कल्याण : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर, कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सादर केले.
महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणे, सर्वसामान्य माणसाना वेठीस धरणे, हे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला.
तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे ? काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे