कल्याणमधील प्रलंबित आमराई – तिसगाव रस्ता डांबरीकरणाला सुरुवात

कल्याण पूर्व भागात अंतर्गत रस्ते रुंदीकरण होणे तसेच दुरुस्ती होणे सध्या फार गरजेचे ठरत आहे. मुख्य रस्ता ते अंतर्गत रस्ते कनेक्टिव्हिटी समाधानकारक नसल्यामुळे वाहतूक कोंडीला कल्याण पूर्वेच्या जनतेला नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

प्रभाग क्रमांक १०० तिसगाव गावठाणचे मा. नगरसेवक देवानंद गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक ८८ संतोष नगरचे मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी आमराई ते तिसगाव पर्यंत जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासन व आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. चिंचपाडारोड, विजय नगर मार्गे आता शंभर फुटी रोड तसेच तिसगाव गावठाणात जाणे आता या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सोयीस्कर होणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असली तरी कल्याणमधील अनेक ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण होत असल्याने नागरिकांना यातुन दिलासा मिळतोय.

क.डों.म.पा. आयुक्तांचा व्यापाऱ्यांना दिलासा. – निर्बंधांमध्ये केले नवे बदल

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १० मार्च रोजी निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या कानावर आल्या. यातून व्यापार्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी त्यांनी निर्बंधात नवे बदल केले आहेत.

कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा दिवसाचा आकडा १०० च्या आत येत असताना अचानकच तो ४०० पर्यंत जायला लागल्याने आयुक्तांनी कडक निर्बंध लादले होते. यानुसार दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात बंद ठेवण्यास संगीतले होते. परंतु यामुळे व्यापारी वर्गात संतापाची आणि चिंतेची लाट उसळली. दुकानभाडे,घरखर्च अशा सर्व चिंता त्यांना लागून होत्या. हि बाब लक्षात घेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी निर्बंधात बदल करून व्यापार्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

सकाळी १० नंतर व्यापार्यांना दुकान उघडायची वेळ निश्चित करून दिली आहे. पूर्वीची वेळ सकाळी ७ होती. ज्याचा कोणताही फायदा व्यापारी वर्गाला होत नव्हता. नव्या बदलानुसार व्यापारी आता सायंकाळी ८ वाजेपर्यंत आपले दुकान उघडे ठेऊ शकतात. वेळेच्या निर्बंधातून जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने जसे कि भाजीपाला,फळे,किराणा,दुध आदी वगळण्यात आली आहेत. तर बाकी निर्बंध तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत.

क.डों,म.पा. क्षेत्रातील निर्बंध

  • सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत दुकाने चालू (जीवनावश्यक सेवांची दुकाने )
  • खाद्यपदार्थ व खाद्यपेय हातगाड्या तसेच फेरीवाल्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी.
  • शनिवार-रविवार P1-P2 नुसार दुकाने चालू (पालिका व पोलिसांचे नियोजन).
  • आठवडे बाजार बंद.
  • खाद्यगृह, रेस्टॉरंट आणि बार, ज्यूस व आईस्क्रीम पार्लर, परमिट रूम, पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत ५०% क्षमतेने सुरु.
  • जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापार्यांनी गर्दी होऊ न देणे, कोरोना पासून बचावाची साधने वापरणे तसेच स्वच्छता राखणे अनिवार्य असेल.
  • रिक्षातून प्रवास करताना फक्त दोनच प्रवासी बसवण्याची मुभा.
  • सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • लग्न समारंभ व इतर कार्यक्रम कोरोना नियमांना अनुसरून व्हावेत. याबाबतीत आयोजकांनी प्रभागक्षेत्र कार्यालय व पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य. समारंभाचे चित्रीकरण करण करून ते स्वतः जवळ ठेवणे. तसेच पालिका प्रशासन व पोलीस स्टेशनला प्रत उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
  • जिम,स्पोर्ट्स क्लब,खेळाची मैदाने,उद्याने,स्विमिंग पूल फक्त वैयक्तिक सरावासाठी खुले.  स्पर्धा आणि इतर कार्यक्रमास परवानगी नाही.

अशा प्रकारचे निर्बंध सध्या महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आले असून उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येईल. १५ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात एकूण २३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तिघे जन कोरोनाने दगावले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात एकूण ३०६८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून कोरोनावर नियंत्रण येई पर्यंत हे निर्बंध सुरु असणार आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रातील कोरोना आकडा पुन्हा चार अंकी – कल्याणचे खासदारही कोरोना पोजिटिव्ह

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.

वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत येत दोन अंकी झाला होता. तर एकूण कोरोना रुग्ण हे तीन अंकी म्हणजे १००० च्या आत आले होते. मात्र आता या महापालिका क्षेत्रात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत २०० चा आकडा देखील पार झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी १७८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर महापालिका क्षेत्रात आता सध्याच्या घडीला म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत १६४६ एक्टिव्ह कोरोनारूग्ण आहेत. हा चार अंकी आकडा पुन्हा तीन अंकी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त गरजेचं असणार आहे.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील मागील दोन-तीन दिवस त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. १ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती आपल्या फेसबुकद्वारे दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून जे माझ्या संपर्कात आले त्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी आता केलं आहे.

मास्क कारवाईत पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ – दोघांवर गुन्हा दाखल

विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एकाच कुटुंबातील पाच जनांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू – मुळशी तालुक्यातील घटना

मुळशी तालुक्यातील वाळेण गावात वळकी नदीच्या डोहात रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच जणांना जलसमाधी मिळाली. आईला वाचवण्यासाठी उडी मारलेल्या तिन्ही मुलींसमवेत पतीचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण कुटुंबाला मृत्यूने कवटाळले. या घटनेनंतर संपूर्ण मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास लायगुडे कुटुंब कपडे धुण्यासाठी वळकी नदीच्या डोहावर आले होते. याच दरम्यान कपडे धुवत असतानाच काळाने घावा घातला आणि दुर्दैवी घटना घडली. पौर्णिमा शंकर लायगुडे ही महिला कपडे धुवता धुवता पाण्यात पडली. आपली आई पाण्यात पडली हे पाहून तिच्या तिन्ही मुली. अर्पिता, अंकिता, राजश्री या तिघींनीही पाठोपाठ पाण्यात उड्या घेतल्या. दुर्दैवाने कुणालाही पोहता येत नव्हते. परंतु जन्मदात्या आईसाठी या तिन्ही मुलींनी पाण्यात उड्या घेतल्या आणि जीवनाशी संघर्ष सुरू झाला. आपले कुटुंब पाण्यात बुडतय हे पाहून या मुलींचे पिता शंकर दशरथ लायगुडे यांनी देखील पाण्यात उडी घेतली. संपूर्ण कुटुंब वळकी नदीच्या पाण्यावर हातपाय हलवत होत. पण वळकी नदीन डोळे मिटले आणि संघर्ष संपला. एकामागोमाग एक करत पाचही जणांना वळकी नदीन कवेत घेतलं आणि होत्याच नव्हतं झालं. क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबाने जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर वाळेन गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी धाव घेतली. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाळेन गावासह संपूर्ण मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘अहो नगरसेवक कोणे ?’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समोर राजू पाटील यांनी व्यक्त केला मनसे नगरसेविकेचा अभिमान

उल्हासनदी बचाव मोहिमेला सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर यांच्याशी उल्हासनदी प्रश्नावर चर्चा केली. शिवाय मनसे पक्षाचा जाहीर पाठिंबा देखील दर्शवला.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. याच वेळी जवळच्याच भागातील मोहने कोळीवाडाच्या मनसे नगरसेविका सुनंदा कोट देखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी राजू पाटील यांना राहुल कोट यांनी प्रभागात येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत “तुमच्या प्रभागात छान आहेत रस्ते” असे म्हणत राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कामाची पोचपावती दिली. याचवेळी आंदोलनकर्ते तसेच शिवसेना पदाधिकारी कैलास शिंदे यांनी देखील त्यांचा प्रभाग स्वच्छ असल्याचे सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी लगोलगच “अहो नगरसेवक कोणे?” असा असा प्रश्न शिंदे यांना करीत मनसे नगरसेविकेचे कौतुक केले.

सुनंदा कोट या क.डो.म.पा. तील १० नगरसेवकांपैकी १ आहेत. त्यांचे पुत्र राहुल कोट हे देखील मनसेचे पदाधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली होती तसेच कोरोना काळातही त्यांनी लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. याचीच पोच पावती म्हणून मनसेच्या आमदारांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला असल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगतात.

व्हिडीओ पहा

‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.

उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्र.क्र.९० चिकणीपाडा येथे माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड या गेली पाच वर्षे प्रभाग क्रमांक ९० चिकणीपाडाच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. संगीता गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल – रिसर्च सेंटर, तेरणा डेंटल कॉलेज व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आयोजित शिबिराचा लाभ प्रभागातील असंख्य नागरिकांनी घेतला. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, दातांची तपासणी, विविध आजारांची तपासणी केली गेली. या नंतर हृदय,अन्ननलिका,एपेंडीक्स,कॅन्सर,यकृत,मणके,किडनी,मुतखडा,गर्भाशय,हाडांचे फ्रॅक्चर अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. प्रभागातील गरीब नागरिकांसाठी हे शिबीर लाभदायक ठरले असल्याचे नागरिक सांगतात. तसेच गरजू व गरजू लोकांसाठी असे शिबिर आयोजित करायलाच हवे असे मत प्रभागाच्या तत्कालीन नगरसेविका संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले.

संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेना शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, युवासेना शहर अधिकारी संजय मोरे, सागर घायवट, वैशाली पेटकर, सचिन राणे, सुरेश काळे, विवेक बर्वे, निंबाळकर, सूरज विर, संतोष दिघे, छबुताई रणसिंगे आदी महिला आघाडी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे कामगारांनी लावलेल्या नायलॉन सदृश रश्शीमुळे दोघांचा गळा चिरून मृत्यू – कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतील घटना

कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.