देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर ३,२०२ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवला जात नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रशासनाची ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था’ अर्थात् एन्.सी.ई.आर्.टी. अर्ध्या पानांपेक्षा अधिक इतिहास शिकवायला सिद्ध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये, तर येडीयुरप्पा यांच्यामुळे कर्नाटक राज्यात थोडासा इतिहास वाढवला गेला आहे; मात्र देशात शिवछत्रपतींचे विचार संपवण्याचे कारस्थान चालू आहे. देशाची शासनव्यवस्था ‘छत्रपती शिवराय हे आदर्श हिंदू राजे होते’ हे देशातील तरुणांना शिकवू देत नाही. आज देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी स्थिती आहे. केवळ शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु साम्राज्य दिन साजरा करून उपयोग नाही. काशी-मथुरा मुक्त करण्याचा शिवरायांचा संकल्प होता असे देखील सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.
या वेळी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी पाच इस्लामी आक्रमकांचा निःपात करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी राज्याभिषेक करून भाषा पुनरुज्जीवित केली. स्वतःचा राज्यव्यवहारकोश संस्कृत भाषेत आणला. राज्य संस्थापनेला त्यांनी धर्म संस्थापनेचे स्वरूप दिले. याउलट वर्ष १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य मिळाले; पण राज्य संस्थापना झाली नाही, असे म्हणावेसे वाटते; कारण ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना दडपण्यासाठी आणलेला वर्ष १८६० चा ‘इंडियन पिनल कोड’ अद्याप लागू आहे. भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी आणलेला ‘इंडियन गव्हर्नन्स अॅक्ट १९३५ हा राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच अंतर्भूत केला आहे. गुरुकुल परंपरा बंद पाडण्यासाठी कायदा करून चालू केलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती अद्याप चालू आहे. अरबी, इंग्रजी आक्रमकांनी आपल्या रस्ते-वास्तूंना दिलेली नावे आपण पालटलेली नाहीत.
४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणाला विचारायला गेले नव्हते. औरंगजेब, आदिलशाह, कुतबशाह आदी मुघल राजांची अनुमती घेतली नव्हती. मुठभर मावळ्यांना एकत्र करून शपथ घेतली. नंतर स्वत:चे सैन्य, शस्त्रागार, आरमार, हिंदूंची पाडलेली मंदिरे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तो आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास यावेळी विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य विवेक सिन्नरकर यांनी व्यक्त केला.
-कुणाल म्हात्रे