशाल याने संतोष पांडूरंग कदम याला समजविण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईच्या प्रॉपर्टीत भाऊ विठ्ठल हा बाधा आणत असल्याच्या समजूतीतून वाद निर्माण झाला. या वादात संतोष कदम याने विठ्ठल कदम याच्या डोक्यात लोंखडी सळईने आघात करुन त्याचा खून केला.

हि घटना उल्हासनगर खेमानी परीसरात घडली. याबाबत विशाल विठ्ठल कदम यांच्या फिर्यादी वरुन खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उल्हासनगर पोलिसांनी सदर घटनेचा तत्काळ तपास करत आरोपीला अटक केली आहे. असे उल्हासनगर झोन ४ उपायुक्त यांनी सांगितले.