कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांना मिळणार गती ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशीर्षअंतर्गत (२२१७-०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करत विविध विकासकामे मंजूर करून घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते आणि पाणीसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. परंतु, कोरोना सारख्या महामारीच्या संकटात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता प्रभागातील कामे करण्याकरिता लोकप्रतिनिधी यांचा नगरसेवक निधीचा अभाव पडत असल्यामुळे या शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून व्हावीत, यासाठी खासदार डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते.

खा. डॉ. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शासन दरबारी रु. १५.६५ कोटीचीमागणी केली होती. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल.

येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरु केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करून ती कामे पूर्णत्वास येतील असा विश्वास हि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

-कुणाल म्हात्रे

पुण्यात वाढदिवसा निमित्त युवकाने शेकडो गरजूंना केले अन्नदान

अलीकडल्या काळात वाढदिवसाला केकचा सत्यानाश करण्याची प्रथा अलीकडे खूप वाढू लागली आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अंगावर कसलेही द्रव्य ओतून अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर अंडी फोडून त्याला माखवले जाते. या सगळ्या गोष्टी एकाबाजूला ठेवून पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा वाढदिवस अन्नाची नासाडी न करता गरिबांना अन्नदान करून साजरा केला आहे.

शुभम शिंदे या तरुणाचा १ जून रोजी २१ वा वाढदिवस होता. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. आधल्या दिवसा पासूनच त्याने लागणारे साहित्य जसे की पेकिंग बॉक्स, बिसलेरी, कच्च्या भाज्या, मसाले, तांदूळ असे साहित्य आणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच शुभम आणि त्याचे मित्र कामाला लागले. एकत्र बसून त्यांनी आणलेल्या भाज्या कापायला सुरुवात केली. काही मित्रांनी भात घातला. असे करून उत्तम आचारी मित्रांच्या मदतीने व्हेज बिर्याणी बनवली. या बिर्याणीचे जवळपास शंभर पेकेट्स त्यांनी पेक केले.

दुपार पासूनच शुभम आणि त्याचे मित्र पुण्यातील शनिवार वाडा आणि आसपासच्या परिसरात फिरू लागले. कोरोना उपासमारीच्या काळात रस्त्यावर उपाशीपोटी दिसणारे बेघर, गोर गरीब, दोन वेळच्या अन्नासाठी भटकणारे कष्टकरी, लहान मुले या सर्वांना शुभमने हे अन्नाचे पेकेट्स वाटले. त्यानंतर मात्र एक केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला गेला.

“केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला. काही उत्साही मित्र असतात. माखवा माखवी होतेच थोडीफार. परंतु अति नासाडी टाळून तेच अन्न गरिबांच्या पोटात गेलं याच मला समाधान आहे. माझ्या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. मला याचा कुठं गवगवा करायचा न्हवता. नायतर लोक म्हणतील देखावा करतोय. पण माहीत नाही मित्रांनी व्हडीओ काढलीच थोडीशी. हे अन्नदान करून मला खूप समाधानी वाटलं. कदाचित असंच इतरांनी देखील करावं. आणि पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात वाढदिवस असाच साजरा व्हावा असं मलाही वाटत.”

– शुभम शिंदे

अलीकडे तरुणाई मध्ये केक खाणारे कमी आणि माखवुन वाया घालवणारे आपल्याला अधिक मिळतात. बऱ्याचदा अक्खाच्या अखा केक तोंडावर मारून वाढदिवस साजरा करतात. यात कोणते समाधान आहे हे समजणे कठीणच. पण केक आणि अंड हा एक अन्नाचा प्रकार असल्याने ती एक उतमात आहे हे निश्चित. आपण मात्र गरिबांना अन्नदान करावं असं शुभमने ठरवलं. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचे देखील सहकार्य लाभले. करण गायकवाड, साहिल शेलार, आकाश खरात, आकाश जाधव, हर्षद भिकुले, सचिन वाघमारे,अभिषेक ठोंबरे, देवा गाडे, संकेत जोरी, तेजस साठे, प्रतीक आरसकर या मित्रांनी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व स्तरातून शुभमची व त्याच्या मित्रांची स्तुती होत असून इतर तरुणांनी ही असा आदर्श घ्यावा असे अनेक समाजसेवक म्हणत आहेत.

“गेल्या अनेक वर्षांत मी हजारो केक बनवले असतील. प्रत्येक केक हा आम्ही मनापासून बनवत असतो. अर्थात आम्हाला कस्टमर पैसे देतात खरे परंतु त्या केकची नासधूस झालेली आम्हाला खरोखर आवडत नाही. ते एक अन्न आहे ते एखाद्याच्या मुखी लागणे उत्तम. काही लोक आपला वाढदिवस आश्रम अथवा आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करतात. त्यासाठी मला केकच्या ऑर्डर येतात. अशावेळी मी बऱ्याचदा त्यांना डिस्काउंट देत असतो. कारण ज्या लोकांसाठी ते करणार आहेत त्याबद्दल आम्हालाही आपुलकी आहे. नासधूस करण्यापेक्षा अन्नदान केव्हाही श्रेष्ठ”

– महेश बनकर (रोसो कॅफे,कल्याण)

– संतोष दिवाडकर