कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण डोंबिवलीत दिवसभर पावसाचा हाहाकार; सखल भागात साठलं पाणी

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्यासह कल्याण डोंबिवली शहरांना देखील झोडपून काढले आहे. जिल्हयासह संपूर्ण कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात पावसाने कहर केला आहे. यात अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

रविवार पासून मुंबई,ठाणे,रायगड या जिल्ह्यात पावसाचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची देखील भांबेरी उडवली आहे. कल्याण शीळफाटा मार्गावर पाणी साचल्याने नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील प्रथमच पाणी शिरले होते. सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम आणि नालेसफाई पूर्णपणे न झाल्याने पावसाचे सर्व पाणी पोलीस ठाण्यात शिरले. साधारण एक फूट पाणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन पर्यंत शिरले होते.

कल्याण पश्चिमेला देखील पावसाचा कहर पाहायला मिळाला. येथीलही सखल भागात पाण्याने कब्जा केला होता. विठ्ठलवाडी येथील नाला देखील संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता. यामुळे कल्याण – उल्हासनगर मार्गावरिल या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद केली गेली. शिवाय महानगरपालिका प्रशासनाचा फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात केला गेला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस बंदोबस्त केला गेला होता. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर साधारण एक फुटा पर्यंत पाणी साठले होते.

कल्याण तालुक्यातील खडवली नदी,उल्हास नदी,वालधुनी नदी आणि लहान सहान ओढे दुथडी भरून वाहत होते. तर बदलापुरच्या बारवी धरणात देखील पाणी साठा वाढला आहे. अंबरनाथ शहरात तसेच शिव मंदिर भागात पाणी साठले होते. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात देखील एका शेतकऱ्याच्या तीन म्हशी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *