रेल्वे कामगारांनी लावलेल्या नायलॉन सदृश रश्शीमुळे दोघांचा गळा चिरून मृत्यू – कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतील घटना

कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.

कल्याणमध्ये आंदोलनातून मनसेने दाखवली ताकद

क.डों.म.पा.ची निवडणूक महिन्याभरावर आलेली असताना शहरात राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपआपला जोर दाखवू लागले आहेत. मनसेने देखील डोंबिवलीत दोन झटके झेलल्यानंतर कल्याणमध्ये आंदोलनाच्या मार्फत शक्तीप्रदर्शन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण-डोंबिवली शहराच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि वाढीव वीजबिल विरोधात महामोर्चा आयोजित केला होता. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यलयाला भेट दिली. डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज घरत तसेच कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनसेचे काही नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात एकवटले होते.

शहरात होणार्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष तयार असल्याचा इशारा मनसेने विरोधकांना दिलाय का ? असाही सवाल या आंदोलनातील शक्तीप्रदर्शनातून व्यक्त केला जातोय.

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.

बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.

वाह ! कंपनीचा कामगारच निघाला चोर. – बदलापूर पोलिसांचा पाच तासात शोध

बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात ४ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पाच तासांच्या आतच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. यात आरोपी कंपनीतलाच कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरियर कंपनीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. कंपनीत शिरून अज्ञात चोरट्यांनी २,४५,७०५ रुपये असलेली लोखंडी तिजोरी लंपास केली. शिवाय चोरीचा सुगावा न लागावा यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज जिथे सेव्ह होते ती २००० रुपये किंमतीची डिव्हीआर मशीन देखील काढून नेली. चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी अथक मेहनत घेतली आणि चोरांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर गुप्त माहीतगारा कडून पोलिसांनी माहिती मिळवली आणि काही तासांतच पाच आरोपींचा शोध लावला. त्यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या कडून तिजोरी हस्तगत करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंपनीतील ३५ कामगारांची चौकशी केली. यातील एका कामगारावर पोलिसांना संशय बळावला. अधिक सखोल तपास केला असता या चोरीशी त्याचा सबंध असल्याचे उघड झाले. तो याच कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. कंपनीतील सर्व माहिती त्याला असल्याने त्याने बाहेरील साथीदारांना सोबत घेऊन कट रचला आणि चोरी केली. परंतु हि चोरी आता उघड झाल्याने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

गुन्ह्यातील आरोपींवर बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात भा.दं. वि. कलम ३८०,४५४ व ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरेंमुळे महापालिकेत कॅबिन मिळाली आणि आता पक्ष सोडला. – नव्या शहराध्यक्षाची घणाघाती टीका.

डोंबिवलीत मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना मनसेच्या नव्या डोंबिवली शहराध्यक्षांनी मनसे सोडलेल्यां वर घणाघाती टीका केली.

मागील आठवड्यात डोंबिवली मध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसल्याचे पहायला मिळाले. एक म्हणजे शहराध्यक्ष पद सोडून राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.

डोंबिवलीत पार पडलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलताना मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर नाव न घेता सडकून टिका केली. जे गेले त्यांनी स्वतःचा इमान विकला आहे. त्यांनी स्वतःला विकलंय असे त्यांनी आरोप केले. तर राज साहेबांमुळे ज्यांना इतके वर्ष महापालिकेत केबिन मिळाली ते देखील स्वार्थीपणे सोडून गेलेत. आपण इमान विकायचा नाही असा घणाघाती आरोप त्यांनी मनसे सोडून गेलेल्यांवर केला आहे. डोंबिवलीत आयोजित पक्षाच्या मेळाव्यातून ते बोलत होते. मनोज घरत यांची नियुक्ती झाल्या नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीत पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय ? – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

डोंबिवली ग्रामीण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच समारंभाला मनसे नेत्या तसेच सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारला जाब विचारला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे आल्या होत्या. मात्र पत्रकारांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या आंदोलना बाबत विचारले असता शालिनी ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना सवाल केले आहेत.

शुक्रवारी भाजपाने वाढीव वीजबिल कमी करण्यासाठीच्या मुद्द्यावर राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. तर शिवसेनेने देखील वाढीव इंधनदर आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तरीही आंदोलन करीत आहेत. यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे ? हे प्रश्न सोडवायचे सोडून एकमेकांवर लादत आहेत. असा आरोप व सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केल्या. डोंबिवलीतील आयोजित मनसेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.