कल्याण : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभागातील पथके पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
१० जानेवारी ते १४ जानेवारी या पाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या ७७९ व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ३ लाख ८९ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तरी गर्दीच्या ठिकाणी, अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसेच कोविड अनुरुप वर्तनाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे