राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या आणि पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी घोडदौड सुरू आहे. त्या घोडदौडींकडे पाहता आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागांचा नारा देत महापौर राष्ट्रवादीचाच बसेल यात संदेह नसावा असा आत्मविश्वास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.
कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. आता जनता युतीच्या करनाम्यांना कंटाळली असून केवळ राष्ट्रवादी हा पर्याय समोर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पक्षामध्ये युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होत असून आजच्या मेळाव्याला आलेली उपस्थिती हे त्याचं प्रतिक आहे. असाच उत्साह कार्यकर्त्यांनी मनामध्ये बाळगून एकमेकांशी सहकार्याची भावना घेऊन पुढे जावं असे आवाहन त्यांनी केले.

यानिमित्ताने महिलांना देखील उमेदवारी मध्ये संधी देऊन मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाचा विचार यावेळी पुढे आला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच पक्षाला तीन आकडी बळ देण्यास आम्ही सज्ज आहोत असा नारा देखील दिला. तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. नागरिकांमध्ये वावरताना त्यांच्या अडचणी व समस्या सोडवताना प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले. शहरांमधील नागरी समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर द्यावा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
ग्रामीण भागातील पाणी समस्या तसेच शहरी भागातील खड्डे, कचरा, प्रदूषण, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, शाळांच्या फी वाढीबद्दलच्या समस्या या सर्वांवर प्रकाशझोत टाकल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून एक सक्षम कार्य देखील होऊ शकत. आपली नाळ नागरिकांशी असून त्यानिमित्ताने सगळ्यांनी निवडणूकीच्या धागा पकडून पुढे जायला हवं हे सूत्र लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन करून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने लोकसभा, विधानसभेला जशी बुथ रचना चांगली केली होती. तशीच पुन्हा मोट बांधण्याचे कार्य ज्येष्ठांनी करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षम करावा असा विचार पुढे आला.
राष्ट्रवादी काँग्रेसने १००+ जागा तसेच आघाडी असली तरी पक्षाचा महापौर बसेल असा दावा या बैठकीत उपस्थित केला. क.डों.म.पा. निवडणुकीत सध्या १२२ प्रभाग असून याच जागांसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे नुकसान झाले होते. काँग्रेस बरोबर आघाडी असूनही राष्ट्रवादीला फक्त दोन जागी विजय मिळाला होता. तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. सर्वाधिक ५२ जागांसह शिवसेनेने पुन्हा आपला महापौर बसविला होता. मात्र आता येथील सर्वात मोठा पक्ष शिवसेने सोबत राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादी कोंग्रेसला कल्याण डोंबिवलीत त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राज्यातील सध्याची कारकीर्द ही समाधानकारक व स्थिर असल्याचे दिसत आहे.
-कुणाल म्हात्रे