कल्याण-डोंबिवली घडामोडी

वडवली अटाळी रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती; विकासकामात बाधित झाडांची कत्तल

महत्वाकांक्षी वडवली अटाळी रिंगरोड प्रकल्पातील ६०० मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. या विकासकामासाठी बाधित होणाऱ्या झाडांची दुर्दैवाने कत्तल करावी लागली असून त्यापूर्वी १५ हजार झाडांचे वृक्षारोपण केल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वडवली अटाळी महत्वकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडवली नदी पासून अटाळी पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित राहीले होते. बुधवारी ११ ऑगस्ट रोजी नदीच्या पुलापासून ते अटाळी हद्दीपर्यंत ६०० मीटर रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणारी झाडे वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीनुसार महापालिकेच्या विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, एमएमआरडीएचे अधिकारी, ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत तोडण्याचे काम हाती घेण्यात येऊन लगेचच रस्त्यालगतच्या गटारीचे कामकाजास प्रारंभ करण्यात आला.

रिंगरुट प्रकल्पात बाधीत झालेली झाडे तोडण्यापूर्वी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने आंबिवली टेकडी येथे सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आलेली आहेत आणि आज तिथे घनदाट जंगल उभे रहात आहे. रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणा-या झाडांपैकी ताडांच्या झाडासाठी प्रती झाड रुपये १० हजार मोबदला महासभेच्या ठरावानुसार यापूर्वी तोडण्यात आलेल्या ताडांच्या बदल्यात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. यापुढे ही तोडलेल्या झाडांपैकी ताडांच्या झाडांसाठी प्रती झाड रु.१० हजार मोबदला संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या दिला जाईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

शहरातील वाहतूकिवरील ताण कमी व्हावा यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. मात्र वृक्षतोड करून केलेला विकास पर्यावरण प्रेमींच्या पथ्यावर पडत नसून. झाडांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण पर्यावरणाशी छेडछाड केल्याने काय होते ? हे प्रकृतीने मानवाला या अगोदर अनेकदा दाखवून दिले आहे. त्यातीलच कोकणातील तळीये दुर्घटना हे एक ताजे उदाहरण म्हणता येईल.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *