कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र पाठविले होते. गेल्या महिन्यात झालेल्या या पत्र व्यवहाराची आता दखल घेतली असून केंद्रा कडून महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे मुख्य सचिवांना या बाबतीत विचार करण्याची सूचना देण्यात आली आहे.
कल्याण शहर तसेच येथील शेजारील गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय महत्त्वाचे आहे. तसेच गोरगरीब नागरिकांनसाठी आसरा आहे. पण सुविधेअभावी लोकांना पुरेसी आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. कधी चिकित्सकांची कमतरता तर कधी अन्य कारणाने नागरिकांना दुसऱ्या शहरात जावे लागत आहे. या रुग्णालयात आधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने मुंबईच्या आणि ठाण्याच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. जर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयचा दर्जा मिळाला तर अत्यआधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध होण्यास मदत होईल आणि कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना औषधोपचारासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची पायपीट थांबणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र लिहिले. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांकडून तर अद्याप काहीही उत्तर आलेले नाहीं. मात्र केंद्राकडून पत्र प्राप्त झालं असून आपल्या पत्राची दखल घेऊन सदर पत्र आरोग्य खात्याचे मुख्य सचिवांना पुढच्या कार्यवाही साठी सादर केलं असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आता शासकीय रुग्णालयासाठी मनसे तर्फे योग्य पाठपुरावा केला जाईल आणि कुठल्या ही परिस्थितीत बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयाचा दर्जा मिळविला जाणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे
