मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अतिशय जबाबदारीने बोलणारे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. जितके आक्रमक आणि परखड ते आहेत तितकेच संयमी आणि अभ्यासु त्यांचे विचार आहेत असे मनसैनिक आवर्जून सांगत असतात. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे द्यायचे ? असा प्रश्न उभा असताना राज ठाकरेंनी मात्र तिसऱ्याच नावाचा गौप्यस्फोट केल्याने आता नामकरणाला नवीनच वळण प्राप्त झाले आहे.
नवी मुंबईला स्व.बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येईल यावर शिवसेना पक्ष ठाम आहे. शिवसेना सत्तेत असल्याने राज्यसरकार देखील याच नावाचा विचार करतेय यात काही शंका नाही. याउलट भूमिपुत्रांनी देखील दि.बा.पाटील यांच्या नावासाठी मुंबई आणि उपनगरात आंदोलन सुरू केली आहेत. मनसेचे एकमेव आमदार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यातून मनसेचा पाठींबा असेल असे सर्वांना वाटले होते.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दि.बा.पाटील नामकरणाला पाठिंबा द्यावा याबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
“नवी मुंबई येथे होणारे विमानतळ हे सध्याच्या मुंबईतील विमानतळाचाच भाग आहे. फक्त हे विमानतळ उभं राहिल्या नंतर या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ केले जाईल आणि जुन्या विमानतळाला डॉमेस्टिक विमानतळ म्हणून ठेवले जाईल. त्यामुळे दोन्ही विमानतळ ही एकच असल्याने नाव देखील तेच राहील. बाळासाहेब किंवा पाटील अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वाला विरोध नाही मात्र जे आहे तेच नाव केंद्राकडून ठेवले जाईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही कुठूनही आल्यावर पाय ठेवता तेव्हा सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या भूमीत तुम्ही पाय ठेवता. त्यामुळे रस्त्यावरील संघर्ष नक्कीच थांबेल. आमदार राजू पाटील आणि प्रशांत ठाकूर यांना मी हा मुद्दा नीट समजावून सांगितला आहे. जर शिवरायांचं नाव विमानतळाला देत असतील तर मग हा विषय इथेच संपला असे ते यावर म्हणाले आहेत.”
– राज ठाकरे (मनसे अध्यक्ष)
वास्तवात विमानतळ बनण्यापूर्वीच त्या विमानतळाला काय नाव असेल यावरून जो संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्षाला राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर वेगळंच वळण लाभलं आहे. शिवसेना विरुद्ध भूमिपुत्र दोन्ही वेगवेगळ्या नावासाठी आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवरायांचे नाव सुचवले आहे.
राज ठाकरे हे एखादी भूमिका मांडत असताना वास्तविक भूमिका मांडतात. त्यांनी जर ठरवले असते तर ते दि.बा.पाटील यांच्या नावाला पाठिंबा देऊन आगरी कोळी समाजाला आपल्याकडे सहज खेचू शकले असते. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील जवळच आली आहे. पण राज ठाकरे मतांचे राजकारण कधीच करत नाही. असे काही मनसैनिक समाज माध्यमातून सांगत आहेत.
-संतोष दिवाडकर