‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.

उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.

बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.

सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय ? – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

डोंबिवली ग्रामीण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच समारंभाला मनसे नेत्या तसेच सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारला जाब विचारला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे आल्या होत्या. मात्र पत्रकारांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या आंदोलना बाबत विचारले असता शालिनी ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना सवाल केले आहेत.

शुक्रवारी भाजपाने वाढीव वीजबिल कमी करण्यासाठीच्या मुद्द्यावर राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. तर शिवसेनेने देखील वाढीव इंधनदर आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तरीही आंदोलन करीत आहेत. यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे ? हे प्रश्न सोडवायचे सोडून एकमेकांवर लादत आहेत. असा आरोप व सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केल्या. डोंबिवलीतील आयोजित मनसेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.