डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.
अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.
MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge