KDMT : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस सध्या नवी मुंबई मार्गावर यशस्वी व प्रवाशांना सोयीस्कर अशी धाव घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी युवासेनेचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळेल असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल. ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेवरचा भार काहीसा कमी होईल असे दीपेश म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.
कल्याण डोंबिवली शहरांत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरांवर येणाऱ्या लोंढ्यामुळे लोकसंख्या दुप्पटीने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला आहे. ज्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर अधिक होतो. त्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीतुन मानकोली पुलावरून मुंबई बससेवा सुरू केली तर नक्कीच सोयीस्कर बाब ठरू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
Dipesh Mhatre’s demand to start direct KDMT bus service from Dombivli to Mumbai