Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप केला आहे. मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी या प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला असून शिवसेनेने फायदा होईल अशीच रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “जिसकी लाठी उसकी भैस” या पंक्ती प्रमाणे शिवसेना सत्तेचा फायदा घेत आहे आणि आपल्या सोइ नुसार प्रभाग पाडले जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कोरोनामुळे KDMC निवडणूक बरीच लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुकेचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने आरोप केल्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या जातात की नाही हे देखील पहावे लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र आता युतीतून वेगळे झाल्यानंतर भाजपची काय भूमिका असेल हे देखील पहावे लागणार आहे.

-रोशन उबाळे

Raju Patil: MNS MLA alleges that Shiv Sena has formed wards according to its own convenience

KDMC New Ward : ‘इतके’ आहेत नवे प्रभाग; तुमचा प्रभाग जाणून घ्या

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आज नवी प्रभाग रचना ( KDMC New Ward ) जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारांची आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.

क.डों.म.पा.ने जाहीर केलेल्या यादीनुसार आता १२२ ऐवजी ४४ प्रभाग असणार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रभागांची संख्या कमी वाटत असली तरी प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक विस्तार आणि सीमा वाढविण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि भौगोलिक रचनेच्या आधारावर नवे प्रभाग बनविण्यात आले आहेत. एका प्रभागात चार जागांसाठी निवडणुका रंगतील तर काही प्रभागात मात्र तीन जागा असणार आहेत. अश्या एकूण १३३ जागांवर क.डों.म.पा.ची निवडणूक रंगणार आहे.

नव्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्ष यांना आपल्या योजना आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे OBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात सुरू असून राज्यसरकारचे लक्ष त्यावर आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला असून तेथेही प्रशासकीय राजवटीची तयारी केली जात आहे. त्यामुळे प्रभाग रचना जरी जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात निवडणुका केव्हा होतील हे काही सांगू शकत नाही.

-संतोष दिवाडकर

KDMC New Ward : New ward structure of Kalyan Dombivali Municipal Corporation announced

KDMC च्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल; मनसे आमदार राजू पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत.

क.डों.म.पा. (KDMC) चे माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन आणि गोविंद बोडके यांच्यासह चंद्रप्रकाश सिंह, रवि राव, मारुती राठोड ADTP, सुरेंद्र टेंगले, ज्ञानेश्वर आडके, सुखदेव जाधव, रघुवीर शेळके, संजय भोळे, भागवत, सुहास गुप्ते, हरकचंद जैन, अनिल आर. निरगुडे आणि स्वत: विकासक यांच्यासह इतरत्र बदली झालेल्या माजी महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.

माजी अपक्ष नगरसेवक अरुण पी गीध यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अ‍ॅड. अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिला. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली आहे असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्यानंतर अनेक अनियमित नियमाना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एसएचओने सांगितले की, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८, १२० बी, आर डब्ल्यू , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण भाग जानेवारी २००४ च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.

“माजी आयुक्तांच्या पाठीवर कुणाचा हात ?” – राजू पाटील

जोरदार चर्चेत असलेल्या आणि चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आता समाज माध्यमांद्वारे सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनो यावर काय बोलाल ? कोटींचा घाटा त्यात वाघाचा घाटा ? या आयुक्तांमागे कुणाचा हात ? यांचा कोण नाथ असेल ? असे प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत. या पोस्ट नंतर शहरातील पालिका वर्तुळात हा विषय आता आणखीनच चर्चेत आलेला आहे.

-रोशन उबाळे, संतोष दिवाडकर

Charges filed against former KDMC commissioner; MNS MLA Raju Patil’s question to the ruling party

प्रेरणादायक : कचरा वेचून महिलेने विकत घेतली नवी कोरी चारचाकी गाडी

कल्याण :-काम ही सर्वश्रेष्ठ बाब आहे. मग ते कोणतेही असो याची महती सांगणारी प्रेरणा दायक घटना कल्याण (Kalyan News) मधील वाडेघर डम्पिंग ग्राउंड परिसरात घडली आहे. निर्माण होणारा घनकचरा हा फेकून दिला जात असला तरी तो योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरू शकतो. हीच किमया कचरावेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क नवी कोरी बोलेरो पिकअप गाडी घेतली. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने त्यांच्यासह अन्य कचरावेचकांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २५ मे २०२० पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली. ती प्रत्यक्षात आण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे बंद केले होते. त्यामुळे त्याठिकाणी कचरा वेचणाऱ्या जवळपास ४०० कचरा वेचकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना क आणि ब प्रभाग क्षेत्रातील ५० सोसायट्यांमधून सुका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी रेखा यांनी पुढाकार घेतला. गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी रेखा महापालिकेस देतात.

त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यापैकी विक्री योग्य कचऱ्यातून त्यांना उत्पन्न मिळते. उर्वरीत कचरा रिसायकलिंगसाठी जातो. कचऱ्यातून त्यांनी पैसा कमावून चक्क बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली आहे. सध्या हा प्रयोग दोन प्रभाग क्षेत्रात राबविला जात असला तरी उर्वरीत ठिकाणीही तो राबविण्याचा मानस उपायुक्त कोकरे यांनी व्यक्त केला.

-रोशन उबाळे

In Kalyan, a woman bought a new four-wheeler by selling garbage

डोंबिवलीत कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा सप्लाय करणाऱ्या तिघांना अटक; अतिदुर्गम भागातून आणल्या जात होत्या गोण्या

डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali

रस्त्यावरील बेवारस उभी वाहनं KDMC ने हटवली

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काही निर्देश घालून दिले होते. यानुसार ‘4-जे’ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव रोड, सुचकनाका, पत्रीपुल, कचोरे या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली व दैनंदिन साफसफाईस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली एकुण १६ बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

आज सकाळी करण्यात आलेली ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या सहाय्याने व टोइंग मशीन, डंम्‍पर व जेसीबी च्या मदतीने करण्यात आली.

सध्या महानगरपालिका शहरातील स्वच्छता या विषयावर मोठा भर देत असून वास्तवात शहराला बकालपणातुन बाहेर काढीत सौन्दर्यदृष्टी प्रमाणे कामकाज सुरू आहे. वेळोवेळी नागरिकांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, भिंतीवर रंगकाम अश्या सर्व बाबींवर महापालिका बारकाईने काम करत आहे. मात्र शहराला स्मार्ट करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आधी स्मार्ट होणं गरजेच आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC removed unattended vehicles on the road

जामिनासाठी बनावट दस्तवेज तयार करणाऱ्या टोळीला न्यायालयात सापळा लावून केले अटक

कल्याण : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटक आरोपींच्या नातेवाइकांकडून हजारो रुपयांच्या मोबदल्यात त्या आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रासह बोगस जामीनदारांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे (Kalyan Crime) शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात टोळीतील ५ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

महमद रफीक अब्दुल सत्तार शेख (रा. मालाड पुर्व, मुंबई ), जयपाल समाधान मजोगीरी (रा.धारावी मुंबई), संतोष कन्हैयालाल मौर्या (रा, विरार पुर्व), महमद हबीब महमद रफीक हश्मी (रा. जोगेश्वरी, पश्चिम), चंदु ऊर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर (रा. ज्युचंद्र, वसई पुर्व जि.पालघर), असे अटक केलेल्या टोळीचे नाव आहे.

डोंबिवली रेल्वे स्थनाकात एकाची हत्येप्रकरणी अटक आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी काही जण सोमवारी कल्याण न्यायालयात येणार असल्याची खबर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किशोर शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण न्ययालयात सापळा रचला होता. त्यावेळी डोंबिवली रेल्वेच्या परिसरात हत्या करणाऱ्या आरोपीला हि टोळी बनावट कागदपत्रासह बोगस जमीनदाराला घेऊन आली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आरोपीला जामीन देण्याआधीच न्यायालयाच्या आवारात झडप घालून बनावट दस्तऐवजासह ताब्यात घेतले.

या टोळीतील मुख्य आरोपी चंदू उर्फ चंद्रकांत खामकर हा आरोपीना जामीन मिळवून देण्यासाठी लागणारे बनावट दस्तऐवज करण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या टोळीत आणखीही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून या टोळीने आतापर्यत किती बोगस जामीनदार न्यायालयात उभे करून आरोपींना जामीन मिळून देण्यात मदत केली. याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तर आज पाचही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे

Arrested for making fake documents for bail in kalyan

‘आर के बझार’च्या नव्या शाखेचं उदघाटन; डोंबिवली अनंतम रेजन्सी मध्ये भव्य सुपर मार्केट सुरू

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अश्या रामकृष्ण बझारच्या (Ram Krushna Bazar) १७ व्या शाखेचे उदघाटन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने करण्यात आले. डोंबिवली गोळवली येथील अनंतम रेजन्सी येथे नव्या शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील ग्राहकांचा विश्वास आर के बझारने (R K Bazar) संपादित केला आहे. उत्तम दर्जाच्या वस्तू विशेष सवलतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून रामकृष्ण बझारची ओळख आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या सुपर मार्केटचे संचालक मनोज डुंबरे हे स्वतः प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. नवीन शाखेच्या उद्घाटना निमित्ताने अनेक मित्रमंडळी, हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.

गरीब असो अथवा श्रीमंत अनेक ग्राहकांची पसंद आर के बझारला मिळताना दिसते. यानिमित्ताने उदघाटनाच्या दिवशी खरेदी करणाऱ्या लकी ग्राहकाला लकी ड्रॉ द्वारे वॉशिंग मशीन बक्षीस स्वरूपात देण्यात आली. आर के बझार वरून मोफत होम डिलिव्हरी देखील करता येत असून. आता घरबसल्या किराणा सामान ग्राहक मागवू शकतात. यासाठी आर के बझारचा एप डाउनलोड करावा लागणार आहे.

-संतोष दिवाडकर

Inauguration of new branch of R K Bazar at Anantam Regency, Dombivli

Video – New Branch
कल्याणच्या गौरी पाडा तलावात मृत कासवांचा खच; मृत कासवांवर अग्नीसंस्कार

कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याण (Kalyan) पश्चिमेतील गौरी पाडा (Gouri Pada) तलावात मृत झालेल्या कासवांवर (Turtle) वन विभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत. तर १३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला (War Rescue Team) यश आले आहे.

कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा तलाव हा मस्त्य व्यवसाय आणि गौरी गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात येथे मासे पकडुन विक्री केली जाते. या तलावात दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी पसरली होती आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले होते. मा.नगरसेवक दया गायकवाड यांनी वॉर संस्थेच्या हेल्पलाईन वर संपर्क केला असता त्यांची टीम घटनास्थळी गेली. त्यानंतर त्यांना मन विचलित करणारे दृश्य दिसले. त्याठिकाणी दोन-चार नव्हे तर ५० ते ६० मृत कासवांचा खच पडला होता. तर अनेक कासव शेवटचा श्वास घेत होते.

भारतीय मृदूपाठीचे कासव हे संकटग्रस्त उभयचर जीवांपैकी एक आहे. डासांनी पाण्यात सोडलेली अंडी, किडे व मृत मासे त्यांचे प्रमुख अन्न आहे. पाणी शुद्ध आणि स्वच्छ करणारे जीव हे एक प्रकारे मानवी जीवाला फायदेशीर आहे. घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा होत असताना काही कासव किनाऱ्यावर तडफडत असल्याचे आढळून आले. त्यात ९ भारतीय मृदू पाठीचे कासव आणि ४ रेड इयर्ड स्लाइडर जातीचे कासव असे एकूण १३ कासवांना वॉर टिम ने तत्काळ सुखरूप बाहेर काढले आहे. तर ५३ कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत.

मृत कासवां पैकी काही कासव शवविच्छेदना करिता वनविभागाने पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. कासवांचा मृत्यू कशामुळे झाला? तलावात कोणी औषध टाकले आहे का? पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडले गेले आहे का? तलावात मासे देखील असून मग त्यांचा मृत्यू कसा झाला नाही? असे एकना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे कासवांचा मृत्यू मानवनिर्मित असेल तर दोषींवर लवकरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वॉर संस्थेच्या सुहास पवार यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Many turtles die in Gauri Pada lake of Kalyan

आजपासून शाळा सुरू! विद्यार्थ्यांनी सजवल्या शाळेच्या भिंती

कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.

शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

Schools in Maharashtra resume from today