कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिली पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय दिला असून मनसेने या निर्णया विरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवू नये या आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व शाळांना देण्याच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी मनसेने कल्याण पूर्वेत एक एक शाळा पिंजून काढीत शाळेतील मुख्यध्यापकांना राज ठाकरेंचे पत्र दिले आहे.
इयत्ता पहिली पासूनच शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जावी अशी सक्ती शिक्षण मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला विरोध होत असल्यामुळे ही सक्ती हटवून शाळेने आपल्या मर्जीनुसार हिंदी शिकवावी असे सांगण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने आपल्या शाळेत हिंदी शिकवू नये याकरिता मनसेने सर्व शाळांमध्ये जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याचा धडाका लावला आहे. कल्याण पूर्वेतील मराठी, इंग्रजी अशा सर्वच माध्यमातील शाळांना मनसे कार्यकर्त्यांनी भेट देत निवेदन दिले आहे.
या अगोदर इ.पाचवी पासून अभ्यासक्रमात हिंदी आणली जात होती. आता पहिली पासूनच विद्यार्थ्यांना जर तीन तीन भाषा लादल्या तर त्या लहान मुलांसाठी जाचक ठरेल असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून उत्तरेकडील भाषा आहे त्यामुळे ती महाराष्ट्रात लादू नये. राज्यभाषा म्हणून मराठी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी या दोन भाषाच ठीक आहेत. परंतु उत्तरेकडील लोकांना इकडे येऊन महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीच इथे आतापासून हिंदी माथी मारली जातेय. त्यामुळे आपण आपल्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवू नये, मनसे तुमच्या सोबत असेल असे राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.
Hindi should not be taught! MNS’s letter to schools