आधारवाडीतील रहिवाशी लवकरच घेणार मोकळा श्वास ; आधारवाडी डंम्पिग ग्राऊंडवर कचरा टाकणे केले बंद

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद होण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेरीस हि प्रतीक्षा संपली असून या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे.

२५ मे २०२० रोजी शून्य कचरा मोहीम राबविण्यास प्रारंभ झाल्यापासून वर्षपूर्ती नंतर आता आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये कोविड साथ सुरू असताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी त्यांचे विभागामार्फत शून्य कचरा मोहीम २५ मे २०२० पासून राबविण्यात सुरुवात केली. कोविड कालावधीत हि मोहीम राबवताना सुरुवातीला नागरिकांकडून, लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, परंतु उपायुक्त कोकरे यांनी त्यांच्या घनकचरा विभागातील पथकामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी २०० कार्यशाळा, ५० व्हिडिओ कॉन्फरन्स आणि १० वेळा फेसबुक वर लाईव्ह जाऊन नागरिकांशी संवाद साधला होता.

त्याच प्रमाणे घनकचरा विभागामार्फत गृहनिर्माण सोसायटी मध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथे मिटिंग्स आयोजित करून त्यांना कचरा वर्गीकरण करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच महानगरपालिकाकडे असलेली कचरा संकलनाची वाहने व कर्मचारी यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात येऊन आठवड्यातील रविवार, बुधवार या दोन दिवशी फक्त सुका कचरा उचलण्याची पद्धत अवलंबण्यात आली. ओला कचरा आणि सॅनेटरी नॅपकिन हे दररोज उचलण्यात येऊ लागल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुलभ झाले.

प्लॅस्टिक वर मिळवले नियंत्रण :-

प्लास्टिक हे पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्यामुळे स्वच्छता मार्शल यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. त्याच प्रमाणे दर रविवारी प्लास्टिक संकलन केंद्रामार्फत प्लास्टिक संकलनाची व्यवस्था करण्यात आली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिला रविवारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दुसरा रविवारी कापड, गाद्या, जुने कपडे, तिसरा रविवारी काच व कागद, चौथा रविवारी चप्पल बूट फर्निचर इत्यादी वस्तूंच्या संकलनासाठी संकलन केंद्र तयार करण्यात आले. ५ किलो प्लास्टिक च्या बदल्यात एक वेळेची पोळी-भाजीची अभिनव संकल्पनादेखील महापालिकेमार्फत सुरु करण्यात आली. या सर्व बाबींमुळे प्लास्टिकवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळाले आहे.

शहरातील कचऱ्याचे आता काय होणार ?

शहर अभियंता सपना देवनपल्ली (कोळी) व कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्या विशेष प्रयत्नांतून महापालिकेमार्फत आता उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला असून बारावे येथे २०० मेट्रिक टन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तसेच बारावे येथे प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प ही सीएसआर फंडातून तयार करण्यात आला आहे. बारावे येथे सुरू असलेल्या २५ मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पापासून सीएनजी गॅस तयार करण्याच्या प्रकल्पालाही चालना देण्यात आली आहे. आयरे, उंबर्डे, कचोरे व बारावे येथे १० टन क्षमतेने बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

क.डों.म.पा. कचऱ्यापासून मिळवते रॉयल्टी :-

महापालिका क्षेत्रात काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांचा कचरा त्यांच्या आवारात जिरवून त्याच्यापासून खत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांना मालमत्ता करांमध्ये ५ % सूट देण्यात येत आहे. सध्या महापालिका क्षेत्रात जवळ जवळ ८०-९० % कचऱ्याचे वर्गीकरण होत असून सुका कचरा हा कचरा संकलन केंद्राकडे पाठवण्यात येत असून त्यामधील सुका कचरा रिसायकलिंग अंती वापरण्यात येत आहे. उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामधून आज पर्यंत ३००० मेट्रिक टन इतक्या खताची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात सुका कचरा संकलन करण्या-या संस्था सध्या कार्यरत असून त्यांचेकडून सुका कचरा उचलण्याच्या मोबदल्यात आता पर्यंत रु.३ लाख इतकी रॉयल्टी महापालिकेस प्राप्त झाले असून अशा प्रकारे कच-या पासून रॉयल्टी मिळणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे.

खासदार, आमदार, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, स्वच्छ डोंबिवली मंच व इतर विविध सामाजिक संस्था, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचे नागरिक यांच्या मधील योग्य समन्वयाने हे शक्य झाले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

कुणाल म्हात्रे

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योगपतीने घेतली ‘रॉल्स रॉयस’ कार ; किंमत ऐकून हादराल

कल्याणचे प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांनी नुकतीच एक कार खरेदी केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही असेच आहे. कारण ही काही साधी सुधी कार नसून ‘रॉल्स रॉयस’ कंपनीची कार आहे. ही कार अत्यंत दुर्मिळ असून जगात खूप कमी लोकांकडे ही कार आहे. संजय गायकवाड यांनी हीच कार कल्याण या ऐतिहासिक शहरामध्ये आणली आहे.

संजय गायकवाड हे गेली ३० वर्षांपासून उद्योजक म्हणून कल्याण शहरात ओळखले जात आहेत. ‘गौरीविनायक बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स’ चे ते मालक असून या शहरात त्यांनी अनेक इमारती उभारल्या आहेत. एक उद्योजक आणि दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. २४ मे रोजी त्यांनी ‘रॉल्स रॉयस घोस्ट’ ही कार घरी आणली. मुळात ‘रॉल्स रॉयस’ कार ही प्रत्येकाच्या स्वप्नात असते परंतु ती अत्यंत दुर्मिळ कार असून डोळ्यांना रस्त्यावर दिसली तरी खूप मोठी गोष्ट आहे. संजय गायकवाड यांनी ८ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजून ही कार कल्याण शहरात आणल्याचे समजते. अर्थातच कार दुर्मिळ असल्याने तिची किंमत देखील तितकीच मोठी आहे. आणि ती आता कल्याणच्या रस्त्यांवर धावताना देखील दिसणार आहे.

भारतात लेम्बॉरगिनी,बुकाटी, टेस्ला,जेगवार अशा गाड्यांचा क्रेज तर आहेच पण ‘रॉल्स रॉयस’ ही कार जगभरातील सर्वात रॉयल कार मानली जाते असं अनेकांच्या तोंडून तुम्ही नक्की ऐकले असेल. या कारचा इतिहास देखील तसाच आहे. तुम्ही इंटरनेट वर अधिक माहिती घेऊन कारचा इतिहास नक्की पहा. परंतु या कार बाबतची भारतातील एक रंजक कथा देखील तितकीच चर्चेत आहे.

राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’

भारतातील एक राजा नाव जयसिंग लंडनमध्ये सकाळी फेरफटका मारीत होता. याचवेळी त्याला ‘रॉल्स रॉयस’ चे शो रूम नजरेस पडले. परंतु अंगावरील कपडे पाहून आणि तेथील कर्मचाऱ्यांनी त्या राजाला तिथून हटकले. त्यानंतर तो राजा हॉटेल वर आला आणि राजेशाही थाटात पुन्हा त्या शो रूम वर आला. त्याला पाहून तेथील कर्मचारी आवक झाले आणि त्यांनी राजा जयसिंग यांचं राजेशाही थाटात स्वागत केलं. राजा जयसिंग यांनी तिथे उभ्या असलेल्या सहा कार खरेदी करून भारतात नेल्या. तेथील नगरपालिकेला या गाड्या त्यांनी दिल्या आणि गाडीतून शहरातील कचरा साफ करण्यास सांगितले. ‘रॉल्स रॉयस’ गाडी भारतात कचरा उचलण्यास वापरली जाते ही बाब जगभरात पसरली आणि या गाडीचा खप कमी झाला. त्यामुळे कंपनीने राजा जयसिंग यांची माफी मागितली आणि सहा गाड्या भेट म्हणून पाठवून दिल्या. माफी मागितल्या नंतर राजा जयसिंग यांनी देखील कचरा उचलणे बंद करण्यास सांगितले. आणि त्यानंतर ‘रॉल्स रॉयस’ आजपर्यंत जगातील नंबर वन कार म्हणून ओळखली जाते. राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’ ही कथा भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. या गाडीचे चाहते इतके आहेत की एका सरदाराने १ नव्हे १० गाड्या खरेदी केल्या आहेत.

– Santosh Diwadkar 8767948054

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यां समवेत मलंगगड ग्रामीण भागात पाहणी दौरा

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. या चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या समवेत या भागात पाहणी दौरा केला.

तौक्ते वादळाने राज्यातील काही भागात थैमान घातले होते. या वादळाने अनेकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवी म्हणून ठाणे जिल्ह्याचे पालमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मलंगगड ग्रामीण भागात पाहणी दौरा केला. आणि गावोगावी भेटी देत शेतकऱ्यांशी चर्चा केल्या.

वादळीवार्याने शेलारपाडा गावातील प्रमोद दाभणे यांच्या घरावरचे छप्पर उडून गेले. अशावेळी शेलारपाडा गावातील एका ग्रुप ने संकटकाळी धावून मदतीचा हात पुढे केला. या वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याने तात्काळ ‘दाभणे मास्टर ग्रुप’ ने मदतीचा हात पुढे करत प्रमोद दाभणे यांना पत्रे बसवून देऊन तात्काळ मदत केली. या अगोदर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील रस्ता स्वखर्चाने तयार केला होता. तर आता नव्याने संकट येताच ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभणे, पोलीस पाटील समीर दाभणे, मा.सदस्य धनाजी दाभणे यांच्या नेतृत्वात ‘दाभणे मास्टर ग्रुप’ हा वेळेला धावून येण्याची भूमिका बजावताना दिसत आहे. अश्याच संकटकाळी गरजुंना मदतीसाठी धावून येऊ असे या ग्रुपमधील युवा सदस्य संदेश दाभणे यांनी सांगितले आहे.

परराज्यातून कल्याण डोंबिवलीत येणा-या नागरिकांना ॲन्टीजेन टेस्ट शिवाय एन्ट्री नाही ; महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची सख्त भूमिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांनी अगोदर ॲन्टीजेन टेस्ट करावी मगच शहरात यावे अशी सख्त भूमिका पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. असे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी आज दिली आहे.

परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक
कोणत्याही प्रकारची कोविडची टेस्ट न करताच शहरात दाखल होत असल्याची बाब निदर्शनास येताच आज महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याचे वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. ११ एप्रिल रोजी २४०० पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २०० पर्यंत आलेली आहे. आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन यांचे समवेत पाहणी करून परराज्यातून येणाऱ्या तसेच प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. कल्याण रेल्वे स्थानकावर आता ३ ते ४ ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असे ते पुढे म्हणाले.

‘ब्रेक द चेन’ च्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना शहरात घेतले जाईल. तसेच “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे असेही उद्गार रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी यावेळी काढले.

या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, आरपीएफ कमांडंट शहेनशहा, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर ,स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन,महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील,क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असाच काहीसा उपाय सुचवला होता. असाच पेटर्न आता कल्याणमध्ये आयुक्त विजय सूर्यवंशी राबवत आहेत असे म्हणता येईल.

रस्त्यावर बेफिकीरपणे मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाया सुरू करा ; क.डों.म.पा. आयुक्तांचे निर्देश

कल्याण-डोंबिवली महापालिका परीक्षेत्रात येत्या १५ दिवसात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणेबाबत आज सकाळी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकाना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अशा बेफिकीर लोकांवर कारवाया देखील सुरू करा असे निर्देश आता महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी. असे डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यामुळे सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी. अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.

सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे त्यामुळे १५ दिवस सर्वांनी कडक लॉकडाउनचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. सकाळी ११ नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी असेही ते म्हणाले. वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या विभागात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाहणी करावी. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.

लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते. अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल तर ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे सदर भाजी मार्केट चे नियोजन अन्यत्र विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर रेस्टॉरंट मध्ये लोक उभे राहून खातांना दिसून येतात. तसेच स्टेशनबाहेर सकाळी ११ नंतर देखील फेरीवाले दिसून येतात अशी माहिती सहा.आयुक्त अनिल पोवार यांनी दिली असता रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले . ११ एप्रिलला रुग्ण संख्या २४०० झाली होती. आता आठवड्याभरात दिवसाला ५०० पर्यंत खाली आली. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात रुग्ण संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. सकाळी ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.

सदर बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कल्याण परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण व डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, परिमंडळ – ३ अंतर्गत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

“मला कोविड सेंटरमध्ये बिनपगारी काम द्या” – पत्रकाराची प्रशासनाकडे अजब मागणी

मुरबाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरम्यान याच तालुक्यातील पत्रकार जीवन शिंदे यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्याची मागणी प्रशासनाकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. मला मानधन दिले नाही तरी चालेल पण सेवेत घ्या असेही त्यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. मात्र पत्रकार जीवन शिंदे यांच्या या अजब मागणीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याचबरोबर मृत्युदर देखील चिंतेचा विषय बनू लागला आहे. व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर या सर्व समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मुरबाडचे पत्रकार जीवन शिंदे यांनी मुरबाड तहसीलदार, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये काम मिळावे अशी मागणी केली आहे. याचबरोबर मी विना मोबदला काम करायला तयार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. एक पत्रकार कोविड हॉस्पिटलमध्ये विना मोबदला काम करण्याची का इच्छा करतोय ? या विचारात प्रशासनातील एक वर्ग पडला असल्याचे सध्या दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्तर प्रशासनाने जीवन शिंदे यांना अध्याप दिलेले नाही. पत्रकाराची मागणी ही प्रशासना समोर एक प्रकारचे आव्हानच असेल असा सूर समाज माध्यमांवर लावला जातोय.

मृत्यू दर वाढण्याला ‘या’ दोन गोष्टी कारणीभूत; भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली क.डों.म.पा. आयुक्तांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज क.डों.म.पा. क्षेत्रातील काही रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या नंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मृत्यू दर वाढण्याबाबत कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते सांगितले. त्याचबरोबर राज्यसरकारवर टीकास्त्र डागले.

क.डों.म.पा. क्षेत्रात कडक निर्बंधांनंतर कोरोना काहीसा आटोक्यात येत असल्याचे आकडे सांगत आहेत. मात्र मागील महिन्याभरा पासून मृत्यू दर हा काहीसा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णांना जाणवणाऱ्या समस्यां बद्दल त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा ५०% होत आहे आणि रेमडेसिवीरचा पुरवठा २५% होत आहे. ही दोन कारने मृत्यू दर वाढण्याला जबाबदार आहेत असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज (दि.२९ एप्रिल २१) रोजी १० रुग्ण दगावले आहेत. तर ८३५ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याच बरोबर १५४६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या आकडेवारी नुसार सध्या महापालिका क्षेत्रात एकूण १२७३४ संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

वांगणीच्या मयुरची कल्याण पूर्व आमदारांनीही घेतली भेट

मागील काही दिवसांपूर्वी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाचे प्राण वाचवणारा युवक आज देशभरात गाजत आहे. मयूर शेळके या युवकावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील आज मयुरची भेट घेतली. तसेच त्याला बक्षीस स्वरूपात एक धनादेश देखील सुपूर्द केला.

एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा ट्रेक वर पडला. त्याचवेळी एक एक्स्प्रेस तिथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने या मुलाचे अतिशय फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र अशाही परिस्थितीत मयूरने त्याचे प्राण वाचवले.

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी आज मयुरची भेट घेतली. त्याने केलेल्या कामगिरी बद्दल स्वतः आमदारांनी त्याची भेट घेऊन त्याच्याशी बातचीत देखील केली. तसेच त्याचा सन्मान करीत त्याला शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आमदारांनी मयूरला एक धनादेश बक्षीस म्हणून सुपूर्द केला. अश्या माणसांचे कौतुक करावे तितकेच कमी अशी भावना कल्याण पूर्व आमदारांनी भेट नंतर व्यक्त केली.

“मयूर शेळके याने केलेले धाडस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्याने केलेल्या शौऱ्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत. मयुरचा या अद्भुत कामगिरी आणि पराक्रमाबद्दल त्याची भेट घेऊन त्याला सन्मानित करण्यात आले.”

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)

मयूर शेळके याला रेल्वे कडून देखील ५०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनद्वारे त्याच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मयुरची भेट घेत सन्मान केला. जावा कंपनीने देखील मयुरला एक बाईक गिफ्ट केली आहे. व त्यानंतर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील मयुरला सन्मानित केले आहे. त्यामुळे मयूरच्या सन्मानासाठी सर्वच राजकीय पक्ष, उद्योजक तसेच संस्था पुढे सरसावताना पाहायला मिळाले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आठवड्याभरात कोरोनाने ‘इतके’ मृत्यू

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पुन्हा उसळी घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या आठवड्यात रविवार दि.१८ एप्रिल ते शनविवर दि.२४ एप्रिल पर्यंत ५८ रुग्ण कोरोनाने दगावल्याची नोंद झाली असून ही चिंतेची बाब बनली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यसरकारने ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रभर कडक निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी विशेष काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, इंजेक्शन आणि आता तर लसींचाही तुटवडा भासू लागलेला आहे. अशातच क.डों.म.पा. क्षेत्रात मृत्यू दर देखील हळूहळू वाढू लागला आहे. कोरोना आजार बरा होण्याचे प्रमाण जास्त असले तरी नागरिकांनी लक्षण जाणवताच फार वेळ न घालवता चाचणी करून उपचार सुरू करावे असे आवाहन आता काही डॉक्टर देखील करीत आहेत.

साधारण वर्षभरापासून महानगरपालिका क्षेत्रात दिवसाला ५ पेक्षा कमी रुग्ण दगावत होते. काही दिवशी एखादा रुग्ण तर काही दिवशी पाच. तर असेही काही दिवस होते ज्यादिवशी एकही रुग्ण दगावला नसेल. मात्र आता दिवसाला १० पेक्षा अधिक रुग्ण दगवण्याचे चित्र दिसू लागले आहे.

आठवड्याभरात दगावलेले रुग्ण :-

दि.१८ रविवार – ५ रुग्ण
दि.१९ सोमवार – ७ रुग्ण
दि.२० मंगळवार – ६ रुग्ण
दि.२१ बुधवार – ८ रुग्ण
दि.२२ गुरुवार – ९ रुग्ण
दि.२३ शुक्रवार – १२ रुग्ण
दि.२४ शनिवार – ११ रुग्ण

क.डों.म.पा. क्षेत्रात याच आठवड्यात जितक्या लोकांना कोरोनाची लागण झाली तितकेच प्रमाण बरे होणाऱ्या रुग्णांचे देखील आहे ही बाब दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दिलासादायक ! कल्याण डोंबिवलीत चार दिवसांत ७५२२ रुग्णांना डिस्चार्ज

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा आकडा कडक निर्बंधांनंतर काहीसा वधारलेला दिसत आहे. दिवसाला २ हजारांपर्यंत जाणारी रुग्णसंख्या साधारण १२०० पर्यंत आटोक्यात येत आहे. याहून दिलासादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७५२२ रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र भरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना व सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नेमून दिलेली वेळ देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश प्रशासनाला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा अधिक होत आहे.

मागील चार दिवसांत एकूण ७५२२ रुग्ण बरे झाले आहेत. या तुलनेत ५५७३ नव्या रुग्णांची नोंद चार दिवसांत करण्यात आली आहे. तर कोरोनाने महापालिका क्षेत्रात ३० लोकांचा जीव याच चार दिवसांत गेला आहे. या सर्व आकड्यांबरोबर आजच्या घडीला महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४२५१ रुग्ण आता उपचार घेत आहेत. अनावश्यक कारणासाठी फिरणे टाळा, मास्क आणि सेनीटायजरचा वापर करा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन क.डों.म.पा.च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.