डोंबिवली : ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार खमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातुन मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयासाठी जबरदस्तीने अपहरण करुन नेल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच सपोनिरी दत्तात्रय सानप यांना तक्रारदार यांची तक्रार घेवुन त्याप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. बॅनर्जी याने या तिन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतकडून दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात झाला. बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. त्याने दोन साथीदारांसह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत बॅनर्जी यांचे अपहरण केले.
अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या नंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच तांत्रिक बाबीचा तपास करून पोलिसांनी नालासोपारा येथील गोराई नाक्या जवळील एका हॉटेल मध्ये छापा मारून बॅनर्जी यांची सुटका करून मनजीत यादव व त्याचे दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांना ताब्यात घेतले. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश मध्ये राहणारे असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
-कुणाल म्हात्रे