कल्याण : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटक आरोपींच्या नातेवाइकांकडून हजारो रुपयांच्या मोबदल्यात त्या आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रासह बोगस जामीनदारांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे (Kalyan Crime) शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात टोळीतील ५ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.
महमद रफीक अब्दुल सत्तार शेख (रा. मालाड पुर्व, मुंबई ), जयपाल समाधान मजोगीरी (रा.धारावी मुंबई), संतोष कन्हैयालाल मौर्या (रा, विरार पुर्व), महमद हबीब महमद रफीक हश्मी (रा. जोगेश्वरी, पश्चिम), चंदु ऊर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर (रा. ज्युचंद्र, वसई पुर्व जि.पालघर), असे अटक केलेल्या टोळीचे नाव आहे.
डोंबिवली रेल्वे स्थनाकात एकाची हत्येप्रकरणी अटक आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी काही जण सोमवारी कल्याण न्यायालयात येणार असल्याची खबर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किशोर शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण न्ययालयात सापळा रचला होता. त्यावेळी डोंबिवली रेल्वेच्या परिसरात हत्या करणाऱ्या आरोपीला हि टोळी बनावट कागदपत्रासह बोगस जमीनदाराला घेऊन आली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आरोपीला जामीन देण्याआधीच न्यायालयाच्या आवारात झडप घालून बनावट दस्तऐवजासह ताब्यात घेतले.
या टोळीतील मुख्य आरोपी चंदू उर्फ चंद्रकांत खामकर हा आरोपीना जामीन मिळवून देण्यासाठी लागणारे बनावट दस्तऐवज करण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या टोळीत आणखीही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून या टोळीने आतापर्यत किती बोगस जामीनदार न्यायालयात उभे करून आरोपींना जामीन मिळून देण्यात मदत केली. याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तर आज पाचही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली आहे.
-रोशन उबाळे
Arrested for making fake documents for bail in kalyan