प्रेरणादायक : कचरा वेचून महिलेने विकत घेतली नवी कोरी चारचाकी गाडी

कल्याण :-काम ही सर्वश्रेष्ठ बाब आहे. मग ते कोणतेही असो याची महती सांगणारी प्रेरणा दायक घटना कल्याण (Kalyan News) मधील वाडेघर डम्पिंग ग्राउंड परिसरात घडली आहे. निर्माण होणारा घनकचरा हा फेकून दिला जात असला तरी तो योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरू शकतो. हीच किमया कचरावेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क नवी कोरी बोलेरो पिकअप गाडी घेतली. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने त्यांच्यासह अन्य कचरावेचकांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २५ मे २०२० पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली. ती प्रत्यक्षात आण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे बंद केले होते. त्यामुळे त्याठिकाणी कचरा वेचणाऱ्या जवळपास ४०० कचरा वेचकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना क आणि ब प्रभाग क्षेत्रातील ५० सोसायट्यांमधून सुका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी रेखा यांनी पुढाकार घेतला. गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी रेखा महापालिकेस देतात.

त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यापैकी विक्री योग्य कचऱ्यातून त्यांना उत्पन्न मिळते. उर्वरीत कचरा रिसायकलिंगसाठी जातो. कचऱ्यातून त्यांनी पैसा कमावून चक्क बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली आहे. सध्या हा प्रयोग दोन प्रभाग क्षेत्रात राबविला जात असला तरी उर्वरीत ठिकाणीही तो राबविण्याचा मानस उपायुक्त कोकरे यांनी व्यक्त केला.

-रोशन उबाळे

In Kalyan, a woman bought a new four-wheeler by selling garbage

पुनर्वसनाच्या मुद्द्यासाठी महिलांचा मुंडन करण्याचा KDMC ला इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

भयानक थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना ब्लॅंकेट वाटप

कल्याण : भर थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब बेघरांना नागरी हक्क संघर्ष समितीने मकरसक्रांत आणि नामांतर दिवसाचे औचित्य साधून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना वस्तू दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे. दोन वर्ष करोनाचा कहर त्यात गरिबांचा कामधंदा गेला. खाण्याचे हाल, उघड्यावर दुकानाच्या आसऱ्याला झोपायचे, त्यात महा भयंकर थंडी. अशा परिस्थितीत काही लोक जगतात. त्यांचे जगणे रात्री अपरात्री फिरल्यावर समजते.

बैल बाजार स्मशान भूमि समोर स्मार्ट स्टोर जवळ एक तीस वर्षाचा व्यक्ती प्ल्यास्टिकच्या गोणीत स्वतःला टाकून थंडीत कुडकुडत झोपला होता. सर्व शरीर त्याने त्या गोणीत गुंडाळून घेतलेले होते. त्याला उठवले असता त्याने त्याची करुण कहाणी सांगितली. “साहेब काम धंदा नाही पोटाला अन्न नाही विदर्भातील थंडी पेक्षा ही त्या मानाने थंडी कमी. करोना मुळे कोणी काम देत नाही. मृत्यू पण येत नाही”. बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होतेच मात्र ब्लॅंकेट मिळाल्याचे समाधानही.

अशीच एक प्लास्टिक पालव टाकलेली पाच दहा घर फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे कल्याणच्या मध्यवर्ती पॉश वस्तीत अशी घर आहेत हेच आश्चर्य आहे. कल्याणच्या लोकांना, नेते आणि कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांना माणुसकी असेल तर त्यांनी जरा तिकडे फिरून यावे. पावसाळ्यात हे लोक कसे राहत असतील? असा विचार आला तर अंगावर शहारे आले. लाईट नाही, पाणी नाही. साप, विंचू, घुशी यांची भीती नाही. तरी लोक चिमुरडे घेऊन येथे राहतात. त्यांच्या कडे ढुंकूनही कोणी पहात नाही. अश्या बेवारस वस्तीत जाऊन सामाजिक भान ठेवून शनिवारी रात्री ब्लॅंकेट वाटन्यात आले.

अशीच एक स्वाभिमानी वयोवृद्ध आजी कृषी बाजार समितीच्या गेट वर सापडली. अंगावर फक्त साडी, विना स्वेटर केळ्याची पान आणि काही भाजी रात्री थंडीत विकायला बसली होती. आजी कुठून आली? विचारले असता ती म्हणाली जळगाव वरून. आता रात्र भर थंडीत राहणार काय? तर म्हणाली पोटा पुढे थंडी काय आहे पोरांनो? कुठून उर्मी येते यांना जगण्याची हे एक कोडे आहे. या घरात बसण्याच्या वयात ही म्हातारी एव्हड्या लांबून थंडीत केळीची पाने विकायला आली.
सलाम त्या आजीच्या स्वाभिमानाला.

लोक जेथे आसरा मिळेल तेथे झोपली होती. दुकानाच्या थंड गार लादीवर, अंगावर असेल तो पातळ कपडा, अंगाखाली काही नाही व त्यात डास. काही लोकांच्या म्हणन्यानुसार ते नशेडी म्हणून घोषित केले जातात. पण काही लोक नशा न करता ही झोपलेले होते. आणि ही त्यांची हौस नसून त्यांची मजबूरी होती. ज्याकडे येथील व्यवस्था आणि समाजाने दुर्लक्ष केले आहे.

१४ जानेवारीच्या रात्री ब्लॅंकेट वाटण्याच्या अनुभवाने एक रात्र वैऱ्याची, निसर्गाच्या थंडीच्या प्रकोपाची अनुभवायला मिळाली. रात्रीच भयानक वास्तव आणि स्मार्ट सिटी बनायला निघालेल्या शहराच काय होणार? लोक स्मार्ट केंव्हा होणार? माणसात माणुसकी केंव्हा येणार? असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी पाच वाजता चार भिंतीच्या सुरक्षित ब्लॉकच्या घरात ब्लँकेट घेऊन झोपलो. स्वतःला,सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला येथील भांडवलदारांना, राजकारणी नेत्यांना, लोकशाही म्हणून तीचा खून पाडणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला शिव्या देत.

नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे हे वाटप करण्यात आहे. माणुसकी मनात जिवंत असणाऱ्या लोकांच्या मदतीने रात्री जागून सामाजिक भूक भागवणारे कार्यकर्ते हजर होते. बाबा रामटेके, हेमंत कांबळे, अभिजित पंडित, राजू रणदिवे, अक्षय गायकवाड, प्रवेश सिंग, रमेश बर्वे, ऍड.सुनील चतुर्वेदी, कलाकार फोटोग्राफर मनोज घुसळे.

दरम्यान ब्ल्याॅंकेट वाटप कार्यक्रम पुढे दहा दिवस चालू राहणार आहे. ज्यांना नवीन ब्लॅंकेट/चादर देणे असतील त्यांनी स्टार ऑप्टिकल ताल बार समोर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे द्यावे. मदत करण्यासाठी पत्रकार बाबा रामटेके यांच्या ८०९७५४०५०६ नंबरवर संपर्क साधण्याचे संघटनेने आव्हान केले आहे.

-रोशन उबाळे

मास्क कारवाईत पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ – दोघांवर गुन्हा दाखल

विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.