Ganesh Vidya Mandir : जून महिन्याच्या या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत समारंभ शाळेकडून करण्यात आला. कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही काहिसे असेच मजेदार स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून, कागदी टोप्या घालीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
एकेकाळी शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसतीच रडगाणी. परंतु आता बदलत्या काळानुसार पहिला दिवस म्हणजे फक्त नाचगाणी अशीच नवी प्रथा प्रचलित झाली आहे. गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षकांनी आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस चांगलाच मजेदार आणि अविस्मरणीय बनवला. लहान मुलांना आवडणारी गाणी लावून शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत थिरकू लागले. शाळेत संपूर्ण दिवसभर या विद्यार्थ्यांचा नुसता कल्ला सुरू होता. आपल्या आवडीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी चांगलाच ताल धरला होता. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे शिक्षक आणि नवे मित्र. एकंदरीतच सारे काही नवे नवे.
शाळेतील मुख्यद्यापीका ललिता मोरे यावेळी म्हणाल्या की, “पूर्वी असे काही नव्हते. शाळेच्या पहिल्या दिवशी छडी चालवायची नाही एवढेच आम्हाला माहीत असायचे. पण आता शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक सोहळ्या सारखा साजरा करण्याची पद्धत बनली आहे. खरेतर ही छान गोष्ट आहे, कारण हा दिवस पुढची दहा वर्षे म्हणजेच दहावीच्या निरोप समारंभा पर्यंत ही मुले लक्षात ठेवतील”.
Ganesh Vidya Mandir School welcomes first standard students with fun