डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने शहर आणि ग्रामीण विभागातील बेकायदेशीर असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा सुरूच ठेवला असून, बिनधास्तपणे धडक कारवाया केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरातून अनेक अनधिकृत इमारतींवर अशी धडक कारवाई सतत होत असल्याने स्थानिक भुमाफिया हद्दपार होवू लागले आहेत. विकासक आणि जमीन मालकांचा बेकायदेशीर बाजार मनपाने उठवून लावला आहे. अशा कारवाया सुरू राहिल्यास बांधकामांच्या परवानग्या घेऊन पालिकेच्या महसुलीत वाढ होईल तसेच ठेकेदार आणि भूमाफियाना जरब बसेल यात दुमत नाही.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भूमाफियांचा बेकायदेशीर इमारतीचा धंदा बंद केल्याने भूमाफियांनी हळूहळू पळ काढला आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार १०/ई प्रभागातील सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आपले कर्तव्य निभावून आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत बेधडक कारवाई करत डोंबिवली पूर्व, सोनारपाडा येथील विकासक रुपेश म्हात्रे व विजय जाधव यांच्या चालू असलेल्या तळ+५ मजल्याच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई मंगळवार १४ डिसेंबर रोजी केली आहे.
सदर बांधकामधारकास यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी आणि मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व ४ गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.
-रोशन उबाळे