Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी ३५ हुन अधिक आमदारांसह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून बंड पुकारणारे सर्व आमदार राज्याबाहेर गुवाहाटी येथे थांबले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती मान्य नसल्याचे या बंडातून सांगितले जात आहे. मात्र यावरून शिवसैनिक आता महाराष्ट्र भरात आक्रमक होताना दिसत आहेत.

ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचा एक समज आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालय शनिवारी फोडण्यात आल्या नंतर पोलिसांनी आता अधिक गंभीर भूमिका घेतली असून राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून ठाणे ग्रामीण भागात ३० जून पर्यंत तर मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

Shivsena: MP Shrikant Shinde’s office vandalized by shivsainik

उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले

Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला टँकर रहदारीच्या परिसरातून घेऊन जाणे तसेच टँकरचे झाकण अश्या पद्धतीने लिकेज होणे ही निष्काळजीपणाची बाब आहे. यामुळे दोन जणांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कठोर कारवाई करतात.

रस्त्यावरून पायी चालत असताना किंवा दुचाकी चालवत असताना अश्या प्रकारच्या अवजड वाहना पासून शक्यतो सुरक्षित अंतर ठेवणे आपल्याच हिताचे असणार आहे. या अगोदरही रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वाराचा अवजड वाहनांशी अपघात होऊन त्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. उल्हासनर येथील या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे.

-संतोष दिवाडकर

In Ulhasnagar, four persons were burnt when acid flew from a speeding tanker