मोबाईल टॉवरच्या केबल कनेक्शनसाठी लागणाऱ्या महागड्या मशीनची ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण क्राईम ब्रांचने यशस्वीरित्या अशा चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून तिघा जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे.
गुन्हे शाखा घटक ३ कल्याणकडून करण्यात आलेल्या तपासात मोबाईल टॉवर संबंधित महागडं मशीन चोरणारी टोळी गजाआड झाली आहे. मशीन चोरीचे गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले होते. या प्रकारच्या चोरीचे गुन्हे वाढत असल्याने क्राईम ब्रांचची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हवालदार दत्ताराम भोसले यांनी गोपनीय महितगारामार्फत गुप्त माहिती काढली आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सखोल तपास केला. या तपासा नंतर तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. कैलास सावंत, अकबर शेख आणि संजय सौदे अशी तिघांची नावं असून तिघेही उल्हासनगर येथील राहणारे आहेत.
अटक केलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी स्लायसिंग मशीन, ओटीडीआर मशीन, लेझर लाईट पॉवर मीटर अशा विविध प्रकारच्या महागड्या मशिन्स चोरी केल्याचे कबूल केले आहे. या नंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे, हिललाईन पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय आणखी गुन्ह्यांची देखील उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त जयजीत सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त एन टी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण एम दायमा, पोलीस उप निरीक्षक नितीन मगदूम, मोहन कळमकर, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, सचिन साळवी, मंगेश शिर्के, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग या सर्वांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.
-संतोष दिवाडकर