Waldhuni Bridge : पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यातीलच एक असलेल्या वालधुनी पुलावर आता अवजड वाहनांना प्रवेश नसणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक विभागाच्या समन्वयातून हाईट बॅरियर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उंच अवजड वाहने या बॅरियर मधून जाऊ शकणार नाहीत. मालाची वाहतूक करणाऱ्यांची मात्र आता बऱ्यापैकी गैरसोय होणार आहे.
कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे. पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने वालधुनी पुलावरून वाहतूक करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीच विठ्ठलवाडी एसटी आगाराला आपली वाहने पत्रिपुलावरून नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटीची वाहतूकही या पुलावरून बंद करण्यात आली होती.
आता अवजड वाहनांचाही प्रवेश बंद केल्याने या कोंडीतून सुटका होते का हे पहावे लागणार आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केल्याने उल्हासनगर व कल्याण पूर्वेत जाण्या येण्यासाठी शहाड अथवा पत्रिपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.
Height barrier on Waldhuni Bridge; no entry for heavy vehicles